सौरभ हिवराळे हा बुलडाणा जिल्ह्याच्या नांदुरा तालुक्यातील चांदूर बिस्वा गावचा तरुण. त्याने अझीम प्रेमजी विद्यापीठातून एमए (डेव्हलपमेंट) केलं. तिथे अभ्यासक्रमाचा भाग म्हणून त्याने संशोधन करून एक डॉक्युमेंटरी बनवली. मुंबईच्या दादर फ्लॉवर मार्केटमध्ये बुलडाण्यामधल्या शेकडो बायका सीजननुसार रानभाज्या आणि वेगवेगळ्या झाडांचा पाला विकायला घेऊन येतात. पूजेसाठी आणि औषधी उपयोगासाठी म्हणून त्या विकत घेतल्या जातात. या महिलांच्या नांदुरा ते दादर या प्रवासावर आणि कामावर ही डॉक्युमेंटरी बेतलेली आहे. या डॉक्युमेंटरीसाठी आवश्यक शूट, स्क्रिप्ट, एडिटिंग, व्हॉईस ओवर, सबटाईटल हे सगळं काम सौरभनेच केलं. त्यानिमित्ताने त्याच्याशी केलेला हा संवाद.
ही डॉक्युमेंटरी फिल्म तुला का करावीशी वाटली?
रिसर्च म्हटला की काहीतरी विषय घेऊन त्यावर इंटरव्ह्यू घेऊन इंग्लिशमध्ये लिहिणं, डाटा प्रेझेंट करणं असा एक समज असतो. मी या बायकांच्या कामावर रिसर्च करणार होतो. त्यांना सहज समजेल अशा पद्धतीने मला माझा रिसर्च मांडायचा होता. हा विषय चार सहा वर्षांपासून माझ्या डोक्यात होता. आता मी अझीम प्रेमजीमध्ये असताना सगळं जुळून आलं त्यामुळे ही डॉक्युमेंटरी करून टाकली. या विषयावर कुठे माध्यमांत कुणी बोललेलं किंवा लिहिलेलं पाहिलं नव्हतं. मग तर आपण हा विषय करायलाच पाहिजे असं वाटलं.
या महिला फक्त नांदुरा गावच्याच आहेत की इतरही?
नांदुरा आमचा तालुका आहे. तालुक्याला लागून खेडेगावं आहेत तिथल्या या बायका आहेत. पण खरं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातून दादर फ्लॉवर मार्केटमध्ये बायका येतात असं म्हटलं तरी चालेल. कारण शिर्डी, नगर, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर इथूनही आलेल्या बायकांशी बोललो होतो.
त्या नेमका कसला पाला घेऊन येतात?
ठराविक असं काही नाही. त्यांच्या त्यांच्या भागात पिकतं ते त्या घेऊन येतात. म्हणजे कसाराकडच्या बायका आंब्याची पानं आणतात. बुलडाणामधल्या बायका कडुलिंब आणि बेलाची पानं घेऊन येतात. आदिवासी स्त्रिया पळसाची पानं, रानभाज्या, रानफळं आणतात. म्हणजे थोडक्यात सांगायचं तर शहरात मिळत नाही ते सगळं त्या विकायला घेऊन येतात.
या पाल्याला स्थानिक मार्केट उपलब्ध नाही का?
तिथं ते सहज फुकट भरपूर उपलब्ध आहे. मग विकत कोण घेणार!
हा पाला विकून त्यांना एका ट्रिपचे किती पैसे मिळतात?
ते त्या त्या वेळच्या मागणीनुसार ठरतं. बाजारात कमी पाला आला असला तर त्या वीस रुपयांत कडुलिंबाच्या पाल्याची आणि कोथिंबिरीची अशा दोन जुड्या विकतात. एक मूठभर बेलाची पानं वीस रुपयाला देतात. त्यांना एका ट्रिपचे आठशे ते बाराशे रुपये मिळतात.
गावाकडे या महिलांना याशिवाय काही कमाईचं साधन आहे का?
फारसं नाही. त्यातल्या बहुतांश बायका अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांतल्या आहेत. आणखी एक महत्वाचं म्हणजे यातल्या बहुतेकजणी वयस्कर आहेत. त्यांच्याकडून इतर कष्टाची, मोलमजुरीची कामं होत नाहीत. त्यामुळे त्यांना हे काम करणं सोयीचं वाटतं. कारण या भाज्या, फळं, पाला त्यांना सहज उपलब्ध आहे.
या महिलांची मुलं/मुली आणि कुटुंबातील इतर लोक काय करतात?
शेती. मजुरी.
हा प्रवास त्या किती वर्षांपासून करतायत?
कोणी दहा, पाच, दोन वर्षं करतायत, तर कोणी वीस-तीस वर्षांपासून.
इतक्या प्रवासाचा त्रास होत नाही का?
त्रास होतो, पण नाईलाज आहे. डॉक्युमेंटरीमध्ये दाखवल्याप्रमाणे जनरल डब्यात किती गर्दी असते हे आपल्याला माहितीच आहे. कधी कधी त्या स्लीपर कोचमध्ये घुसतात, मग रेल्वे कर्मचारी त्यांना तिथून हाकलून लावतात, लोक तुच्छतेने बघतात. शिवाय प्रवास करून शारीरिक आणि मानसिक थकवा येतोच. आपण साधं रिकाम्या हाताने प्रवास करून आलो तरी दमतो. या तर वीस तीस किलोचं ओझं घेऊन प्रवास करतात.
या महिला तिकीट काढत नाहीत ही गोष्ट खरी आहे का?
हो, खरी आहे. त्यांना येऊन जाऊन एका ट्रिपचं ४०० रुपये तिकीट पडतं. बदल्यात त्यांना एका ट्रिपचे हजार रुपये मिळतात असं पकडू. तरी, चारशेचं तिकीट काढून सहाशे रुपयांसाठी जायला परवडेल का इतक्या लांब?
तिकीट काढत नाहीत म्हणून कारवाई होत नाही..?
त्या जनरल डब्यात बसतात. तिथे टीसी सहसा येत नाही. किंवा मग स्लीपर कोचमध्ये संडासाजवळ, दरवाज्याजवळ या बायका चोरासारख्या बसतात. टीसी निघून जातो आणि बोललाच तर गयावया करून या सोडवून घेतात.
मुंबईत राहण्या-खाण्याची, सुरक्षेची काही सोय असते का?
काही बायका मुंबईत राहतात. काही येऊन-जाऊन करतात. रात्री दहा-अकरा वाजता नांदुरावरून बसल्या की सकाळी सहाच्या सुमारास बाजारात येतात. बारा-एक वाजेपर्यंत सगळा माल विकून परत त्याच दिवशी परतीच्या प्रवासाला निघतात. पुन्हा एक-दोन दिवसांनी असाच प्रवास करतात. हे चक्र सुरू असतं.
स्थानिक लोकप्रतिनिधींना याची माहिती आहे का? त्यांची यावर काय भूमिका आहे?
मी अजून त्यांच्याशी बोललो नाहीय, पण बोलणार आहे. डॉक्युमेंटरी करून या विषयातून मी मोकळा होणार नाहीय. हा विषय लावून धरायचा, हे माझ्या डोक्यात आहेच.
ही फिल्म बनवल्यानंतरची तुझी भावना काय होती?
हो, समाधान आहे. इतक्या लांबून या बायका फक्त हजार-पाचशे रुपयांसाठी येतात हे कुठे कुणाला माहिती होतं? दादर मार्केट म्हटलं की नजरेसमोर सुंदर फुलं आणि अॅस्थेटिक फोटो, व्हिडिओ येतात. पण तिथं असेही अनेक महत्वाचे विषय आहेत हे लोकांपर्यंत पोहोचतंय, पोहचेल याचं समाधान आहेच.
'विदर्भ एक्स्प्रेस' ही डॉक्युमेंटरी युट्युबवर उपलब्ध आहे.
विदर्भ एक्स्प्रेस - https://youtu.be/cxwnXUmyaLg?feature=shared
