
पाण्याची थोडी जरी खात्री असली की शेतकरी हमखास पैसे मिळवून देणारं पीक म्हणून ऊस लावतात. पण हल्ली नाना कारणांमुळे उसाची लागवड खर्चिक होत चालली आहे. त्यामुळे शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पन्न देणाऱ्या नव्या प्रयोगांच्या शोधात आहेत. त्यात बाजरीसारख्या भरडधान्यांकडे वळण्याचं प्रमाण वाढलं आहे. विशेषतः राज्यातले अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकरी या प्रयोगांकडे आशेने पाहताहेत.
ऊसाचं पीक आजवर शेतकऱ्यांना रोकडा पैसा मिळवून देणारं पीक मानलं जात आलंय. पण गुंतवणुकीच्या तुलनेत त्यातून पैसे मिळत नसल्याची तक्रार आता शेतकरी करून लागलेत. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांना ऊसाच्या लागवडीचा खर्च परवडेनासा झाला आहे. ऊसाच्या बेणांचे, तसंच रासायनिक खतं व कीटकनाशकांचे वाढते भाव, मजुरी खर्च वाढणं, ऊसतोडणीसाठी येणारा खर्च, कारखान्यांकडून मिळणारा कमी भाव, हार्वेस्टिंग मशीनच्या ऊसतोडणीमुळे शेतीचं आणि पिकाचं होणारं नुकसान, हार्वेस्टिंगने ऊसतोडणी केली तर कारखान्यांकडून केली जाणारी पाल्याची सरासरी पाच टक्के कपात, कारखान्यांकडून हप्त्याचे पैसे वेळेवर न मिळणं अशा विविध कारणांनी उसातली गुंतवणूक हळूहळू वाढत आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लिंबे-नांदूर गावचे शेतकरी भास्कर खेडकर यांनाही हीच चिंता सतावू लागली होती. खेडकर यांची पाच एकर शेती आहे. विहीर आणि बोअरवेलचं पाणी मुबलक असल्याने त्यांनी २०२३मध्ये ऊसाची लागवड केली. मात्र २०२३ आणि २०२४ या दोन्ही वर्षी ऊसाला लागणारी गुंतवणूक जास्त आणि परतावा कमी असा अनुभव त्यांना आला. त्यामुळे यंदा त्यांनी ऊसाऐवजी बाजरीची लागवड केली आहे. खेडकर सांगतात, “गेल्या वर्षी पाच एकर शेतीमध्ये एकूण १५० टन ऊसाचं उत्पादन मिळालं. प्रती एकर सरासरी ३० टन उतारा मिळाला. कोणत्याही कारखान्याचे शेअरधारक नसल्याने ऊस तीन कारखान्यांना द्यावा लागला. सरासरी २६०० रुपये प्रती टन भावाने ३ लाख ९० हजार रुपये पदरात पडले. मात्र ऊसाचं उत्पादन घेण्यासाठी लागवडीपासून ते तोडणीपर्यंत १ लाख ६० हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागली. त्यामुळे दीड वर्षामध्ये केवळ २ लाख ३० हजार रुपये नफा झाला.”
याच अर्थ दीड वर्षामध्ये प्रती एकर ४६ हजार रुपये मिळाले. पहिल्या वर्षी त्यांनी मजुरांकडून ऊसतोडणी करून घेतली होती. त्यामुळे ऊसाच्या सरीचं नुकसान झालं नाही आणि शेतीही तुडवली गेली नाही. पण दुसऱ्या वर्षी मजूरटंचाईमुळे हार्वेस्टिंग मशीनने ऊसतोडणी करावी लागली. त्यावेळी हार्वेस्टिंग मशिनच्या वजनामुळे शेती जास्त तुडवली गेली. ऊसाच्या सरींचंही नुकसान झालं. पुढच्या वेळचं पीक काढण्याच्या दृष्टीने जमीन खूपच खराब झाली. ती पुन्हा भुसभुशीत करणं आणि इतर मशागतीला लागणारा खर्च जास्त होता. शिवाय पुढील कालावधीत पीक कसं आणि किती हाती येईल याचा काहीच अंदाज येत नव्हता. म्हणून त्यांनी ऊसाऐवजी बाजरी लावण्याची निर्णय घेतला.
बाजरीच का? यावर खेडकर सांगतात, “बाजरी हे कमी कालावधीत पदरात पडणारं पीक आहे. शिवाय उन्हाळ्याच्या हंगामात लागवड केली असल्याने रोगराई आणि कीड खूप कमी असते. शिवाय या पिकाला गुंतवणूकही कमी लागते. बियाणं, थोडं खत, थोडं पाणी दिलं की झालं. पावसाळ्यात पुढच्या पिकासाठी जमीन मोकळी!”
उन्हाळी हंगामात बाजरीचं एकरी १५ क्विंटल उत्पन्न मिळेल, असा खेडकर यांचा अंदाज आहे. या पाच एकरमध्ये एकूण ७५ क्विंटल उत्पादन अपेक्षित धरलं आहे. जरी २५०० रुपये भाव मिळाला तर १ लाख ८७ हजार ५०० रुपये परतावा मिळू शकतो. यातून मजुरी, बियाणं आणि मशागत यासाठी केलेली ३० हजार रुपये गुंतवणूक वजा केली तर १ लाख ५७ हजार रुपये परतावा शिल्लक राहील. अर्थात तीन-चार महिन्यात प्रती एकर ३१.५ हजार रुपये परतावा मिळेल अशी आशा आहे. एकूणच उसाच्या पिकाऐवजी बाजरी पीक शेतकऱ्यांना परवडतं. खेडकर यांच्यासारख्या कहाण्या अनेक शेतकऱ्यांच्या सापडतात.
बाजरी हे पीक अत्यल्प पाण्यावर येतं. शिवाय कोणत्याही हंगामात लागवड करता येते. बाजरीतं वैशिष्ट असं की, त्याला उष्ण आणि कोरडं हवामान पोषक असतं. त्यामुळे देशात राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यात बाजरी लागवड मोठ्या प्रमाणावर होते. महाराष्ट्रात विशेषतः दुष्काळी-कोरडवाहू परिसरात खरीप हंगामात बाजरीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. उदा. बालाघाटच्या डोंगररांगा आणि माणदेशातील कोरडवाहू परिसरात पूर्वापार बाजरीचं पीक घेतलं जातं. ३० वर्षापूर्वी गावरान बाजरीच्या (देशी वाणाच्या) लागवडीसाठी बालाघाटच्या डोंगररंगा प्रसिद्ध होत्या. मात्र संकरित वाण आल्यापासून गावरान बाजरीची घसरण झाली.
धाराशिव जिल्ह्यातल्या पारा गावचे भानुदास बिक्कड सांगतात, “बाजरी हे पीक अगदी अडीच-तीन महिन्यात निघणारं आहे. कोरडवाहू परिसरातील शेतकऱ्यांचा खरीप हंगामात बाजरी आणि रब्बी हंगामात ज्वारी हा पारंपरिक पीक पॅटर्न २००५ पर्यंत ठरलेला होता. थोड्या हलक्या, पोत कमी असलेल्या, भरड-तांबड्या शेतात बाजरीची लागवड केली जाते. पाऊस कमी असला तरीही थोडंफार उत्पादन मिळतंच, असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.” बागायती परिसरातही हिवाळा आणि उन्हाळा हंगामात बाजरीची लागवड केली जाऊ लागली आहे. कमी रोगराईमुळे उत्पादनदेखील चांगलं मिळत आहे.
पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या मातेरेवाडी गावचे शेतकरी प्रमोद मातेरे हे दरवर्षी सव्वा एकर क्षेत्रामध्ये जानेवारी ते मार्च या महिन्यात बाजरी लागवड करतात. ते सांगतात, “बाजरीचं पीक घेण्यामागे जनावरांचा चारा आणि खाण्यासाठी धान्य असा दोन प्रकारचा उद्देश राहतो. बाजरी डोंगरांच्या माथ्यावरच्या तांबड्या शेतात थंडीमध्ये पेरतो. त्यामुळे पाणी खूप कमी लागतं आणि मार्च महिन्यामधील उष्णतेत दाणे भरण्याचा योग साधून येतो. शिवाय कीड कमी राहते. दाणे कसदार भरतात. या सव्वा एकरमध्ये बियाणांसह पाच-सहा हजार रुपये गुंतवणूक होते, त्या बदल्यात सव्वा एकरमध्ये १८ क्विंटलपर्यंत उत्पदानाचा परतावा मिळतो. तोही अगदी कमी काळात.” मातेरे यांचा बाजरी प्रयोग पाहून गावातील आणखी काही शेतकऱ्यांनी बाजारी लागवड सुरू केली आहे.
आरोग्याच्या दृष्टीने बाजरीचं महत्त्व मोठं आहे. बाजरीमुळे रक्तातील कोलेस्टेरॉलचं प्रमाण नियंत्रित राहतं, बाजरी मधुमेही रुग्णांसाठी, तसंच दम्याच्या रुग्णांसाठीही चांगली मानली जाते. शांत झोप लागणं, त्वचा निरोगी राहणं आणि केसांची वाढ यासाठीही बाजरी उपयुक्त असते, असं संशोधनातून पुढे आलं आहे. त्यामुळे बाजरीवर प्रक्रिया करून बनवलेली उत्पादनं आता शहरी भागात लोकप्रिय होताहेत. उदा. बाजरीचे टोस्ट, लाडू, भजी, उपमा, थालीपीठ, कांदावडी, हलवा, खिचडी इ. त्यामुळे ग्रामीण भागात छोट्या प्रमाणावर बाजरी प्रक्रिया उद्योग उभे राहिले तर या भरडधान्याच्या लागवडीला आणखी प्रोत्साहन मिळेल आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना चांगला पर्याय उपलब्ध होईल.
सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com
सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.