
वन्यजीवशास्त्रातला पदव्युत्तर अभ्यास पूर्ण केल्यानंतर प्रत्यक्ष फील्ड प्रोजेक्टसाठी म्हणून मी आता तिलारीला निघाले होते. तिलारी हे पश्चिम घाटातलं महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरचं एक संरक्षित जंगल. याच भागात तिलारी नदी आणि धरणही आहे. इथली जंगलं अनेकविध प्रकारचे पक्षी, प्राणी आणि निरनिराळ्या झाडवेलींच्या प्रजातींनी समृद्ध आहेत. जंगलांच्या सीमारेषांवर लोकवस्तीही आढळते. गेल्या दशकात इथली घनदाट सदाहरित आणि पानगळीची जंगलं कमी कमी होत चालली आहेत. त्या जंगलांची जागा काजू वा रबराच्या लागवडींनी घेतली आहे. मनुष्यवस्ती, पर्यायाने शेती यामुळे जंगलं नष्ट होतात. परिणामी, प्राणीही आपल्या जंगलातल्या राहायच्या जागा सोडून मनुष्यवस्तीकडे येतात, शेतात वस्ती करतात. मग माणूस आणि वन्य जीव यांच्यात संघर्ष होऊ लागतो. एक अपरिहार्य दुष्टचक्र सुरू राहतं. तिलारीच्या जंगलांमधून हेच चित्र दिसतं आहे का हे पाहण्यासाठी, त्या दृष्टीने त्या जंगलाचा अभ्यास करण्यासाठी मी निघाले होते.
पुण्यातून पहाटे निघालेली माझी एसटी सातारा, कोल्हापूर हे टप्पे पार करत संध्याकाळच्या वेळी कोकणात पोचली. कोकणच्या खुणा दिसायला लागल्या... लाल माती, चिराच्या दगडाच्या भिंतींची घरं, घरांवरली कौलं, घरांच्या कुंपणावरली लालचुटूक जास्वंदी, नारळी-पोफळी, भातशेती आणि हवेतला दमटपणा. बघता बघता सावंतवाडी आली. वाडीच्या एसटी डेपोमध्ये बस बदलून यथावकाश मी तिलारीला मुक्कामी पोहोचले. एव्हाना गुडूप अंधार पडला होता. दूर अंधारातही उंचच उंच डोंगररांगा दिसत होत्या. सगळीकडे नीरव शांतता भरून राहिलेली. चांदण्यांनी फुललेलं रात्रीचं आभाळ बऱ्याच दिवसांनी बघत होते. जीव सुखावला. आता पुढचे चार महिने मला इथेच राहायचं होतं.
इथे प्राणी अजून जंगलातच वास्तव्य करून आहेत, की त्यांनी काजू-रबराच्या लागवडीच्या क्षेत्रातही शिरकाव केला आहे का हे बघणं हा माझ्या अभ्यासाचा एक भाग होता. त्यासाठी मला जंगलात ठिकठिकाणी ‘कॅमेरा ट्रॅप्स' लावायचे होते. रात्री-बेरात्रीसुद्धा या कॅमेरांसमोर प्राण्यांची हालचाल झाली की आपोआप फोटो काढले जातात. प्राण्यांच्या वावराचे असे फोटोरूपी पुरावे मला गोळा करायचे होते. मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यावर मी शांतपणे माझं सामान- फील्डमध्ये लागणारे हिरवे-राखाडी कपडे, टोपी, कॅमेरा ट्रॅप्सच्या बॅटऱ्या, फील्ड डायरी-लावून ठेवलं आणि जेवण करून झोपून गेले. दुसऱ्या दिवसापासून कामाला सुरुवात करायची होती.
मला प्रामुख्याने जंगल आणि काजूच्या लागवडीखालचं क्षेत्र पकडून २५ चौरस किलोमीटर प्रभागात कॅमेरा ट्रॅप्स लावायचे होते. तिलारी नदी व तिच्या आजूबाजूच्या पाणथळीभोवती निमपानगळीची (सेमि-डेसिड्युअस) आणि निमसदाहरित (सेमी-एव्हरग्रीन) जंगलं आहेत. या जंगलांच्या जोडीने इथे कायद्याने संरक्षित अशी काही राखीव जंगलं आहेत. काही खासगी मालकीची जंगलंही आहेत. खासगी मालकीची जंगलं ‘मालकी जंगलं' म्हणून ओळखली जातात. संपूर्ण गावाच्या मालकीची जंगलंही असतात. त्यांना ‘सामायिक जंगलं' म्हणतात. गावात देवरायाही असतात. गावकऱ्यांकडून देवराया शतकानुशतकं जपल्या गेलेल्या असतात. या देवरायांमधून एखादा झरा वाहत असला तर त्याचं पाणी शुद्ध मानलं जातं. देवरायांमधून गावाच्या आणि जंगलांच्या रक्षणकर्त्या देवता वास्तव्य करून असतात असं मानतात. तिलारीजवळच्या हेवाळे गावातल्या देवराईमध्ये अशोक वृक्ष आहेत. मार्च महिन्यात त्यांच्या सुगंधित फुलांच्या बहराने ती देवराईच सुगंधित होऊन जाते.
कायद्याने संरक्षण लाभलेल्या जंगलांमधून जुनी, अनेक वर्षं उभी असलेली, उंचनिंच आणि आडवीतिडवी पसरलेली देखणी वृक्षसंपदा दिसून येते, तर खासगी व सामायिक मालकीच्या जंगलांमधून कधी कधी वृक्षतोड झालेली दिसते; गायीगुरांच्या चरण्याच्या खुणा, त्यांच्या शेणाचे पोह पडलेले दिसून येतात. वृक्षतोडीमुळे सूर्यकिरणं जमिनीपर्यंत पोहोचू शकत असल्याने जमिनीलगत झुडुपांची वाढ झालेली दिसून येते. पुढे पुढे ही लक्षणं ओळखून आणि निरीक्षणाने मी जंगलाचा प्रकार ओळखू लागले.
इथले गावकरी काजूची लागवड बरेच आधीपासून करत आहेत. काजूची लागवड झालेल्या क्षेत्रांना कुंपणं नाहीत. याउलट, रबराची लागवड हल्लीहल्लीच होत आहे. डोंगरांच्या उतारांवर शिस्तबद्ध पद्धतीने होणारी लागवड, पद्धतशीर व्यवस्थापन, कुंपणांनी संरक्षित केलेली क्षेत्रं, या साऱ्यामध्ये दुर्दैवाने इथल्या वन्य जीवसृष्टीला हक्काचं स्थान नाही. त्यामुळे त्यांचा आणि माणसांचा संघर्ष अटळ ठरतो.

कॅमेरा ट्रॅप्स लावण्यासाठी जिथे प्राण्यांच्या अस्तित्वाच्या खुणा दिसतील अशी ठिकाणं निवडणं हे पहिलं काम होतं. त्यासाठी मी आणि माझे फील्ड सहायक- ज्यांना मी काका म्हणायचे- योग्य जागा शोधत, नेमके स्पॉट हेरत जंगलात फिरायचो. काका भेटण्याआधी सुरुवातीला मी एकटीच काम करत असे, एकटीच जंगलांमधून फिरत असे. गावकऱ्यांना त्याचं मोठं आश्चर्य वाटे आणि थोडीफार माझ्या सुरक्षिततेबद्दल चिंताही. मी कुठे वाट चुकले तर, किंवा एखादा जंगली प्राणी अचानक माझ्यासमोर आला तर, याची ते काळजी करायचे. त्या दहा-पंधरा दिवसांत मी माझ्या सभोवतालच्या वातावरणाबद्दल अधिक सजग झाले; नव्हे, जंगलात वावरताना ही कला शिकले असंच म्हणायला हवं. शहरात असताना आपले डोळे, कान, नाक किती निद्रिस्त अवस्थेत असतात, हे जाणवून मला थक्क व्हायला झालं. लवकरच माझी आणि काकांची टीम झाली आणि गावकऱ्यांची चिंताही जरा कमी झाली.
काका म्हणजे माहितीचं भांडार होते. प्राण्या-पक्ष्यांच्या सवयी, लकबी, आवाज, झाडांची माहिती, उपयोग... सांगावं तितकं कमीच! अतिशय निवांतपणे, न कंटाळता, कुठेही घिसाडघाई न करता त्यांनी मला खुणांवरून प्राणी, पक्षी कसे ओळखायचे हे शिकवलं. काकांकडे स्थानिक लोककथांचाही मोठा साठा होता. त्यांच्याकडून त्या कथा ऐकणं मोठं आनंददायी असे. अशीच एक गोष्ट आहे ‘सवत सड्या'ची. ती साधारण अशी-
खूप खूप वर्षांपूर्वी इथे घनदाट वृक्षराजी आणि जंगलं यांशिवाय काहीच नव्हतं. जिथे नजर जाईल तिथे जंगलच जंगल. एकदा एक माणूस त्याच्या दोन बायकांसकट त्या जंगलातून मैलोगणती मार्गक्रमण करत होता. चालता चालता एका पहाडापाशी येऊन तिघं थबकले आणि त्या पहाडाच्या शिखरावर चढून गेले. शिखराच्या आसपासच्या भागातली जमीन सुपीक आहे असं त्यांच्या लक्षात आलं आणि तिथे राहावं असं त्यांनी ठरवलं. तिथेच त्यांनी एक झोपडी बांधली; शेती सुरू केली. आपल्या नवऱ्याला मदत करणाऱ्या त्या बायका एकमेकींचा मात्र मनोमनी दुःस्वास करत. एकदा थोरली सवत त्या डोंगरमाथ्यावरच्या एका दगडावर धाकलीचे केस विंचरायच्या बहाण्याने तिला पुढ्यात घेऊन बसली. तिने धाकलीला दगडाच्या ज्या बाजूला बसवलं होतं तिथून पुढे खोल दरी सरळ खाली उतरली होती. धाकटीला गप्पांमध्ये गुंतवून ठेवत केस विंचरता विंचरता मोठीने तिला एकदम खाली ढकलून दिलं. मात्र, हे करताना ती स्वतः बोलण्यामध्ये इतकी गुंगून गेली होती, की धाकटीने दोघींच्या पदरांची घट्ट बांधलेली गाठ तिच्या लक्षातच आली नाही. परिणाम? दोघी एकत्रच दरीत पडल्या आणि देवाघरी पोहोचल्या. म्हणून हा सवत सडा.
आणखी एक गोष्ट आहे ‘वाघाच्या दगडाची'. अनेक अनेक वर्षांपूर्वी काही लोक डोंगराच्या पायथ्याला शेती करून राहत असत. त्यांच्यातलाच एक गुराखी मात्र डोंगरामध्येच एकटा आपल्या गुरांसकट राहत असे. दिवसा त्याची गुरं डोंगरावर चरत आणि हा बसल्या जागी त्यांच्यावर लक्ष ठेवून असे. एकदा डोंगरात लपून राहणाऱ्या वाघाची नजर या गुरांवर पडली. डोंगरमाथ्यावरच्या एका दगडावर दबा धरून बसलेला वाघ एखादं तरी वासरू वा गाय मारण्याचे बेत करत होता. खालून गावकऱ्यांना हे दृश्य दिसल्यावर त्यांनी जोरजोरात हाका मारून गुराख्याला सावध करायचा प्रयत्न केला; पण खूप अंतरामुळे गुराख्याला त्यांच्या हाका ऐकू गेल्या नाहीत. वाघाने गायींच्या दिशेने उडी घेतली खरी; पण त्याला अंतराचा अंदाज आला नाही आणि त्या भल्या मोठ्या दगडाच्या घळीत तो अडकून पडला. बाहेर निघता न आल्याने त्याचा तिथेच मृत्यू झाला. तेव्हा त्याच्या आठवणीत त्या दगडाला ‘वाघाचा दगड' असं नाव पडलं. डोंगरमाथ्यावर चढून गेलं की तो दगड अजूनही दृष्टीस पडतो आणि त्याची घळही. त्या दगडाच्या पायथ्याशी स्वच्छ, नितळ पाण्याचा झरा बारमाही झुळझुळतो.

काकांकडून ऐकलेल्या या आणि अशा इतर अनेक गोष्टी माझ्या चांगल्याच लक्षात राहिल्या आहेत. गोष्टी रंगवून सांगण्याचं त्यांचे कसब अफलातून होतं. वाढत्या वयासोबत ते कसबही उत्तरोत्तर फुलत गेलं होतं. मात्र, कालौघात या गोष्टी नष्ट होण्याचीही भीती वाटते. कारण त्या कोणी कुठे लिहून ठेवलेल्या नाहीत, अशाच सांगोवांगी त्या पुढे सरकत आलेल्या आहेत. मी त्या कथा ऐकल्यात आणि मला त्या भारी वाटतात, याचं स्थानिकांना भारी अप्रूप वाटत असे. आम्हाला जोडणारा हा एक दुवाच बनला होता म्हणा ना. (या गोष्टी हरवून जाऊ नयेत अशी माझी फार इच्छा आहे. तुम्हीसुद्धा कधी कोणाला या गोष्टी सांगाल तेव्हा त्याच्या मूळ गाभ्याला धक्का लागणार नाही हे नक्की पहा.)
सवत सडा आणि वाघाचा दगड ही ठिकाणं आता तिलारीच्या जंगलात दिशादर्शकांप्रमाणे उपयोगी पडतात. रोजच्या भटकंतीमध्ये त्या दोन्ही खुणांवरून जंगल परिसरात आपण नक्की कुठे आहोत याचा अंदाज बांधायलाही मी लवकरच शिकले. याच डोंगरमाथ्याच्या कड्यावर एक झाड होतं- देवाचं झाड. स्थानिकांची अशी श्रद्धा, की ते झाड देवाचं म्हणून पवित्र. त्याला धक्का लावला तर त्या व्यक्तीवर काही तरी बिलामत येणार. रबर लागवडीसाठी जमीन जाळताना सगळ्यांचं श्रद्धास्थान असं ते झाडही जाळलं गेलं. ते जळालेलं झाड मी पाहिलं. त्याच्या फांद्या आणि खोड अजून शाबूत आहे. दिशादर्शक म्हणून या झाडाचाही चांगला उपयोग व्हायचा.
कॅमेरा ट्रॅप्स लावण्यासाठी मी आणि काका चार महिने जंगलात अथक आणि प्रचंड फिरलो. एकेक करून छायाचित्रं मिळायला लागली तसं आमच्या पायपिटीचं सार्थक होतंय, या विचाराने उभारी मिळायची. कॅमेरा ट्रॅप्स लावताना काकांना प्रश्न पडायचा, की कुणी प्राणी आपल्याला गुपचूप निरखत असेल का? मी हा फारसा विचार केला नव्हता. मात्र, दूर झाडीच्या आड दडून एखादा बिबट्या आपल्याकडे पाहत असावा, ही कल्पनाच फार भारी होती. खरंच कुणी बिबट्या आमच्याकडे लक्ष ठेवून होता की नाही याची कल्पना नाही; आमच्या कॅमेरासमोर मात्र तो नक्की आला होता. कारण कॅमेराने बिबट्याचे काही फोटो टिपले होते.
झाडांच्या शेंड्यांवर बसलेल्या माकडांचं आमच्याकडे कायम लक्ष असायचं. या झाडावरून त्या झाडावर उड्या मारताना, त्यांचा तो ठराविक चीत्कार करतानाही ती माकडं आम्ही त्यांच्या नजरेच्या टप्प्यातच राहू याची खातरजमा करायची. आम्ही कॅमेरा ट्रॅप लावून तिथून निघून गेलो की ती हळूच खाली उतरायची. कॅमेराचं अगदी बारकाईने निरीक्षण करायची. दुसऱ्या दिवशी फोटो पाहताना आम्हाला ते कळायचं.
एकदा एका गावालगत काजू लागवडीच्या एका भागात आम्ही कॅमेरा ट्रॅप लावला होता. काही तासांनंतर एका मुंगसाने कॅमेरासमोर नकळत झकास पोज दिली. दुसऱ्या दिवशी फोटो पाहताना तो ‘पोस्टर-परफेक्ट' फोटो आमच्या खास लक्षात राहिला. एके दिवशी आम्हाला कॅमेराच्या आसपास साळिंदराचे काटे पडलेले दिसले. काकांनी बरोबर अंदाज बांधला, की कॅमेराच्या फ्लॅशने साळिंदर घाबरलं असणार आणि स्वसंरक्षणार्थ त्याने आपले काही काटे कॅमेराच्या दिशेने भिरकावले असणार.
जंगलात कधी कधी हत्तींच्या ओरडण्याचा आवाज यायचा. भटकताना वाटेत त्यांच्या शेणाचे पोह पडलेले दिसायचे. मला वाटायचं, की आपल्या कॅमेरात हत्तींचेही फोटो टिपले जावेत. मात्र, ते झालं नाही तेच बरं झालं. कारण अनेकदा हत्ती कॅमेरा ट्रॅपची नासधूसच करतात. पण आदल्या दिवशी लावलेल्या ट्रॅपचा दुसऱ्या दिवशी चक्काचूर झालेला पाहण्याची वेळ माझ्यावर सुदैवाने चार महिन्यांत एकदाही आली नाही.
प्राण्यांना आमच्या कॅमेराची उत्सुकता वाटायचीच; पण आसपासच्या गावातली माणसंही त्यात मागे नव्हती. त्यांना हे सारं फार गमतीशीर वाटत असे. आम्ही प्रत्येक ट्रॅपसोबत एक चिठ्ठी चिकटवून ठेवायचो. हे काय आहे, कशासाठी चाललेलं आहे याबद्दल चिठ्ठीत मालवणी भाषेत थोडक्यात माहिती लिहिलेली असायची. सुरुवातीला लोकांच्या मनात ‘कॅमेरा ट्रॅपिंग'बद्दल शंका होत्या, त्याची उपयुक्तता लक्षात येत नव्हती. हळूहळू त्यांनी माझ्या अभ्यासाची ही पद्धत स्वीकारली. काहींनी त्या कॅमेऱ्यासमोर उभे राहून स्वतःचेही फोटो काढून घेतले... अशी मजा!

जंगलात असताना अचानक कोणी रानटी जनावर समोर आलं तर काय करायचं यावर मी आणि काका बऱ्याचदा चर्चा करत असू. काका सहजरीत्या सांगत, “घाबरायचं नाही, शांत राहायचं आणि झाडावर चढायचं. “अरे देवा! ते इतकं सोपं असतं तर काय पाहिजे होतं! एकदा मात्र त्यांचा सल्ला प्रत्यक्षात आणायची वेळ आलीच. एके दिवशी आम्ही जंगलातून निघालो होतो. मी काकांच्या पुढे चालत होते. एका ठिकाणी आमच्यासमोर दहा-एक फुटांवर एक धिप्पाड नर गवा अतिशय शांतपणे उभा होता. इतका, की तो पटकन माझ्या लक्षातही आला नाही. आपली एकटक नजर आमच्याकडे रोखून तो उभा होता. काकांनी त्याला माझ्याआधी पाहिलं आणि शांतपणे एकच वाक्य उच्चारलं, “हालचाल करू नका, पुढे गवा आहे.” गवा हा प्राणी सहसा शांत असतो. तुम्ही त्याला त्रास दिला नाही तर तोही काही करत नाही. पण कधी कधी माजावर आलेले नर आणि पिल्लांसोबत असलेल्या माद्या आक्रमक ठरू शकतात. काकांचं वाक्य ऐकताच मी उभ्या जागी ब्रेक लावल्यासारखी थांबले. मग हळू, अत्यंत सावधपणे जरा मागे सरले. काकांनी ‘फुर्र' वगैरे आवाज करून गव्याला दूर घालवायचा प्रयत्न केला; पण तो पाच-एक मिनिटं आमच्यावरची नजर न हलवता तिथेच उभा राहिला. त्यानंतर मात्र वळून तो जायला लागला. तो चालायला लागल्यावर त्याच्या खुरांनी जमिनीला बसलेले हादरे आम्हाला जाणवले. हे सगळं घडताना आम्ही शांत होतो. काका बरोबरच म्हणाले होते, “शांत राहिलं की कामं सोपी होतात, प्रश्नही सहजपणे सुटतात.” मात्र, त्याआधीची ती पाच मिनिटं! तो अजस्र गवा, त्याचे शांत-सुंदर डोळे, चकाकती शिंगं, पुष्ट-पिळदार शरीर पाहून वाटलं, याचसाठी करते आहे अट्टहास!
तिलारीच्या जंगलांमध्ये फिरताना मी देखणे ऋतुबदलही अनुभवले. शहरांमधे ही गोष्ट आपल्याला इतक्या प्रकर्षाने अनुभवायला मिळत नाही, आणि आपल्या आजूबाजूला असे काही बदल घडत असतील तरी त्यांविषयी सहसा आपण अनभिज्ञच असतो. पण जंगलात? जंगलात त्या बदलांकडे डोळेझाक करताच येत नाही. वसंत ऋतू आणि उन्हाळ्यात सूर्योदय लवकर होतो, जुनी पानं गळलेली असतात, नवीन पर्णसंभाराने नटलेली वृक्षराजी देखणी दिसत असते, आंब्याच्या मोहोराचा सुवास दरवळत असतो, कोकमाची फळं पिकून तयार असतात. कोकीळ उच्चरवाने आनंद प्रकट करत असतो. या जंगलांमध्ये रणरणत्या उन्हाळ्यातही मी खूप सुखात होते, आनंदात होते.
तिलारीचा भाग दुर्गम असला तरी तिलारीचं कोकणातल्या इतर गावांशी आता बऱ्यापैकी दळणवळण प्रस्थापित झालं आहे. मात्र, तिलारीचे स्वतःचे असे काही प्रश्न आहेत. इथले गावकरी कधीमधी शिकार करतात. त्यांच्या आहाराची ती गरज आहे. शहरात बसून, बरेच पर्याय उपलब्ध असताना आणि तुलनेने आयुष्य सोपं जगताना ‘त्यांनी शिकार करू नये' हे सांगणं कितपत योग्य ठरेल कल्पना नाही. मात्र, शिकार हा इथला सध्याचा जटिल आणि गुंतागुंतीचा प्रश्न आहे. त्याच्या सखोल अभ्यासाची अत्यंत गरज आहे. शिकारी होऊ नयेत यासाठी प्रथम इतर पर्याय शोधण्याची आणि ते राबवण्याची गरज आहे. इथली खासगी जंगलं कधी लागवडीखाली येतील सांगता येत नाही. ते होऊ नये यासाठी गावकऱ्यांचं प्रबोधन अत्यावश्यक आहे. त्याचबरोबर, इको टूरिझमसारखे पर्याय निर्माण करण्याची गरज आहे, जेणेकरून जंगलं टिकवण्याची गरज निर्माण होईल आणि जंगलांची उपयुक्तता गावकऱ्यांना समजेल.
तिलारीमध्ये काम करताना तिलारीवासीयांशीही माझे मायेचे बंध जुळले. घराघरांमधून माझी काळजी घेणाऱ्या आज्या, काक्या, मावश्या मला मिळाल्या. काळजीने, हक्काने आणि क्वचित काळजीपोटी बळजबरीने मला खाऊ घालणाऱ्या, चहा पाजणाऱ्या, माझी खबरबात ठेवणाऱ्या, माझ्याकडे लक्ष देणाऱ्या माउल्या मिळाल्या. कोकणातल्या या प्रेमळ स्त्रिया प्रचंड हुशार आणि कर्तबगार आहेत; जितक्या मायाळू, तितक्याच खमक्याही आहेत हे आवर्जून नमूद करेन.
चार महिन्यांचा माझा अभ्यास परिपूर्ण होता असा दावा मी करत नाही. कोणताच अभ्यास तसा नसतो. कलेकलेने तो उलगडत जातो, सुधारत आणि कधी कधी गरजेप्रमाणे बदलत जातो. संशोधनात्मक अभ्यास एखाद्या कलाकृतीप्रमाणे वाटतो मला. अशा अभ्यासात नेहमीच काही तरी नावीन्यपूर्ण सापडतं. हेच पहा ना. काजूच्या लागवडक्षेत्रात आम्हाला वन्य प्राण्यांच्या नऊ जाती सापडल्या, तर वनांमध्ये अकरा. सांबर, साळिंदर लागवडीच्या क्षेत्रांमध्ये आणि जंगलांमधूनही वास्तव्य करून होते, तर रानटी डुकरांना मानवी वस्तीजवळच्या शेतलागवडीच्या जागा वास्तव्यासाठी सोयीस्कर वाटत होत्या. या माहितीचा पुढे अभ्यासात उपयोग होईल याबद्दल मला कोणतीच शंका नाही.
तिलारीने मला अनुभवसमृद्ध केलं. चार महिन्यांत या जंगलाने माझ्यामध्ये सकारात्मक बदल घडवला. इथे येताना मी अगदीच अननुभवी विद्यार्थिनी म्हणून आले आणि चार महिन्यांनंतर एक अनुभवसमृद्ध जीवशास्त्रज्ञ म्हणून बाहेर पडले. शिक्षणाचा भाग म्हणून तिलारीआधीही मी इतर जंगलांना भेटी दिल्या होत्या, तिलारीनंतरही मी आणखी जंगलं पाहीनच; पण या प्रकारचं माझं पहिलंवहिलं प्रोजेक्ट म्हणून तिलारीला माझ्या मनात एक खास स्थान मिळालेलं आहे; तिथल्या जंगलांसकट, प्राण्यापक्ष्यांसकट आणि साध्यासुध्या माणसांसकट!
(मुशाफिरी, दिवाळी २०१७मधून साभार)