नाशिकमधील कामगारनगर वस्तीतल्या मुलांपासून तृतीयपंथीय, समलिंगी लोकांचं समुपदेशन करण्यापर्यंत, गरीब मुलांना मोफत शिक्षण तसंच शिष्यवृत्ती देण्यापासून एनडीएसाठी मुला-मुलींना तयार करण्यापर्यंत अनेक गोष्टी एकच व्यक्ती करते. त्या म्हणजे नाशिकमधील माजी पोलीस अधिकारी वैशाली शिदे-शेंडे. वैशालीताईंचा हा प्रवास थक्क करणारा आहे.
मूळच्या पुण्याच्या. शालेय शिक्षण खडतर परिस्थितीत झालं. त्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी सेवासदनच्या वसतिगृहात राहत होत्या. तेव्हा एकदा गंमत म्हणून वैशालीताईंनी आपल्या रूममेटच्या नवऱ्याचा पोलिसी गणवेश घालून फोटो काढून घेतला. तेव्हापासूनच म्हणजे वयाच्या पंधराव्या वर्षापासून त्या पोलीस क्षेत्राच्या प्रेमात पडल्या. पुढे भरपूर अभ्यास करून त्यांनी इंग्रजी आणि अर्थशास्त्र या विषयात एम.ए. केलं. त्या पुणे विद्यापीठाच्या सुवर्णपदक विजेत्या आहेत. एमबीए, एलएलबी पुर्ण केल्यानंतर १९९७ मध्ये त्यांनी एमपीएससीचा अभ्यासही सुरू केला. पहिल्याच प्रयत्नात त्या शारीरिक शिक्षण आणि मुलाखतीत चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्या. १९९९ मध्ये त्यांची नेमणूक झाली.
मुंबईच्या ओशिवरा पोलीस ठाण्यात नार्कोटिक्स विभागात पोलीस अधिकारी म्हणून वैशालीताई काम करत होत्या. तिथल्या केसेस पाहून त्यांचं मन सुन्न होई. लहानपणीपासूनच दारू आणि इतर व्यसनांच्या विळख्यात सापडलेली मुलं बघितली की यावर मुळापासूनच काम करणं आवश्यक आहे, असं त्यांना वाटायचं.
दरम्यानच्या काळात त्या वर्तमानपत्रामध्ये स्पर्धा परीक्षांसाठी स्तंभही चालवत होत्या. २०१५ मध्ये त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि भरकटलेल्या, गरीब, वंचित, वाममार्गाला लागू शकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काम करायचं ठरवलं. नाशिकच्या एका वस्तीजवळच अध्ययन अकादमी सुरू केली. शाळा, कॉलेजमधील मुलांबरोबरच यूपीएससी, एमपीएससी, पोलिस भरती, एनडीएसाठी तयारी करणाऱ्या मुलांना मार्गदर्शन करायला सुरूवात केली. शाळांमध्ये जाऊन इतिहास, संविधान अशा विषयांबद्दल जागरूकतेचं काम सुरू केलं.
एखाद्याच्या घरात अभ्यासाचं वातावरण, जागा नसते, एखाद्याला खूप शिकायचं असतं पण पैसेच नसतात. अनेकांमध्ये खूप ऊर्जा असते पण ती अयोग्य मार्गावर खर्ची पडली तर त्यातून सराईत गुन्हेगार तयार होतात. अशा मुलांसाठी शिष्यवृत्तीही द्यायला सुरुवात केली. वैशालीताईंच्याकडे शिकण्याच्या अटी म्हणजे कोणी कुणाचा जात-धर्म विचारायचा नाही, तसंच अधिकारी होऊन मोठ्या हुद्दयावर गेल्यावर भ्रष्टाचार करायचा नाही. वैशालीताईंच्या हाताखालून जवळजवळ साडेचार हजार मुलांनी पोलिसी प्रशिक्षण घेतलं आहे. या कामात आर्थिक हातभाराबरोबरच मनुष्यबळही लागतं. त्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या अधिकाऱ्यांचा गट त्यांना या कामात मदत करतो. या कामात त्यांचे माजी विद्यार्थीही मदत करतात.
त्यांचा खरा कस लागला तो कोविडच्या काळात. कोविड अंतर्मुख करणारा होता, असं त्या म्हणतात. त्यानंतर समुपदेशनाच्या गरजा वाढताहेत, हे लक्षात आल्यावर त्यांनी खूप बोलायचं आहे, पण ऐकायला कुणी नाही, अशांशी बोलायला सुरुवात केली. तसंच मुलांना दोन वर्षं ऑनलाईन शिकवत असताना आर्थिक अडचणीत असूनही काम थांबवलं नाही.
‘‘ज्या वस्त्यांत जायलाही माणसं तयार नसतात, तिथली मुलं करतील काय?’’ हा प्रश्न त्या व्यवस्थेला विचारतात. त्या परिसरातील किशोरवयीन मुलांच्या समस्याच वेगळ्या असतात. चुकीच्या समजुती, राजकीय अजेंडे, गुन्हेगारी, बुवाबाबा या सगळ्याच्या हातची खेळणी होतात ही मुलं. व्यसनी होतात. अशांना वैचारिक खाद्य, प्रेम, आपल्यालाही स्वीकारणारं कुणी आहे, हा विश्वास द्यावा लागतो. ते काम वैशालीताई करतात.
त्या सांगतात, ‘‘कष्टाळू रोजंदारी करणारा एक विद्यार्थी होता. बारावी झाला. त्याला मेडिकलला जायचं होतं. पण खर्च कसा करणार? मग त्याला मदत करायचं ठरवलं. अट एकच, मेहनत करावी लागेल. तो पार्किंगमध्ये बसून १८-१८ तास अभ्यास करत असे. इमारतीतले लोक कामं सांगत, तीही करत असे. त्याचा निकाल लागला, तेव्हा सार्थक झाल्यासारखं वाटलं. आज तो मुंबईला सरकारी नोकरीत आहे. त्यानं मला अकादमीसाठी आर्थिक मदत देऊ केली, अर्थात मी ती घेतली नाही. पण त्यानं लक्षात ठेवलं, हे महत्त्वाचं.’’
याबरोबरीने त्या बाकीही बरीच धडपड करत असतात. त्या पुणे विद्यापीठातून पाली भाषाही शिकल्या आहेत. त्यांना राष्ट्रपती पदक मिळालंय. समलैंगिक तसंच तृतीयपंथीयांनाही त्या ऑनलाईन मोफत समुपदेशन करतात. त्या सांगतात. ‘‘एक गे मुलगा मला भेटला. आई-बाबा वैद्यकीय व्यवसायात असूनही त्याला स्वीकारायला तयार नव्हते. त्यांच्याशी तो खोटं बोलायला लागला होता. त्याला म्हटलं, एकदा सांगून टाक. जे वादळ यायचं ते एकदाच येऊदेत. नंतर ते स्वीकारतील.’’ पुढे एकातून एक अशी बरीच मुलं-मुली भेटायला लागली. ‘आपण कसे वेगळे आहोत’ असं या मुलांचं मन कुढत असतं तर घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते. दोघांनाही समजावणं गरजेचं असतं. त्यांचं म्हणणं ऐकणारं कुणीतरी हवं असतं. ते वेळेवर मिळालं नाही तर आत्मघातापासून गुन्हेगारीपर्यंत कुठंही त्यांचा प्रवास होऊ शकतो.
या सगळ्याचं मूळ आपल्या शिक्षणपद्धतीत असल्याचं वैशालीताईंचं मत आहे. त्या म्हणतात, ‘‘सगळ्यांनी एकसारखं व्हायला पाहिजे या नादात मुलांना आपण खुजं करतोय.’ प्रत्येकाचं उपजतच एक व्यक्तिमत्त्व असतं, त्याचा आदर करावा, असं त्या म्हणतात.
शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com
शिल्पा दातार या मुक्त पत्रकार आहेत.
