आम्ही कोण?
ले 

फुकटच्या योजनांमुळे लोक खरंच काम करत नाहीत?

  • हेरंब कुलकर्णी
  • 24.02.25
  • वाचनवेळ 5 मि.
fukatachya yojana header

सरकार सगळं फुकट देतं आहे, त्यामुळे लोक काम करत नाहीत, असं हल्ली सर्वत्र बोललं जातं. हा मुद्दा नुकताच सर्वोच्च न्यायालयात चर्चिला गेला. ‘एल अँड टी’चे सुब्रमण्यम यांचंही हे म्हणणं होतं. त्यामुळे हे गृहीतक तपासून बघायला हवं.

‘दारिद्र्याची शोधयात्रा’ (समकालीन प्रकाशन) हा अहवाल मी लिहिला, तेव्हा महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात फिरलो होतो. गावोगावी लोक हेच बोलत होते. तेव्हा मी अनेकांशी बोलून दुसरी बाजू समजून घ्यायचो. मुळात गरीब लोक खूप कष्ट करत असतात. उदा. विदर्भात शेतमजुरीचे एका दिवसाचे १०० रुपये मिळतात. तर कित्येक शेतमजूर स्त्रिया सकाळी ७ ते १२ एका शेतात आणि दुपारी १ ते ६ दुसऱ्या शेतात काम करतात. असं चित्र असताना गरिबांची अशी बदनामी का केली जाते आहे?

या प्रश्नाकडे दोन दृष्टींनी बघायला हवं.

फुकट आर्थिक मदत देण्याच्या योजनांविषयी, विशेषतः मध्यमवर्गीयांमध्ये राग असतो. पण त्यांचा रोष सिलेक्टीव्ह असतो. बड्या उद्योगपतींची कर्जं माफ करणं हे अप्रत्यक्ष सवलत देणंच असतं, पण याला ‘रेवडी’ म्हटलं जात नाही. खाजगी क्षेत्रात लाखो रुपयांचं पॅकेज असतं. ते कामाच्या मानाने कितीतरी जास्त असतं. त्यावर कुणाचा आक्षेप नसतो. सरकारी कर्मचारी अगोदरच जास्त वेतन घेत असताना आठवा वेतन आयोग ही कुणाला रेवडी वाटत नसते. खेड्यात रस्ते धड नसताना, तिथले गोरगरीब जुनाट एस.टी.ने प्रवास करत असताना मेट्रोवर इतका प्रचंड खर्च करणं ही देखील रेवडी वाटत नसते. आमच्या कराच्या पैशातून हा खर्च का करता, हे कुणी विचारत नाही. मात्र, शेतकरी-कष्टकरी वर्गाला सवलत दिली की लोकांना राग येतो. हा गरीब वर्गाविषयी असलेला तुच्छतावाद आहे.

दुसरा मुद्दा हा, की गरिबांसाठीच्या योजनांतून त्यांना इतकी मदत मिळते का, की ज्यामुळे त्यांना कामाला जाण्याची गरजच उरणार नाही? मोफत धान्य योजनेत प्रतिव्यक्ती मदत दिली जाते. त्यामुळे प्रत्येक कुटुंबात ते वेगवेगळं मिळतं. समजा ३० किलो धान्य मिळालं तरी ते कष्टकरी कुटुंबाला पुरतं का? शारीरिक कष्टांमुळे त्यांना जास्त आहाराची गरज असते, हे इथे लक्षात घ्यायला हवं. मॉल्समधून आपली घरं खचाखच भरणाऱ्या मध्यमवर्गाने ‘३० किलो धान्यात गरीब आरामात जगतात,’ असं म्हणणं क्रूरपणाचं आहे. जनावराला चारा टाकला की आपली जबाबदारी संपली, अशा प्रकारचं हे बोलणं आहे.

समजा धान्य दिलं, तरी ते शिजवायला गॅस लागतो, मसाले-तेल-भाजीपाला लागतो. चहा, साखर, दूध, फळं, लहान मुलांना खाऊ हे देखील गरजेचं असतं. त्याचा खर्च किमान हजाराच्या घरात असतो. ते तर सरकार देत नाही ना? (एका आदिवासी गावात मी दुकानातून पाच रुपयांचं तेल घेणारा माणूस व तितकं छोटं माप बघितलं आहे.) पुन्हा दर महिन्याला येणारं लाईट बिल, मुलांचा शाळेचा खर्च, औषधपाणी, प्रवास, कपडे, सण, बाजार असे सर्व खर्च केवळ शासकीय योजनेतून भागतात, असं गृहीत धरणं याला अज्ञानच म्हणायला हवं.

शेतकरी सन्मान योजना, शेतीला वीज या रकमा शेतीचा एकूण खर्च बघता अत्यल्प आहेत. आणि ज्या वर्गाविषयी आपण बोलतोय तो तर शेती नसलेला कष्टकरी वर्ग आहे. घरकुल योजनेतून प्रत्येकाला घर मिळत नाही. महात्मा फुले योजना मोठ्या आजारांसाठी असते, छोटी बिलं रोख द्यावीच लागतात. ‘लाडकी बहीण’ योजनेत दीड हजार रुपये मिळतात. निराधार पेन्शन योजनेतून मदत मिळत असेल, तर त्यांना ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेता येत नाही.

तेव्हा, एका गरीब कुटुंबात सरकारी योजनांतून येणारे पैसे किती आणि त्या कुटुंबाचा खर्च किती, हा हिशोब एकदा खरंच मांडायला हवा.

उलट ही गरीब कुटुंबं कर्जबाजारी आहेत. महिला मोठ्या प्रमाणात बचतगटाचं कर्ज उचलतात. तर कधी त्या मायक्रो-फायनान्सचं महागडं कर्ज घेतात. आपापली घरं चालवण्यासाठीचा त्यांचा हा आटापिटा असतो. शासकीय योजनेत पुरेसे पैसे मिळत असते तर गरीबांना अशी कर्जं का घ्यावी लागली असती?

यावर कुणी म्हणेल, गरिबांचं जर सरकारी योजनांतून भागत नसेल, त्यांना कामाची आवश्यकता असेल, तर मग कित्येक कामांना मजूरच मिळत नाहीत, हे कसं काय? तर, त्यामागचं वास्तवही समजून घ्यायला हवं. बागायती परिसरात गरीब कुटुंबं मर्यादित असतात. शेतीची विशिष्ट कामं एकाचवेळी निघतात, त्यामुळे मजुरांची कमतरता भासते. शेतीकाम करण्यापेक्षा जवळच्या तालुक्याच्या किंवा मोठ्या गावात कमी कष्ट व जास्त मजुरी देणारा रोजगार निर्माण झाला आहे, तिकडे मजूर जातात. तिथे त्यांना समजा आठवडाभराचं काम मिळालं, त्यांच्या खिश्यात थोडेफार पैसे आले, तर मग ते शेतमजुरीसारखं अतिकष्टाचं, घाम काढणारं काम का करतील? आपल्या सुखकर नोकरीची तुलना त्या कामाशी करू नये.

खिशात इतकी अल्प रक्कम असतानाही हे लोक काम का करत नसतील..? खिशात पैसे असताना अमानवी श्रमांपासून सुटका हवी असते, हे एक कारण. दुसरं, म्हणजे आपण खूप पैसे कमवून उच्च प्रतीचं जीवन जगावं अशा आकांक्षा या कष्टकरी वर्गात तयार होत नाहीत. आपण आपल्या मुलांच्या परदेशी शिक्षणसाठी किंवा मोठं घर घेण्यासाठी झपाटून कष्ट करत राहतो. गरीबांमध्ये अशी दूरगामी स्वप्नं, आकांक्षा असण्याचं प्रमाण अत्यल्प असतं. शिवाय ते परिस्थितीमुळे इतके पिचलेले असतात, की अशा दीर्घकालीन नियोजनाचा विचार करण्याची ताकदच त्यांच्यात उरलेली नसते. त्यामुळे आला दिवस काढायचा, इतकाच विचार ते करतात. जितके कष्ट करता येतील तितकं कमवायचं, त्यातून जे मिळेल त्या दर्जाचं जगायचं, अशी त्यांची मानसिकता बनून जाते. ती कितीही चुकीची असली तरी त्यातील अगतिकता समजून घ्यायला हवी. एखादा उद्योजक खूप संपत्ती असूनही काम करत राहतो, कारण त्याला त्यातून निर्मिती करण्याची आकांक्षा असते. केवळ खड्डे खोदताना अशा आकांक्षा निर्माण होत नसतात.

तेव्हा गरिबांशी बोलून या बाबी समजून घ्यायला हव्यात. ‘केवळ निवडणुका जिंकण्यासाठी अशा सवंग योजना आणणं चूक आहे’, ‘तिजोरीचा चुकीचा वापर होतो,’ अशी टीका जरूर करावी, पण गरिबांच्या जगण्यावर निव्वळ शेरेबाजी नको.

हेरंब कुलकर्णी | 8208589195 | herambkulkarni1971@gmail.com

हेरंब कुलकर्णी हे निवृत्त प्रयोगशील शिक्षक, तसंच वंचित घटकांच्या प्रश्नांसाठी झगडणारे कार्यकर्ते आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 14

Rajendra Savaikar01.04.25
तुमचं अगदी बरोबर आहे. मी पण असा आरोप करणाऱ्यांना हेच पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतो. दर सहा महिन्यांनी महागाई भत्ता वाढतो तोही कोणाला रेवडी वाटत नाही. आणि तसं पाहिलं तर आत्ताचा पगार हाही रेवडी असल्यासारखाच आहे. माध्यम वर्गाचं तर कधी भरणारच नाही.

गोरक्षनाथ निवृत्ती देशमुख 26.02.25
वाटप कार्यक्रम करून गरिबी हटणार नाही शासन एका हाताने देणार आणि दुसऱ्या हाताने काढून घेणार कारण तिजोरी balance ठेवावी लागेल अनेक गावांना आजही रस्ते , प्यायला शुद्ध पाणी नाही. पुर्वी अनेक गावामध्ये डेअरी होती आता भेसळीचे दुध आहे तेव्हा शासनाने पाणी ,रस्ते , बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास लोक कष्ट करून आपल्या गरजा पूर्ण करतील

सचिन ठाकरे खामगाव जिल्हा बुलडाणा 26.02.25
सर अत्यंत सुंदर लेख परिस्थितीला अतिशय अनुरूप लिखाण करून आपण जो समाजात जनजागृती पर लेख लिहिला हे सामाजिक अतिशय चांगले काम आपल्या हातून घडतं आहे

राजीव तिडके 25.02.25
वास्तववादी लिखाण आहे... फुकटात मजूर मिळाला तरी चांगलंच आहे...असा समाजात वर्ग असतोच...त्यांना स्वतः अजून अजून आणि कितीही श्रीमंत व्हायला आवडतेच...आणि त्या भावनेतूनच गरीबांना सतत नावे ठेवत असतात... असेही काही माणसे आहेत की त्यांना शंभर एकर जमीन असूनही ते गरीबांची जीवन चांगले आहे म्हणतात...अशा वैचारिक दळभद्री लोकांविषयी काय बोलावं....

Shrad Ramdas Pawar25.02.25
Excellent

NATU VIKAS S.25.02.25
विदर्भात मजुरीचा दर शंभर रुपये दर दिवशी, हे पटत नाही. हा जुना दर असावा. पण लेख विचारप्रवर्तक आहे.

Mahadeo Narasing Dhokale24.02.25
आपण लिहिलेले वास्तव आहे परंतु त्या ग्रामीण परिस्थितीतून शेतकरी कुटुंबातून न आलेल्या लोकांना हे काय कळणार कसे कळणार बराच वेळा आपण नमूद केल्याप्रमाणे शारीरिक कष्ट केल्यानंतर आहार जास्त घ्यावा लागतो आणि त्यावर खर्चही वाढतोय हा ही बाब लोकांच्या लक्षात येत नाही. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी वर बोलले जाते परंतु महाकोठ्यावधी रुपये उद्योजक बुडवतात आणि पळून जातात यावर काहीही बोलले जात नाही मात्र त्यांना शेतकऱ्याची कर्जमाफी दिसते. उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीने म** विकणे हे फक्त शेतकऱ्यांच्या बाबतीत घडते इतरांच्या बाबतीत नाही विशेषतः शेतीमाल रॉ मटेरियल म्हणून जिथे जिथे वापरला जातो तिथे तिथे फायद्याचे प्रमाण बघा त्या घटकांना त्याचे काहीच वाटत नाही विशेषतः हॉटेल्स व्यवसायात रॉ मटेरियल म्हणून शेतीमालाच वापरला जातो आणि त्यावर किती फायदा मिळवला जातो आठ दहा पट अरे टोमॅटो कांदा काकडी अशी सॅलेडची डिश रॉ मटेरियल फक्त पाच रुपये आणि विक्रीची किंमत 70 80 रुपये. आणि शेतकऱ्याला खरेदी करावी लागणाऱ्या खत आणि बी बियाणे यांच्या किमती हजारो रुपयात आणि त्यावर 28 टक्के जीएसटी काय चाललंय आणि शेतकऱ्याला कर्जमाफी मिळाली की यांचे पोटात सुळ उठतो. शेतमजुरा पेक्षा सुद्धा शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे पण लक्षात कोण घेतो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवन तसेच शेतमजुरांचे जीवन बिकट आहे. आपण आपल्या लेखात वस्तुस्थिती अतिशय समर्पकपणे मांडली आहे आणि त्यामुळे शेतमजुराबाबतचा गैरसमज आपण समाजापुढे आणलात त्याबद्दल आभार

श्री गणेश जोशी सर24.02.25
हेरंब कुलकर्णी सरांनी मांडलेली प्रतिक्रिया अतिशय योग्य आहे गरीब माणसाच्या जीवनाकडे पाहिले असता अनेक प्रश्नांना त्यांना सामोरे जावे लागते आणि या परिस्थितीशी लढताना त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रास होत असतो अशा लेखांच्याद्वारे त्यांच्या या परिस्थितीवर खरोखरच फुंकर मांडल्यासारखे होईल अतिशय योग्य लेखन आहे

सुदाम वसंत निकम 24.02.25
उत्तम विवेचन

Sujt suresh shimpi24.02.25
'जावे त्यांच्या वंशी तेव्हा कळे' अशी हि गोष्ट आहे. आपल्याला विश्वास बसणार इतके दारिद्य्र गाव खेड्यात व शहरातही आहे. लोकांना दोन वेळेचे जेवणहि पुरेसे नाहिये. इतर अभिलाषा बाळगणे तर सोडुनच द्या. आपण लिहिलेले वास्तव आहे.

Dr. Chirakhoddin pinjari 24.02.25
अगदी बरोबर आहे सर परंतु अशा योजनांमुळे सरकार झालेला पुरवठा मीडियाच्या समोर आणत असते आणि त्यामुळेच मध्यमवर्गीयांचा रोष यांच्यावर होत असतो परंतु एक जागृत समाज म्हणून गरज नसताना मेट्रो किंवा इतर गोष्टींवर जाहिरातींवर सामान्य लोकांच्या टॅक्स मधून झालेला खर्च यावर कोणी ब्रश शब्द काढत नाही हे चक्र बदलायला हवं सर

Anand Ingale24.02.25
होय, खरं आहे सर दारिद्र्याची शोधयात्रा हे पुस्तक मी वाचलं आहे खूप दाहक अनुभव आहे.

Shriniwas Bhong24.02.25
योग्य विश्लेषण

Mahendra k malame24.02.25
जी गरीब लोक आहेत त्यांना योजनेचा लाभ देणे अनिवार्य आहे त्यामुळे त्यांचे दारिद्र्य कमी होईल व त्यांच्या जीवनाचा जगण्याचा जीवनमान उंचावेल

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results