आम्ही कोण?
आडवा छेद 

ओसंडून वाहणाऱ्या तुरुंगांत ७६ टक्के कैदी गुन्हा शाबित न झालेले

  • गौरी कानेटकर
  • 30.04.25
  • वाचनवेळ 5 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
justice report

नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या इंडिया जस्टिस रिपोर्टमधून आपल्या देशातल्या तुरुंगांची अवस्था किती विदारक आहे, याचं वास्तव समोर आलं आहे. विशेष म्हणजे बहुतेक राज्यांमध्ये परिस्थिती सुधारण्याऐवजी बिघडत चालली आहे. देशातले ५५ टक्के तुरुंग क्षमतेपेक्षा कितीतरी जास्त कैद्यांनी भरून वाहताहेत. त्यापैकी तब्बल ७६ टक्के कच्चे, म्हणजे न्यायाच्या प्रतीक्षेत तुरुंगांमध्ये खितपत पडलेले कैदी आहेत. २०१६ साली केंद्राने तयार केलेलं मॉडेल प्रिझन मॅन्युअल बहुतेक राज्यांनी कागदोपत्री स्वीकारलं असलं तरी तुरुंगांमधली ही प्रचंड गर्दी, निधीची कमतरता, कर्मचाऱ्यांचा तुटवडा अशा अनेक अडचणींमुळे या मॅन्युअलची उद्दिष्टं प्रत्यक्षात येणं अवघड ठरतं आहे.

कायदा आणि सुव्यवस्था क्षेत्रातील काही महत्त्वाच्या स्वयंसेवी संस्था गेल्या पाच वर्षांपासून टाटा ट्रस्टच्या मदतीने इंडिया जस्टिस रिपोर्ट तयार करतात. पोलिस, न्याययंत्रणा, तुरुंग व्यवस्था आणि कायदेशीर मदत अशा चार बाबींमध्ये राज्यांची कामगिरी कशी आहे, याबाबतचा हा निष्पक्षपाती आणि त्यामुळे विश्वासार्ह अहवाल मानला जातो. या अहवालात या चार बाबींबाबतची राज्यांची क्रमवारीही लावण्यात आली आहे. त्यापैकी तुरुंगांबाबतची माहिती विशेष चिंताजनक आहे.

तुरुंगांच्या क्षमतेपेक्षा जास्त कैदी भरलेले असणं, कैदी आणि तुरुंग अधिकारी-कर्मचारी यांचं प्रमाण, कैदी आणि डॉक्टर-सायकॉलॉजिस्ट-सायकायट्रिस्ट यांचं प्रमाण, कैद्यांवर केला जाणारा खर्च अशा अनेक बाबींवर तुरुंगांमधली परिस्थिती जोखण्यात आली आहे. यात उत्तम कामगिरी करणाऱ्या राज्यांमध्ये अपेक्षेनुसार दक्षिणेतली राज्यं आघाडीवर आहेत. पण आश्चर्य म्हणजे मध्य प्रदेश आणि ओडिशा या दोन राज्यांनीही बराच वरचा क्रमांक पटकावला आहे. यात पहिल्या पाच क्रमांकांवर तमिळनाडू, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश आणि आंध्र प्रदेश ही राज्यं आहेत. ओरिसा सहाव्या क्रमांकावर आहे, तर महाराष्ट्राचा नंबर गेल्या सहा वर्षांत दोनवरून दहावर घसरला आहे.

आपल्या तुरुंगांची सगळ्यात मोठी समस्या ओव्हरक्राउडिंग आहे. २०१२ मध्ये देशातल्या तुरुंगांमध्ये क्षमतेच्या ११२ टक्के कैदी होते. २०२२ मध्ये हा आकडा १३१ टक्क्यांवर गेला. देशातील ५५ टक्के तुरुंगांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त कैद्यांचा भरणा आहे. त्यातल्या ८९ तुरुंगांमध्ये क्षमतेच्या २५० टक्के कैदी आहेत, तर १२ तुरुंगांमध्ये क्षमतेच्या ४०० टक्के कैदी आहेत. यात आपल्या ठाण्याच्या कारागृहाचा समावेश आहे. क्षमतेपेक्षा जास्त कैदी भरण्याबाबत महाराष्ट्रातल्या सर्वच तुरुंगांची परिस्थिती दयनीय आहे. आपल्याकडचे तुरुंग सरासरी १६१ टक्के भरलेले आहेत, असं हा अहवाल सांगतो.

क्षमतेपेक्षा कैद्यांची संख्या जास्त झाल्याने तुरुंगातल्या सर्वच व्यवस्थांवर अतिरिक्त ताण येतो आहे. प्रत्येक सहा कैद्यांमागे एक तुरुंग कर्मचारी, २०० कैद्यांमागे एक तुरुंग अधिकारी, ३०० कैद्यांमागे एक डॉक्टर आणि ५०० कैद्यांमागे एक सायकायट्रिस्ट किंवा किमान सायकॉलॉजिस्ट असावा असं अपेक्षित आहे. पण प्रत्यक्षातले आकडे काय आहेत बघा. देशात १२ कैद्यांमागे एक कर्मचारी, ६९९ कैद्यांमागे एक अधिकारी, ७७५ कैद्यांमागे एक डॉक्टर आहे. सायकायट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्ट नेमण्याबाबत तर आपण भलतेच उदासीन आहोत. सध्या देशात २२,९२८ कैद्यांमागे एक सायकायट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्ट आहे. देशातल्या तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ३० टक्के जागा रिक्त आहेत. काही राज्यांमध्ये हे प्रमाण बरंच जास्त आहे. उदा. झारखंडमधला हा आकडा तब्बल ६० टक्के आहे.

या कैद्यांमध्ये कच्च्या कैद्यांचं प्रमाण प्रचंड आहे. सध्या तुरुंगांमध्ये ७६ टक्के कैदी हे कच्चे, म्हणजे अद्याप गुन्हा शाबित न झालेले आहेत. दिल्लीतल्या कारागृहांमध्ये ९० टक्के कैदी कच्चे आहेत, तर बिहारमध्ये ८९ टक्के. बिहारपाठोपाठ उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रातही कच्च्या कैद्यांचं प्रमाण मोठं आहे. या तिन्ही राज्यांमध्ये मिळून देशातले ४२ टक्के कैदी आहेत. २२ टक्के कच्चे कैदी एकट्या उत्तर प्रदेशमध्येच आहेत.

गुन्ह्यांमध्ये वाढ होत असली तरी न्यायाची प्रक्रिया संथ असणं हे त्यामागचं मुख्य कारण आहे. पोलिस तपासातला लागणारा वेळ आणि न्यायाधीशांच्या जागा रिक्त असल्याने खटले निकाली निघण्याचं अल्प प्रमाण अशी दोन्ही कारणं त्यामागे आहेत, असं सांगितलं जातं.

कच्च्या कैद्यांमध्ये वाढ झाली आहे, तसंच त्यांचा तुरुंगातला मुक्कामही वाढला आहे. २०२२ मध्ये पाच वर्षांहून अधिक काळ तुरुंगात काढलेल्या कच्च्या कैद्यांची संख्या तब्बल ११,४४८ होती. यापैकी ४० टक्के कैदी एकट्या उत्तर प्रदेशमध्येच होते. उत्तर प्रदेश, राजस्थान, प. बंगाल आणि मेघालयातल्या कच्च्या कैद्यांपैकी १० टक्के कैद्यांना तीन ते पाच वर्षं तुरुंगात काढावी लागताहेत. याउलट आंध्र प्रदेश, मिझोराम, अंदमान निकोबार बेटं आणि लडाख इथे केवळ एका कच्च्या कैद्याला एवढा काळ तुरुंगात राहावं लागल्याची नोंद आहे. तर चंडीगढ, पाँडेचेरी, त्रिपुरा आणि लक्षद्वीपमध्ये एकाही कच्च्या कैद्याला पाच वर्षांहून अधिक काळ न्यायासाठी ताटकळण्याची वेळ आलेली नाही.

तुरुंगातली गर्दी कमी व्हावी, यादृष्टीने अनेक उपाय सुचवले गेले आहेत. त्यात शिक्षेचं गांभीर्य विचारात घेऊन कारावासाऐवजी दंड, प्रोबेशन, जामीन, पॅरोल, कम्युनिटी सर्व्हिस आणि नजरकैद अशा पर्यायांचा वापर करण्याचा अधिकार न्यायाधीशांना दिलेला आहे. पण त्याचा वापर आपल्याकडे तुलनेने कमी होतो, असं लक्षात आलं आहे. याखेरीज तुरुंगांमधली गर्दी कमी होण्याबरोबर कैद्यांना अधिक चांगली वागणूक मिळावी आणि त्यांच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी आपल्याकडे मुक्त कारागृहांची व्यवस्था आहे. देशात एकूण ९१ मुक्त कारागृहं असून त्यात एकूण कैद्यांपैकी तीन टक्के कैदी आहेत. देशातील मुक्त कारागृहांमधील कैद्यांपैकी ७० टक्के कैदी महाराष्ट्र आणि राजस्थानात आहेत आणि उरलेले ३० टक्के इतर १५ राज्यांमध्ये विखुरलेले आहेत. महाराष्ट्रात एकूण सात मुक्त कारागृहं आहेत. त्या सर्व ठिकाणी क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत, तर त्याउलट इतर राज्यांमध्ये क्षमतेच्या ५० टक्केही कैदी नाहीत.

कैद्यांवर केला जाणारा खर्चही गरजेपेक्षा कमी असल्याचं या अहवालात समोर आलं आहे. देशातील ३६ पैकी १८ राज्यं दररोज दरडोई १०० रुपयांपेक्षा कमी खर्च करतात. महाराष्ट्रात तर दर दिवशी प्रत्येक कैद्यावर फक्त ४७ रुपये खर्च केले जाताहेत. तुरुंगांसाठीच्या एकूण निधीची रक्कम वाढत गेली असली तरी कैद्यांची संख्या त्याहून जास्त वाढत असल्यामुळे प्रत्येक कैद्यावर खर्च होणारी रक्कम वाढताना दिसत नाही. त्याचे परिणाम साहजिकच तुरुंगातल्या राहणीमानावर दिसून येत आहेत.

या आणि अशा अनेक कारणांमुळे चांगली तुरुंग व्यवस्था राबवण्याचं उद्दिष्ट आपल्याला हुलकावणी देतं आहे. 

गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 4

Prashant Rodi07.05.25
युनिक फिचर्स आणि समकालीन प्रकाशन संस्था नेहमी उपेक्षित, उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती संस्था यांना visualise करत असते, सध्या च्या तुरुंगातील कार्यप्रणाली बाबत आवश्यक गोष्टीचा उहापोह सदर लेखात संपादिका गौरी कानेटकर यांनी केला असून तुरुंग, कैदी, प्रशासन, आरोग्य, न्यायव्यवस्था यांत सुधारणार आवश्यक असण्याची तीव्र गरज निकड आहे याची प्रकर्षाने जाणीव करून दिल्या बद्दल खरोखर त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजेत आणि महाराष्ट्र शासनाने त्वरित सुधारणात्मक पाऊले उचला वयास पाहिजेत. मी नियमित युनिक फिचर्स चा वाचक असून अगदीच सुरुवाती पासून, युनिक फिचर्स, अनुभव मासिक चे, समकालीन चे नित्य वाचन, आपल्या संस्थेचे प्रमुख संपादक मालक सुहास कुलकर्णी सर, सर्व स्टाफ व नियमित followup घेणारे अत्यंत सुंदर वितरण कार्य करणारे,सर्वांशी सहज संवाद साधनारे मंगेशजी दखणे त्यांचे सहकारी दिलीप पानसरे यांनी वाचकांशी घट्ट नाते निर्माण केले आहेत.सर्वांचे आभार 🙏
Mangesh30.04.25
Sundar
Rtn Dr Suchitra Sunil Kulkarni30.04.25
भयंकर आहे.लाडक्या बहिणी,सरकारी पेन्शन..अशा होणाऱ्या प्रचंड खर्चात कपात करता येईल....न्याय व्यवस्थेवर तर बोलणं अशक्य आहे
Pradeep masal30.04.25
Dear Gouri mam very nice written . as per my observation from 1995 to 2025 in this 30 yrs. who like to live safe life and run criminal network with govt currupt officers he is in jail or hospitilised .and now a days very crucial situation out side the jail .any thing will happen any time any whare .why jails are formed by whoom need to study. freedum fighters ware kept in jail and hangued if they are found fighting for freedom by british rulers. Before that forts ware there and kadelot was punishments. Afterwards jails are constructed by british . Now in independent India 1.policing is business.it is pvt ltd co. 2.only poors are chassing ipcs. 3.justice are sold failed to control govt. 4.advocate say do anything & come to me. 5.financial fraudsters had no strong threatfull punishment . 6.mp's mla's are using below 18 for crimes. 7.gundas and criminals are rulers. 8.there no death or strong punishment even he found guilty in number of murders rape frauds cases . 9.area wise local gundas running law now a days this is the fact please check . 10.murder theft rape accidents frauds cases are delayed and denied. 11.every one think that do anything pay money buy ipc go to jail back by bail. -‐------------ "Self decipline science and good manners" By harvesting good thoughts by any way only will stop this way of jail & bail. ‐------------- How we can eliminate criminal practices A] stop alcohole any how . B] stop dance bars. C] stop drugs . D] stop curruption. And Run Progressive development in Cultural social programmes festivals, picnic in all India . Publishing & spreading the 1.freedom fighters inspirative book videos. 2.great leaders speaches and writtings. 3.agriculture development and involement. 4.hystry and current developments . With this 1. farming and irrigation research and development in animal milking sectors. 2.good health and good mental health with enough income source will help to reduce this crime rate. End of the subject of jails and bails. We need to create self deceplined well cultured citizens . Now we are racing streaching society to show richness worlds no 1 that is un natural. We are worlds no 1 in crime .It is our cultural failuer .we need to find and spread humanity base culture . Branded shoe clothings apple phone laptop Imported cars costlier homes marrage etc Everything you have and no self decipline will ruine vanish everything. In goa you can find the type of crime and causes of crimes. The way of develope self decepline we need to reaserch and apply on society. We are road making for fast connectivity between city ,telephones for fast connectivity between publics. But this is happening without humanity. Healthy relations inbetween man to man and also Family,Society,city,states,countrys,neighbour,animals,germs,galaxcy should be necessary element of democracy. Every thing what we are doing to make happy easy painless life cycle for mankind.
See More

Select search criteria first for better results