आम्ही कोण?
अनुभव 

भाई माझ्या सोयगावला आले तेव्हा..

  • ना.धों. महानोर
  • 12.06.25
  • वाचनवेळ 18 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
p l deshpande

जून, २०००. मृग नक्षत्राचा पाऊस सुरू झाला होता. माझी पेरणी, झाडं लावणं चाललेलं होतं. १२ जूनला पु. ल. देशपांडे गेल्याची बातमी कळली. मी पेरणीची कामं थांबवली आणि त्या रात्रीच पुण्याला निघालो. दुसऱ्या दिवशी पुण्यात भाईंचं अंत्यदर्शन घेतलं. तिथे दिवसभर माणसांची प्रचंड गर्दी होती, पण सारं कसं शांत, नि:शब्द!

त्यानंतर तीन महिन्यांनी मी आणि माझी पत्नी पुन्हा सुनीताबाईंना भेटायला गेलो. आम्ही तिघांनीच दीड तास फक्त भाईंच्या, त्यांच्या मित्रांच्या आठवणी जागवल्या. सुनीताबाई भावविवश न होता कमालीच्या शांतपणे एकेक आठवण सांगत होत्या. “ऐंशी वर्षांचं आयुष्य भाईला मिळालं. त्याने त्याला आवडतील त्या त्या गोष्टी मनापासून केल्या. त्याच्याकडून इतकं काम कसं झालं याचं आज नवल वाटतं. त्याला सहज सुचत असे, आणि तो लिहीत जाई. रसिकांनी त्याच्या सगळ्याच कलाकृतींना मनापासून दाद दिली. त्यामुळे तो खूपच आनंदाने भरभरून जगला. त्याचा विनोद कोणाला बोचणारा नव्हता, उलट प्रसन्न करणारा होता. प्रत्येक गोष्ट समजली पाहिजे, अशा हेतूने तो लहान मुलासारखं सगळं धुंडाळत गेला. भाषणाला उभा राहिला म्हणजे त्याला आपोआप सुचत असे. लोकांशी सहज गप्पा माराव्या असं त्याचं भाषण असायचं. लोकांच्या मनातलं तो बोलायचा. भाईच्या मनात कुणाविषयीही कटुता नव्हती. त्याच्या सगळ्याच गोष्टींमध्ये मी त्याला साथ दिली. आपल्याकडचं सगळं वाटून देऊन तो गेला. शेवटी शेवटी त्याला असह्य त्रास व्हायचा. हयात नसलेल्या जिव्हाळ्याच्या मित्रांच्या आठवणी काढून तो उदास व्हायचा. पण तो खूप तृप्त मनाने, आनंदाने लोकांमध्ये राहिला. यापेक्षा चांगलं काय असू शकतं? हजारो लोकांशी पत्रव्यवहार असायचा त्याचा. मी तेच आता जुळवत बसले आहे. त्याच्यावर लोकांचं प्रेम होतंच, पण इतकं असेल असं वाटलं नव्हतं. या तीन महिन्यांत ते मी पाहते आहे. अजूनही भाई घरभर असतो...” सुनीताबाई सांगत होत्या.

माझ्या पत्नीचे अश्रू थांबत नव्हते. मी माझ्या आणि भाईंच्या एकमेकांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याबद्दल विचार करत राहिलो. मला प्रश्न पडला होता : आम्ही कोण-कुठले, इतके कसे एकमेकांशी बांधले गेलो? आमच्या अशा नात्याविषयी ज्यांना माहीत होतं त्यांनी मी त्याबद्दलच्या थोड्या तरी आठवणी लिहून काढाव्यात असा तगादा लावला होता. ‘अनेक आठवणी आहेत, तरीही मला लिहायला अवघड वाटतं,' असं मी म्हणायचो. पण सुनीताबाईही म्हणाल्या, “लिहिता आलं तर लिहा, वेगळं होईल.” त्यांच्या घरून निघताना मी ठरवलं, थोडं का होईना, लिहून काढू. औरंगाबादला परत गेल्यानंतर माझा मित्र चंद्रकांत पाटील याच्याशी बोलत होतो. आम्ही सुनीताबाईंना भेटून आल्याचं त्याला माहीत होतं. त्याबद्दल मी काही बोलण्याआधीच तो म्हणाला, “नामदेव, पुलंच्या सहवासातल्या आठवणी लिही. तुझा नेहमीचा आळशीपणा सोडलास तर एका आठवड्यात ते लिहून पूर्ण होऊ शकेल.”

मग मी लिहिण्याचं मनावर घेतलंच.

पु. ल. देशपांडे यांचं नाव साहित्य, कला, नाटक, चित्रपट, गीत, संगीत अशा अनेक क्षेत्रांत सर्वदूर थेट पोहोचलेलं होतं अशा काळात मी एका खेड्यातल्या माध्यमिक शाळेत शिकत होतो. आमचे शिक्षक साहित्यप्रेमी असल्याने आम्हाला अवांतर वाचनासाठी पुस्तकं वाचायला मिळत. त्यातच कधी तरी पु. ल. देशपांडे यांची अगदी नवीन पुस्तकंही झपाटून वाचली. ‘गुळाचा गणपती', ‘देवबाप्पा' यांसारख्या चित्रपटांतली गाणी तोंडपाठ झाली होती. त्यांनी संगीतबद्ध केलेली आणखीही किती तरी गाणी ऐकलेली होती. शाळेतल्या उत्सवात ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात' हे गाणं हमखास सामूहिकच म्हटलं जात असे. पुस्तकातील त्यांचे धडे शिकवताना शिक्षकांची व शिकताना आमची हसून हसून मुरकुंडी वळायची. असा छान काळ होता तो. त्या काळात पु. ल. देशपांडे यांचं नाव मनावर घट्ट कोरलं गेलं.

p l deshpande

मात्र पु. ल. देशपांडेंशी आपली भेट होईल असं मला कधीही वाटलं नव्हतं. ती भेट घडली माझ्या कवितेमुळे. मला कवितांचा छंद कसा जडला हे सांगणं आजही कठीणच आहे; परंतु काहीच आगापीछा नसताना कवितेने मला वेढून टाकलं होतं हे खरंच. १९६०च्या दशकात वेगवेगळ्या नियतकालिकांमधून माझ्या कविता छापून यायला लागल्या होत्या. (बऱ्याचदा त्या ‘साभार परत' देखील यायच्या.) १९६४ सालच्या ‘मौज' दिवाळी अंकात ‘चार कविता रानातल्या' या शीर्षकाने माझ्या कविता प्रकाशित झाल्या. लगोलग दिवाळीतच मला एक पत्र आलं : ‘मौज' दिवाळीतल्या ‘चार कविता रानातल्या' वाचल्या, माझी दिवाळीच नाही, तर वर्ष साजरं झालं; कधी, कुठे भेटणार; काय करता; इत्यादी बरंच काही त्या पत्रात होतं. पत्र पार्ल्याहून आलेलं होतं आणि खाली नाव होतं- पु. ल. देशपांडे. केवळ कवितेमुळे हा पत्रव्यवहार झाला आणि ध्यानीमनी नसताना माझा भाईंशी परिचय झाला.

१९६५च्या डिसेंबर महिन्यात हैदराबादला अखिल भारतीय साहित्य संमेलन होतं. प्रसिद्ध समीक्षक वा. ल. कुलकर्णी संमेलनाचे अध्यक्ष होते. मी आणि चंद्रकांत पाटील, आम्ही दोघांनी मिळून केवळ कवितेच्या निस्सीम प्रेमापोटी ‘पुन्हा कविता' या कवितासंग्रहाचं संपादन केलं होतं. प्रकाशक म्हणून आमचे मित्र रायभान यांचं नाव टाकलेलं होतं. पुस्तक वा. ल. कुलकर्णी यांना अर्पण केलेलं होतं. या कवितासंग्रहाची एक एक प्रत संमेलनाच्या ठिकाणी आलेल्या मान्यवरांना भेट द्यावी असं आमच्या मनात होतं. संमेलनाच्या उद्घाटनासाठी कामराज, यशवंतराव चव्हाण, ब्रह्मानंद रेड्डी इत्यादी मोठी मंडळी आलेली होती. उद्घाटनाचा मुख्य समारंभ आटोपल्यावर त्यांच्या गाड्यांचा ताफा भर्रकन निघाला आणि गर्दी पांगली. चंद्रकांत व मी मिळून नरहर कुरुंदकरांना भेटलो. आमच्याजवळ ‘पुन्हा कविता'चा मोठा गठ्ठा होता. कुरुंदकर म्हणाले, “आधी त्यांना द्या.” त्यांनी ज्या दिशेला बोट दाखवलं तिथे एक लांबसडक मोठी मोटारगाडी उभी होती; मोटारीजवळ पाच-दहाजण बोलत उभे होते. ती मोटारगाडी पु. ल. देशपांडेंची होती. कुरुंदकरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पु. ल. देशपांडे यांना पुस्तक दिलं. त्यांच्याशी प्रथमच प्रत्यक्ष भेट झाली होती. चंद्रकांत, मी, आमचे आणखी दोन मित्र रवींद्र सुर्वे, बाळ कवठेकर असे जरा संकोचूनच उभे होतो. पु.ल.नी आनंदाने माझ्या खांद्यावर हात टाकला. त्यांनी अगदी अगत्याने ‘पुन्हा कविता' चाळलं आणि म्हणाले, “पाडगावकर, करंदीकर, बापट यांच्यानंतरच्या अतिशय ग्रेट कविता लिहिणाऱ्या कवींचे कवितासंग्रह यावेत असं मला खूप दिवसांपासून वाटत आहे. ‘साहित्य', ‘छंद', ‘अभिरुची', ‘सत्यकथा', ‘प्रतिष्ठान' यांमधून एकेक कवी काय छान लिहितो आहे! तुम्ही हे प्रातिनिधिक का होईना, ओळख करून देणारं पुस्तक केलं, म्हणून मनापासून धन्यवाद! आरती प्रभू, चित्रे, पुरुषोत्तम पाटील, भालचंद्र नेमाडे, म. म. देशपांडे, मधुकर केचे, नारायण सुर्वे, तुळशीराम काजे, ग्रेस, अरुण कोलटकर, आनंद यादव, वि. ज. बोरकर, आ. ना. पेडणेकर असे पस्तीस तरणेबांड कवी म्हणजे काय बहार आहे!” गेल्या वर्षी कोणकोणत्या दिवाळी अंकांत या नव्या कवींच्या मराठी कविता वाचल्या हे देखील त्यांनी सांगितलं. ते ऐकल्यावर आम्ही चाटच पडलो. पु.ल. कवितेचे इतके चाहते असतील याची आम्हाला जराही कल्पना नव्हती. त्यांनी आमच्या कवितासंग्रहाच्या आणखी दोन प्रती आवर्जून मागून घेतल्या; ‘लिहीत रहा' म्हणाले. तिथे आचार्य प्रल्हाद केशव अत्रेही होते. त्यांनी ‘पुन्हा कविता'ची प्रत चाळली आणि ते म्हणाले : “अरे बाप रे! इथे पुन्हा कवी, इतके कवी... कठीण आहे.” जयवंत दळवी व ज्ञानेश्वर नाडकर्णी यांनाही आम्ही एक एक प्रत दिली. (दोघांनी ‘ललित'मध्ये व एका इंग्रजी नियतकालिकात त्यावर जोरदार लिहिलं.)

१९६७ साली ‘रानातल्या कविता' हा माझा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. महाराष्ट्रभर त्याचं उत्तम स्वागत झालं. शासनाचे व इतर अनेक पुरस्कार त्याला लाभले. त्या कवितांशी मराठी रसिकांचं निस्सीम प्रेमाचं नातं जुळलं. भाई कुठल्याकुठल्या भाषणांमध्ये त्या कवितांचा उल्लेख करत असत. भाईंचा आणि माझा पत्रव्यवहार वाढत होता. सुनीताबाईही अनेकदा पत्रं लिहीत. माझ्या कवितेबरोबरच माझं खेडं, कुटुंब, जगणं, शेतीवाडी, सगळं काही दोघांनी आपलं मानलं होतं. त्यांचं पत्र यायचं-‘पळसखेडला यायचं मनात आहे.' त्यावेळी पळसखेड म्हणजे जेमतेम दोनशे उंबऱ्याचं, हजार लोकवस्तीचं लहानसं खेडं होतं. तिथे या दोघांना कसं काय बोलावणार, असा मला प्रश्न पडायचा. गावात साहित्यपूरक वातावरण तर दूर, त्यांच्या राहण्याची व्यवस्था करणंही अवघड होतं. मी माझ्या शेतातल्या लहानशा झोपडीत राहायचो. घरात किंवा गावात दैनंदिन मूलभूत सोयीही नव्हत्या. त्यामुळे अनेक दिवस मी हा विषय टाळतच होतो.

मात्र १९७४च्या आसपास एकदा भाईंचं पत्र आलं- ‘बाबा आमट्यांच्या आनंदवनाला भेट देऊन परत येताना आम्ही जळगावी उतरून तुमच्या घरी तुमच्या शेतावर दोन-तीन दिवस थांबणार आहोत. यात बदल नाही. सोबत कविवर्य बोरकर, त्यांची मुलगी, तुमचे-आमचे शेतकरी मित्र बापू कांचन व गोविंदराव तळवलकर, मधू गानू, सुनीता असे सर्वजण आहोत. मजा येईल.'

पत्र वाचून मला खूप आनंद झाला. पण गावात या सर्वांचा पाहुणचार कसा करायचा या विचाराने घामही फुटला. जळगावहून माझे मित्र डॉ. राम आणि डॉ. उषाताई आपटे सर्वांना घेऊन पळसखेडला आले. एकूण तीन-चार मोटारगाड्या होत्या. पण गावात आल्यावर एकाच गाडीभोवती मुलांची, लोकांची गर्दी झाली. भाई प्रसन्नपणाने हसत बाहेर आले. मी म्हणालो, “भाई, यांना पु. ल. देशपांडे यांच्याबद्दल अजिबातच माहिती नाही. सुनीताबाई गाडी चालवत आल्या हे त्यांना फारच नवलाईचं वाटतंय, इतकं हे खेडं आहे.” ते ऐकून सुनीताबाई छान हसल्या. भाईंनी आम्हाला चक्क टाळी वगैरे दिली. त्यांच्या मनमोकळ्या वागण्याने आम्हालाही जरा हलकं वाटलं. माझ्या घराच्या ओट्यावर लाल पागोटं व रुमाल बांधलेले, धोतर नेसलेले माझे वडील उभे होते. कपाळावर लालजर्द कुंकू लावलेली आईही होती. सोबत माझी पत्नी, भाऊ, सगळं घरच स्वागताला उभं होतं. भाईंनी बाबांना, आईला नमस्कार केला. माझ्या वडिलांच्या डोळ्यांत पाणी तरळलं. भाईंचे डोळेही आनंदाने भरून आले होते.

p l deshpande

घरात ऐसपैस मनमोकळं बसल्यावर भाईंची मैफल सुरू व्हायला वेळ लागला नाही. त्यांनी त्यांच्या बरोबरच्या सगळ्यांची ओळख करून दिली. कोकणात म्हणजे बोरकरांच्या प्रदेशात खेडंही रम्य व सुंदर असतं. आता सगळे माझ्या दुष्काळी, उद्ध्वस्त चेहऱ्याच्या लहानग्या खेड्यात आले होते. बापू कांचन यांनी त्यांच्या द्राक्षांच्या बागेतली चविष्ट द्राक्षं भेट दिली. माझे वडील लिहिता-वाचता न येणारे; बापू थोडीफार शाळा शिकलेले. पण शेती या आवडत्या विषयामुळे दोघांची बघता बघता गट्टी जमली. दोघं शेतीच्या, इकडच्या तिकडच्या पिकांच्या, विहीरपाण्याच्या, शेतीच्या परिवर्तनाच्या गप्पा मारत होते. भाई म्हणाले, “अहो, आम्हाला यातलं काहीच कळत नसलं तरी मोठ्यांदा बोला. काही शिकता आलं नाही, तरी तुमचं बोलणं समजेल तरी. सगळ्या क्षेत्रातलं चांगलं ते समजून घेतलंच पाहिजे.” आणि मग बापू, माझे वडील आणि अधूनमधून मी अशा आमच्या तिघांच्या शेतीवरच्या गप्पा भाई व इतर तासभर मनसोक्त ऐकत बसले. गोविंदरावांनाही खूप काही नवीन ऐकायला मिळालं. किती तरी विषय... कविता, गाणं, शेती, खेडी... बाबा आमट्यांच्या आनंदवनाबद्दलच्या चर्चाही होत्याच. त्या महामानवाबद्दल भाई भरभरून बोलत होते. सगळे अस्वस्थ होऊन ऐकत होते. मध्येच सुनीताबाई एखादी पूरक आठवण सांगायच्या. जेवणाची वेळ टळून गेली तरी ही गप्पांची मैफल सुरूच होती.

जेवणानंतर सर्वांनी मिळून गावात फेरफटका मारला. गावातली बहुतांश घरं मोडकळीस आलेली; लोकांच्या पेहरावावरून, चेहऱ्यावरून कळून येणारं दारिद्य्र; गावात केवळ चौथीपर्यंतची शाळा; बहुतेक गावकरी अशिक्षित; हे सगळं पाहून भाई अस्वस्थ झाले. त्यांना प्रश्न पडला- अशा ठिकाणी हा कवी? याच्या कवितेत दिसलेला सुंदर व रम्य निसर्ग, शेती, पक्षी... कशाचाच गावात पत्ता नाही. सगळंच विपरीत, ओकं ओकं.

संध्याकाळी पाच वाजता आम्ही माझ्या बरड टेकडीवरच्या शेतावर पोहोचलो. लदबदल्या झऱ्यातून आम्ही पुढे गेलो. विहिरीचं पाणी दंडाने झुळझुळ वाहत होतं. केळीच्या प्रत्यक्ष वाफ्यात साचलेलं पाणी शुभ्र लहान तळ्यासारखं दिसत होतं. त्यात कमलिनी केळीचं सुंदर प्रतिबिंब पडलेलं होतं. भाई, बोरकर, गोविंदराव, सुनीताबाई, बापू सारी मंडळी आत केळीच्या बागेत हरवली. भाईंचं गाणं सुरू झालं-‘केळीचे सुकले बाग, असून निगराणी...' सगळ्यांनी ताल धरला. केळीचे भरघोस घड, वाहतं पाणी, हिरवी नीरव शांतता, पलीकडे गव्हाचं कापणीला आलेलं पिवळं जर्द पीक, ज्वारीचा खोडवा, त्याला मोठ्ठाली कणसं... हजार-दोन हजार पक्षी, राघूंचा थवा हे सर्व पाहून सगळेच पळसखेड गावाचं उद्ध्वस्तपण विसरले. भाईंनी ‘पक्ष्यांचे लक्ष थवे, गगनाला पंख नवे...' सुरू केलं. पिकांसकट पाखरांनीही ताल धरला. बोरकरांनी पायांचा ठेका धरला. पायांखाली दगड-धोंडे होते, आसपास वैराण टेकड्या होत्या, पण त्यात आता स्वर्ग उभा राहिला होता. भाई, गोविंदराव बोलत राहिले. जळगाव, औरंगाबाद, अन्वीहून आमचे शेतकरी मित्र आले होते. कमी खर्चात, कमी पाण्यात आलेल्या या सुंदर पिकांचं गणित; नफा-तोटा, शेतीसाठी लागणारे परिश्रम, नवीन तंत्रज्ञान, नवी वाणं यासंबंधी कुमार अन्वीकर व मी सांगितलं. भाईंनी, गोविंदरावांनी अनेक प्रश्न विचारले व माहिती घेतली. भाईंना खूप जिज्ञासा होती; सगळं समजून घ्यायचं होतं. चार तास फक्त शेती व शेतीसंबंधीच गप्पा सुरू होत्या. जळगावचा आमचा एक मित्र म्हणाला, “भाई, इतकं शेतीचं तुम्ही कशासाठी चालवलंय?” त्यावर ते म्हणाले, “अहो, हा कृषिसंस्कृतीचा देश आहे हे आपण विसरता. त्यातली थोडी तरी अक्कल आपण उसनी का होईना, घेतली पाहिजे. शिवाय, बापू कांचन, कवी महानोर हे आमचे खास मित्र आधी शेतकरी आहेत ते काही उगाच नाही.”

अशाच गप्पांमध्ये रात्रीचे नऊ वाजले. ती माघ पौर्णिमा होती. भाई म्हणाले, “आता घरी नाही जायचं. इथल्या मोसंबीतल्या बागेत, तिथल्या झोपडीत आपण थोडा वेळ गप्पा मारू. माझ्या डोळ्यांसमोरून ती सोन्यासारखी फळांनी लगडलेली, बहरलेली बाग जात नाही. कवीइतकाच तिनेही मला लळा लावला आहे.”

औरंगाबाद, जळगावहून आलेले आमचे मित्र परत गेले. बागेत भाई, सुनीताबाई, गोविंदराव, बापू, बोरकर, त्यांची मुलगी वज्रप, डॉ. राम आपटे, रामराव, भय्या, दादा नेवे आणि आम्ही पाच-सात घरातले- एवढी मंडळी होती. रात्रीचा शांत परिसर. सहा एकरांची मोसंबीची बाग. पौर्णिमेचं स्वच्छ चांदणं. भाईंना ना. घ. देशपांड्यांच्या ‘शीळ'मधल्या ‘नदीकिनारी'ची आठवण आली. त्यांनी त्यांच्या खास पद्धतीने ती कविता म्हणायला सुरुवात केली. ते मध्येच अडले तेव्हा सुनीताबाईंनी पुढील ओळी सांगितल्या. नंतर मी. असं सगळ्यांनी मिळून त्या कवितेचं समूहगान करून टाकलं.

लगेच भाईंना लोवलेकरांची कविता आठवली-

चोरल काढ...पाऊल वाट
हळूहळू जाईल श्यामाराणी
घाटावर आणाया पाणी
हरळी दाट
मऊ सपाट
पुन्हा अभिरुचीतली,
रेखीव अंगलटीवर साडी
स्वच्छंदी
खडी शुभ्र पांढरी
कृष्ण किनारी मोर
पारधिणीची फंद फितुरी
विलोल नयनी भोर
डोंगर कठड्यांमधून जाते
तरणीताठी पोर.

डॉ. आपटे व मी गमतीने सुनीताबाईंना म्हणालो, “बघा, भाई कुठे निघून गेले! या रानात ते फार बहकले!” त्यावर त्या म्हणाल्या, “अहो, भाईंचं ते खास बहकणंच तर माझ्या आयुष्यातली मजा आहे! भाई असा कधीतरीच छान खुलतो. आता त्याला वाटतं, त्याच्यासमोर हजार लोक आहेत.”

मग मी व सुनीताबाईंनी त्या मोसंबीच्या बागेला अनेक कवींच्या कविता ऐकवल्या. बागेतली हजारभर झाडं छान ऐकत होती, डोलत होती. बोरकरांनीही खूप कविता ऐकवल्या. मध्येच उठून ते मनसोक्त गात नाचू लागले. भाईंनी अंगावरची शाल फेकून दिली व ते त्यांना ताल देत कुर्निसात करायला उभे राहिले.

भाई खुलून गेले होते. लांबच लांब झाडांच्या रांगा पाहताना ते आणखीनच आनंदी दिसत होते. मी त्यांच्याशी बोलत होतो. बोरकर म्हणाले, “आम्हाला तरी कळू द्या... फक्त दोघांमध्येच चाललंय.” त्यावर भाई म्हणाले, “एक हजार झाडांची मोसंबीची बाग. पंधरा-पंधरा फुटांवरची चौरस झाडं. माघ पौर्णिमा. टिपूर चांदणं झाडांवरून उतरलेलं. प्रत्येक झाडाखाली झाडा-झाडांच्या सावल्या, गर्द काळपट. चार झाडांच्या मध्ये उतरलेलं चांदण्याचं झाड- प्रत्येक चौरसात. हे चांदण्याचं झाड हलताना, वाऱ्याने नाचताना, तुमच्या कविता ऐकताना दिसतंय. ते खरं झाड नाहीच. त्याचं नृत्य बदलत्या कवितेवर, वाऱ्यावर वेगवेगळं आहे. जरा डोळे बारीक, किलकिले करून बघा. अख्खी एक हजार झाडं, झाडं नसलेली चांदण्याची झाडं हलताहेत, तुमच्यासोबत ताल धरताहेत. महानोर म्हणताहेत, मी लहान कवी. हे खूप सुंदर असं चित्र मला टिपताच आलं नाही कवितेत. बोरकरांना सांगा...ते कधी तरी लिहितीलही...” सगळ्यांनी तशा डोळ्यांनी चांदण्यांची बाग पाहिली. सगळेच चकित झाले, वेडे झाले. इतका सुंदर, नि:शब्द निसर्ग त्यांनी कधी बघितलाच नसावा.

शेवटी सगळ्यांनी मिळून ‘सरीवर सरी' गायलं आणि मग जड पावलांनी सगळी मैफल तिथून उठली. फर्दापूरच्या अजिंठा रेस्ट हाऊसमध्ये सर्वांची रात्रीची सोय केलेली होती. तिथे आणखी पन्नास-साठ मित्रमंडळी वाट पाहत होती. रेस्ट हाऊसच्या सुंदर देखण्या परिसरात परत एकदा मैफल सुरू झाली तेव्हा पहाटेचे तीन वाजले होते.

p l deshpande

सकाळी सुनीताबाई व मी लवकर उठलो. रेस्ट हाऊससमोर झाडं होती. आम्ही दोघं तिथे गप्पा मारत बसलो. थोड्या वेळाने भाई विष्णुदासनाम्याचा अभंग गुणगुणत आले. समोर डोंगर, झाडी होती; दूरवर अजिंठा लेणी दिसत होती. भाई आणि सुनीताबाई खूप प्रसन्नपणाने सगळ्या परिसराकडे पाहत होते. मी म्हटलं, “भाई, आज आपण सोयगावला जाऊ या. तालुक्याचं गाव आहे. दहा हजार वस्तीचं. रात्री तिथले प्राध्यापक, विद्यार्थी आले होते. तिथे आम्ही नव्याने कॉलेज सुरू केलं आहे. तिथे भेट देऊ.” त्यावर भाई गडबडीने म्हणाले, “कवी, आम्ही जंगलात, रानात फिरू. कॉलेज, तिथे माझा परिचय, ते भाषण, इत्यादी अजिबात नको.” सुनीताबाईंनीही पक्का विरोध दर्शवला.

त्यावर मी त्यांना सोयगावची आणखी माहिती दिली- “भाई, सोयगाव हे तीन हजार लोकवस्तीचं खेडं होतं त्याआधीपासून त्या गावात नाट्यवेडे रसिक, कलावंत होते. मुंबई-पुण्याप्रमाणे इथल्या रंगभूमीवर साठ-सत्तर वर्षं ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, सामाजिक आणि विशेषत: संगीत नाटकं चालली. गावातल्या ‘श्रीराम नाटक मंडळा'ची स्थापना १९०५ सालातली आहे. गावाने स्वत:चं प्रचंड मोठं नाट्यगृह बांधून काढलं. लोटू भाऊ पाटील नावाच्या रसिक माणसाने, कलावंताने नाटकांसाठी लागणारे पडदे-पेटी-तबला, इतर आवश्यक गोष्टी स्वत: विकत घेतल्या. त्याच नाट्यगृहात जयराम शिलेदार व जयमाला शिलेदार यांचं लग्न लागलं. तिथल्या रंगमंचावर नटवर्य नानासाहेब फाटक, भालचंद्र पेंढारकर, मा. भार्गवराम, मा. दामले, मा.दीनानाथ मंगेशकर, कृष्णराव अग्रवाल, दामूअण्णा मालवणकर, वसंत शिंदे, दाजी भाटवडेकर, रघुनाथराव शितूत, बाळ कोल्हटकर, राम जोशी, जयराम शिलेदार, विमलबाई कर्नाटकी, किशोरी पाठक, शांताबाई फाटक, शंकरराव जोशी, प्रकाश घांग्रेकर, नटवर्य नानासाहेब चाफेकर, चंद्रकांत गोखले, रा. वि. राणे अशा बऱ्याच दिग्गजांनी हजेरी लावली, नाटकं सादर केली. काही जुन्या गावकऱ्यांच्या सांगण्यानुसार लोटू भाऊ पाटील यांनी या आघाडीच्या नाट्यकर्मींबरोबर भूमिका केल्या होत्या.”

हे समजल्यावर मात्र भाईंना उत्सुकता वाटली. त्यांनी आणखीही काही माहिती विचारली. आणि मग त्यांनी आणि सुनीताबाईंनी आपला विचार बदलून सोयगावला येण्याचं नक्की केलं.

मी सोयगावला एक दिवस आधीच भाई आणि सुनीताबाई येणार असल्याचं कळवलेलं होतं. त्यांच्या स्वागतासाठी निदान एक हार, फोटोग्राफर तरी तयार ठेवा अशी कॉलेजला विनंती केली होती. पण आम्ही तिथे पोचलो तर तशी काहीही तयारी तिथे दिसली नाही. कॉलेजच्या प्राचार्यांनी त्यामागचं कारणही सांगितलं. तो परिसर शिक्षणापासून खूप लांब होता. तीन-चार वर्षांपासून प्राचार्य आणि त्यांचे सहकारी कॉलेजसाठी विद्यार्थी जमवण्याचा आटापिटा करत होते. गावागावांतून ज्वारी, बाजरी, मीठ, मिरची, पैसा जमा करून, खेड्यांतल्या मुलांच्या जेवणाची सोय करायची आणि मग त्यांना कॉलेजच्या वर्गांत बसवायचं, असे त्यांचे प्रयत्न चालू होते. अशा परिस्थितीत कुणी साहित्यिक गावात आला तरी त्यांची सरबराई करणं त्यांच्या आवाक्यातलं नव्हतं. आणखी पाच-एक वर्षं तरी ही परिस्थिती अशीच राहणार, अशीही खंत त्या प्राचार्यांनी बोलून दाखवली.

औरंगाबादहून आमच्या शिक्षणसंस्थेचे अध्यक्ष बाबुराव काळे आले होते. भाईंच्या स्वागताची काहीही तयारी नसल्याचं पाहून ते भयंकर संतापले आणि म्हणाले, “लाख रुपये देऊनही न येणारा लाखमोलाचा माणूस आपल्या गावात भेट द्यायला आलाय हे कळत कसं नाही?” मात्र कॉलेजकडे त्याचं उत्तर नव्हतं. बाबुरावांनीच धावपळ करून, जवळच्या शेंदुर्णी गावात जाऊन हार वगैरे आणले. त्यांचा रागरंग पाहून मी भाईंना व इतरांना नाट्यगृहाकडे घेऊन गेलो. तिथे त्या काळातले रंगभूमीचे पडदे, इतर साहित्य, वाद्यसंगीतासाठीचा सगळा साज, त्या काळातल्या नाटकांच्या जाहिराती, तिकीट सगळं पाहुण्यांना दाखवलं. जुन्या काही लोकांनी थोडी माहिती दिली. नाट्यगृह पाहून भाई थक्क झाले आणि म्हणाले, “हे नाट्यगृह अतिशय देखणं आहे. पक्कं बांधलेलं. इतकं सुंदर नाट्यगृह मी खेड्यात कुठेही पाहिलेलं नाही. फक्त मुंबई-पुण्यात. ग्रीक रंगमंचासारखं आहे हे. त्याची बांधणी, गॅलरी इत्यादी सगळं काही छानच आहे.” त्या नाट्यगृहाच्या रंगमंचावर ते खूप वेळ नुसते उभे राहिले. सगळ्या नाट्यकृतींचा, कलावंतांचा झंकार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. ते भलतेच प्रसन्न, खुषीत आलेले दिसले. कमलाकर सोनटक्के, नारायणराव काळे, सोपानमामा बोर्डे, विष्णू काळे, नाईक गुरुजी, आणखी नवे-जुने बरेच लोक जमले होते. भाई बोलत होते, सगळे ऐकत होते. भाईंनी नंतर त्यांच्या नाट्यपरंपरांच्या कथा-कहाण्या ऐकवल्या. आम्ही सगळे ऐकत राहिलो. एवढा मोठा कलावंत त्या नाट्यगृहाला, रंगमंचाला हात लावून नमस्कार करता झाला, तेव्हा सगळेच पाहत राहिले. सोयगावची नाट्यपरंपरा भाईंच्या भेटीने, बोलण्याने पुण्यवंत झाली.

भाईंच्या स्वागताचा छोटासा का होईना कार्यक्रम करण्याची सर्वांचीच इच्छा होती. मग गावातल्या शाळेच्या प्रांगणात खुर्च्या मांडल्या गेल्या. बाबुराव काळे, भाई, बोरकर त्या खुर्च्यांवर बसले. मी महत्प्रयासाने सुनीताबाईंनाही व्यासपीठावर आणून बसवलं. (त्या व्यासपीठावर येणं टाळायच्या.) समोर तरुण प्राध्यापकवर्ग, गरीब विद्यार्थी-विद्यार्थिनी, गावातले थोडेफार लोक बसलेले होते. उपलब्ध असलेला एकमेव हार मी बाईंना घातला. दोन शाली आणलेल्या होत्या, त्या बोरकर व भाईंना दिल्या.

बाबुरावांनी गावातल्या कॉलेजची गोष्ट मोकळेपणाने सांगितली. मग भाई बोलायला उठले. आम्ही केलेलं तुटकंफुटकं स्वागत विसरून ते खूप वेळ मनसोक्त आणि दिलखुलासपणे बोलत राहिले. “माझ्या व सुनीताच्या रजिस्टर म्हणवल्या जाणाऱ्या विवाहाच्या वेळी हारसुद्धा नव्हता, इतकं ते आमच्या पद्धतीने झालं. आज एका फुलांच्या हाराने कवीने आम्हाला बांधलं. फार तर लग्न लावलं म्हणा! केवळ आमच्या कवीमुळेच आम्ही हे ऐकून घेतलं, स्वीकारलं. हे नाट्यतीर्थ, याच्या भेटीने मी पावन झालो. इथल्या मोठ्या ऐतिहासिक घटनांचे तुम्ही धनी आहात हे तुम्ही विसरू नका. नाट्यपरंपरेच्या इतिहासात हे का म्हणून येत नाही? आमच्या मुंबई-पुण्याचं सुतळीभर असलं तरी भलं मोठं होऊन येत असतं. रसिकहो, शरीराला स्नान घालतं ते पाणी व मनाला स्नान घालतं ते तीर्थ. मल्लिकार्जुन मन्सूर, कुमार गंधर्व, बाबा आमटे अशी माझी तीर्थक्षेत्रं आहेत. आज मी ज्या बाबा आमटे यांच्या तीर्थक्षेत्रावरून आलो त्यांच्या मुक्तांगणातलं थोडं सांगतो... (मुक्तांगण म्हणजे भाईंनी आर्थिक मदत दिली त्यातून सुरू केलेले विविध प्रकल्प आहेत.). ही खेडी, इथली माणसं, दु:ख-दारिद्य्र मला ओरबाडून टाकतं. हे गुणी विद्यार्थी, प्राध्यापक कसं काय काम करतात मला कळत नाही. या खऱ्याखुऱ्या आडवळणांच्या गावी काम करणाऱ्यांसंबंधी मला दाटून येतं. इथे महाराष्ट्राची नाट्यपरंपरा वाढली, संपन्न झाली, इतका रसिकवर्ग खेडोपाडी होता, आहे. इथे जी नाटकं आणि कलावंत आले ते ऐकून मलाही आश्चर्य वाटलं. मला हे माहीत कसं नव्हतं?”

भाई जगभरच्या प्रश्नांवरही खूप बोलले. कविवर्य बोरकरांनी दोन-तीन कविता वाचल्या. निघताना सुनीताबाईंनी सगळ्या प्राध्यापकांची, विद्यार्थ्यांची ओळख करून घेतली. जर्जर अवस्थेतलं होस्टेल, तिथलं जेवण पाहिलं. मग त्यांनी एक चेक लिहून माझ्या हाती दिला आणि म्हणाल्या, “या होस्टेलच्या गरीब विद्यार्थ्यांना भाईंकडून खाऊसाठी थोडंफार दिलं आहे. नाही म्हणू नका.”

कोणतीही सोय नसलेलं ते शाळेचं प्रांगण, परिस्थितीशी झगडणारं कॉलेज, गावाचं नाट्यवेड सांभाळणारं नाट्यगृह, सर्वच भाईंच्या उपस्थितीने सुंदर होऊन गेल्याचं त्यादिवशी सोयगावने पाहिलं.

(समकालीन प्रकाशनाच्या 'पु. ल. आणि मी' या पुस्तकातून साभार.)

ना.धों. महानोर







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

अमिता नायडू12.06.25
फारच सुंदर आठवण! वाचताना आपण प्रत्यक्ष तिथं हजर असल्यासारखं वाटत होतं.
श्री विजय प्रल्हाद सांबरे 12.06.25
खुपच सुंदर... केवळ अलौकिक अशा आठवणी.
See More

Select search criteria first for better results