
मॉन्सून म्हणजे आपल्या देशाची लाइफलाइन. या मॉन्सूनचं आपल्या एक आगळं-वेगळं नातं आहे. ते फक्त अर्थकारणाशी जोडलेलं नाही, तर लोकांच्या समजुतींशी, परंपरांशी, त्यांच्या भावनांशी जोडलेलं आहे. ते समजून घ्यायचं तर मॉन्सूनसोबत भटकायला हवं. पुण्यातील एका तरूण पत्रकाराने हे आव्हान स्वीकारलं आणि देश पालथा घालण्यासाठी एक पंचवार्षिक योजना आखली- प्रोजेक्ट मेघदूत. त्याचा पहिला टप्पा होता- केरळ ते महाराष्ट्र. मॉन्सूनचे बहुरंग उलगडणाऱ्या त्या दिवसांना दिलेली ही धावती भेट..
रणरणता मे महिना संपलाय आणि जून उजाडलाय. पाण्याच्या टंचाईने सारा महाराष्ट्र बेहाल झालाय. दुष्काळाचं सावट पडलंय. ते दिवसेंदिवस गहिरं होत चाललंय.
या पाणीटंचाईची अनेक कारणं आहेत. बरीचशी मानवनिर्मितही. त्यावर अनेक उपायही सुचवले जाताहेत; पण सध्या तरी त्यावरचा एकमेव नैसर्गिक तोडगा आहे ‘मॉन्सून'! या मॉन्सूनची आपण आज सारेच आतुरतेने वाट पाहतोय.
गेली सहा वर्षं मी हवामानाचं रिपोर्टिंग करतो आहे. एक पत्रकार म्हणून हा मॉन्सून अनुभवतो आहे आणि त्या मॉन्सूनचे वर्षभर होणारे बरे-वाईट परिणामही पाहतो आहे. एप्रिलमध्ये हवामान खात्यातर्फे दिला जाणारा दीर्घकालीन अंदाज, महाराष्ट्रातलं मॉन्सूनचं आगमन, संपूर्ण हंगामात त्यात होणारे चढ-उतार आणि पावसाळा संपला की त्या हंगामाचा आढावा याचं रिपोर्टिंग करताना मॉन्सूनशी ओळख करून घेण्याची, त्याचा अभ्यास करण्याची संधी मला मिळाली. पण हा अभ्यास म्हणजे काय होतं, तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिलेली आकडेवारी आणि हवामानतज्ज्ञांचे कोट्स घेऊन केलेल्या बातम्या. पण त्यामुळेच मॉन्सून या प्रकरणाबद्दल माझ्या मनात अपार उत्सुकता निर्माण झाली. कमी दाबाचा पट्टा, मॉन्सून ट्रफ, ऑफशोअर ट्रफ, सायक्लोन, डिप्रेशन असे शब्द हवामानाच्या बातम्यांमध्ये नेहमी असायचे. त्यांचे अर्थ मला माहिती होते; पण हे प्रत्यक्षात घडतं तेव्हा त्या त्या प्रदेशात नेमकं काय होतं, मॉन्सून भारतात दाखल कसा होतो, वर कसा सरकतो, त्याचे परिणाम काय होतात, असे अनेक प्रश्न मनात उमटत होते. मॉन्सून म्हणजे आपल्या देशाची ‘लाइफलाइन' आहे, तर या तिच्यासोबत प्रवास करून पाहावा, मॉन्सूनच्या स्वागताला केरळात जावं आणि त्याच्या साथीने देश पालथा घालावा, असा विचार माझ्या मनात सतत घोळू लागला होता.
दोन वर्षं ही कल्पना सतत माझ्यासोबत होती. त्याच दरम्यान अलेक्झांडर फ्रेटर या ब्रिटिश पर्यटक लेखकाचं ‘चेसिंग द मॉन्सून' हे पुस्तक हातात पडलं आणि या कल्पनेला मूर्तरूप येऊ लागलं. १९८७ मध्ये फ्रेटर यांनी मॉन्सूनपूर्व काळापासून भारतात तळ ठोकला होता. त्या वेळी कडक उन्हाळ्यामुळे उत्तर मध्य भारतात निर्माण झालेली दुष्काळी स्थिती त्यांनी अनुभवली आणि नंतर मॉन्सूनच्या दक्षिण भारतातील आगमनापासून त्याच्याबरोबर उत्तरेच्या दिशेने पाठलाग केला. या प्रवासात मॉन्सूनचा भारतातील विविध समाजघटकांशी असणारा संबंध काय हे त्यांनी विविध शहरांमध्ये, गावांमध्ये लोकांशी संवाद साधून जाणून घेतलं. त्रिवेंद्रम ते दिल्ली आणि नंतर चेरापुंजीपर्यंतच्या त्यांच्या या प्रवासाचं जिवंत चित्रण त्यांनी ‘चेसिंग द मॉन्सून'मधून केलं आहे. हे पुस्तक वाचताना त्याच्यातील निवडक आणि मर्यादित व्यक्तिचित्रांच्या पलीकडे मॉन्सूनचं आणि भारतीय जनजीवनाचं अतूट नातं असल्याचं जाणवत होतं. त्या नात्याचे विविध पैलू उलगडायचे तर हा प्रवास आपणही करून बघायलाच हवा, असं माझ्या मनाने घेतलं आणि ‘प्रोजेक्ट मेघदूत' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी सुरू झाली.
कालिदासाने शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेल्या ‘मेघदूत' या काव्याचं साहित्यिक महत्त्व सर्वांना माहिती आहेच; पण त्याने रेखाटलेल्या मेघाच्या प्रवासाचं वर्णन, त्याचा मार्ग हा मॉन्सूनच्या प्रत्यक्षात असणाऱ्या प्रवासाशीही मिळता-जुळता आहे. मॉन्सूनचा वेध घेण्याचा प्रयत्न त्याने स्वत: किंवा एखाद्या तज्ज्ञाने त्या काळीही केला होता, हे ‘मेघदूत'वरून स्पष्ट होतं. म्हणूनच मॉन्सून आणि भारताचा संवाद देशभर फिरून अभ्यासण्याच्या आमच्या प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट मेघदूत' हे नाव द्यायचं आम्ही ठरवलं. भारतीय मॉन्सूनचं एक व्यापक स्वरूप मॉन्सून कोशाद्वारे (मॉन्सून एन्सायक्लोपीडिया) समोर आणायचं, असा त्यामागचा उद्देश होता.
‘प्रोजेक्ट मेघदूत'ची संकल्पना मांडण्यासाठी आणि वेळोवेळी त्यातील अपडेट लोकांना वाचता यावेत यासाठी मी मेच्या मध्यात ‘वैश्विक' नावाने ब्लॉग सुरू केला. ब्लॉगच्या पहिल्या पोस्टमध्ये ‘प्रोजेक्ट मेघदूत' आणि मॉन्सूनचा पाठलाग करण्याची संकल्पना मांडली आणि या प्रवासासाठी सोबत येण्याचं आवाहनही केलं. ही पोस्ट फेसबुकशी जोडल्याने तत्काळ प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. अनेकांनी या प्रवासात सोबत यायची तयारी दर्शवली. सुरुवातीला आकडा पंचवीसच्या दरम्यान होता; पण, पुण्यापासून केरळ आणि पुन्हा पुणे (सुमारे ३५०० किलोमीटर) असा स्वतंत्र गाडीने प्रवास करावा लागणार म्हटल्यावर त्यातील निम्मे गळाले. नंतर दहा दिवसांच्या सुट्ट्या, तसंच काही वैयक्तिक कारणांनी कमी होत होत दहाजण राहिले आणि प्रत्यक्ष गाडीत बसताना ड्रायव्हरसह आम्ही सातजण प्रवासाला निघालो. ‘प्रोजेक्ट मेघदूत'च्या पहिल्या वर्षासाठी आम्ही पश्चिम घाट आणि महाराष्ट्र असा प्रवास निश्चित केला. त्यापैकी त्रिवेंद्रम ते कोकण या भागात पश्चिम घाटातून मॉन्सूनच्या आगमनाबरोबर त्याचा पाठलाग करणं आणि नंतरच्या काळात महाराष्ट्राच्या विविध भागांत जाऊन मॉन्सूनविषयीची विविध जाती-जमातींकडून माहिती जमा करणं, तसंच मॉन्सूनचं त्या भागासाठी असणारं महत्त्व अभ्यासणं, असा एकूण आराखडा होता.

आणि आम्ही निघालो...
मी- विज्ञान पत्रकार, ऋषिकेश पंडित- भौतिकशास्त्राचा विद्यार्थी, अथर्व वांगीकर- डिप्लोमाचा विद्यार्थी, अभिषेक वाघमारे- इंजिनियर, नम्रता भिंगार्डे- पत्रकार आणि शब्दगंधा कुलकर्णी- एनजीओची कार्यकर्ती, असे आम्ही सहाजण २७ मे २०११ च्या रात्री मॉन्सूनच्या पाठलागासाठी पुण्यातून दक्षिणेच्या दिशेने निघालो. आमच्या हातात दिवस मर्यादित होते, आणि नेमकं या वर्षी मॉन्सूनचं काही तरी बिनसलं होतं. आयएमडीने ३१ मेपर्यंत मॉन्सून केरळमध्ये पोचेल, असं जाहीर केलं होतं. दर वर्षी साधारणपणे २० ते २५ मे दरम्यान मॉन्सून अंदमानमध्ये पोचतो. यंदा मात्र २५ तारीख उलटूनही तो अंदमानात दाखल झाला नव्हता. अंदमाननंतर पाच दिवस ते एक आठवड्याच्या कालावधीत तो केरळच्या दक्षिण किनाऱ्यावर पोचतो असं मानलं जातं. आम्ही निघालो त्या वेळची परिस्थिती पाहता मॉन्सूनचं केरळमधील आगमन जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत लांबण्याची शक्यता होती. मात्र, त्याचा विचार न करता आम्ही प्रवास सुरू केला. केरळमधून उत्तरेकडे येण्याचा एक मार्ग आम्ही निश्चित केला होता. मात्र, परिस्थितीनुसार त्यात बदल करावे लागणार याचीही कल्पना होती. फिरता फिरता लोकांकडून माहिती घेत आमच्या अभ्यासाच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणं निवडून त्यांना भेटी देण्याचं ठरवत एका अनिश्चित प्रवासाला सुरुवात झाली.
मॉन्सून येण्याच्या आधीची हवामानाची स्थिती खूप बोलकी असते. मध्य भारतात, तसंच दक्षिण भारताच्या उत्तर भागात या काळात पूर्वमोसमी पावसाच्या सरी पडतात. समुद्राकडून आलेल्या बाष्पापासून दुपारनंतर किंवा पहाटे उंच ढग तयार होऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस पडतो. त्याला थंडर शॉवर म्हणतात. २८ मेच्या पहाटे आम्ही कर्नाटकमध्ये प्रवेश केला आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. आमच्यापैकी बहुतेकजण शास्त्रीय संगीत ऐकणारे. त्यामुळे गाडीमध्ये त्या वेळी भीमसेन जोशींचा मारवा सुरू होता. एक वेगळाच माहोल तयार झाला. प्रवासाची सुरुवातच अनपेक्षितपणे रंगतदार झाल्यामुळे मॉन्सूनभेटीची उत्सुकता शिगेला पोचली.
२८ मेचा संपूर्ण दिवस कर्नाटकात गेला. उत्तर कर्नाटकात रस्त्याच्या दुतर्फा शेतकरी नांगरणी करत होते. सकाळी बेळगावजवळ एके ठिकाणी गाडी थांबवून शेतकऱ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्याला विचारलं, “नांगरणी करण्याचा दिवस कसा निश्चित करता?”
तो म्हणाला, “पाऊस जवळ आलाय.. हीच वेळ आहे.” मी मनातल्या मनात म्हणालो, ‘आयएमडीलाही माहीत नाही पाऊस कुठपर्यंत पोचलाय, या शेतकऱ्याला याच्या शेतात थांबून बरं कळलं!' मी माझी शंका त्याला बोलून दाखवली. “पाऊस जवळ आलाय ते तुम्हाला कसं समजतं?” त्याने त्याच्या खांद्यावरील फडकं उंच धरून वाऱ्याची दिशा दाखवली आणि तो म्हणाला, “त्या दिशेने (पश्चिम) हा वारा सुरू झालाय आणि आकाशात बघा काळे ढग आहेत. तिकडे उत्तरेला संध्याकाळी विजा चमकतात. अशी स्थिती आली की आम्ही नांगरणी सुरू करतो.” “मग तुमच्यापर्यंत पाऊस कधी पोचेल? मी विचारलं. त्यावर तो हसून म्हणाला, “आणखी पाचेक दिवसांत येईल बघा.”
त्याच्या या अंदाजाची नोंद घेत आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. दुपारी इंटरनेटवर आयएमडीचा अपडेट पाहिला : ‘मॉन्सून पुढील अठ्ठेचाळीस तासांत अंदमानमध्ये पोचेल आणि त्यानंतर दोन-तीन दिवसांत केरळमध्ये.' पण या शेतकऱ्याच्या अंदाजानुसार त्याहीपेक्षा लवकर मॉन्सून सुरू होणार होता. म्हटलं, पाहू या काय होतं ते.
२९ मे च्या सकाळी आम्ही कोइमतूरपासून पश्चिमेकडे वळून घाटाच्या दिशेने प्रवास सुरू केला. घाट जसा जवळ आला तशी डोंगराच्या माथ्यापाशी ढगांची गर्दी दिसू लागली. घाट चढू लागलो तसं आकाशही ढगांनी व्यापू लागलं. इंडियन मेट्रिओलॉजिकल सोसायटी' ही हवामानशास्त्रज्ञांची संघटना आहे. त्यांनी आम्हाला मॉन्सूनकाळातील हवमानाच्या नोंदी घेण्यासाठी काही उपकरणं दिली होती. त्यानुसार आम्ही घाटामध्ये नेोंदी घ्यायला सुरुवात केली. वारा नैर्ऋत्येकडून साधारणपणे ताशी वीस किलोमीटर वेगाने वाहत होता. सापेक्ष आर्द्रता सत्तर टक्के होती. मॉन्सून जवळ असल्याची ही चिन्हं होती. मात्र, आमचं लक्ष होतं आयएमडीच्या वेबसाइटवर. तिथे मात्र मॉन्सून अंदमानमध्येही पोचला नसल्याचं सांगितलं जात होतं.
आम्ही घाट उतरू लागलो तसं संपूर्ण आकाश काळ्या ढगांनी व्यापलं. सकाळी अकराची वेळ होती, आणि एके ठिकाणी पावसालाही सुरुवात झाली. गेली काही वर्षं हवामान कव्हर करीत असल्यामुळे सकाळी अकरा वाजता येणारा पाऊस हा थंडर शॉवर नसणार याची खात्री होती. तसंच हा पाऊस संथ लयीत दूरपर्यंत बरसत होता. मॉन्सूनच्या पावसाचे सर्व गुणधर्म यात होते. दुपारी तीन वाजता आम्ही एर्नाकुलम सोडलं आणि दक्षिणेकडे गाडी वळवून त्रिवेंद्रमच्या दिशेने प्रवास सुरू केला. पाऊस बरसतच होता.
एके ठिकाणी चहासाठी थांबलो त्या वेळी टपरीवाल्याला विचारलं, “कधीपासून पडतोय पाऊस?” तो म्हणाला, “काल रात्रीपासून.” मी ओरडलोच, “अरे, हाच मॉन्सून!” तातडीने आयएमडीची साइट ओपन केली. त्यात ठळक अक्षरांत लिहिलं होतं- ‘अंदमानसह उत्तर केरळपर्यंत आज मॉन्सूनचं आगमन झालं.'
असं कसं झालं, हा प्रश्न आम्हाला सगळ्यांनाच पडला होता. लगेचच पुणे वेधशाळेच्या संचालिका डॉ. मेधा खोले यांना फोन लावला. त्यांच्याकडून मॉन्सूनच्या आगमनाचं कन्फर्मेशन झालंच, पण अंदमान आणि केरळमध्ये तो एकाच दिवशी कसा काय थडकला यामागचं रहस्यही कळलं. त्यांनी सांगितल्याप्रमाणे “हिंदी महासागराकडून नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना आवश्यक तेवढा जोर मिळत नसल्यामुळे मॉन्सूनचं आगमन लांबलं होतं. मात्र, गेल्या दोन दिवसांत लक्षद्वीपपासून बंगालच्या उपसागरापर्यंत कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे या वाऱ्यांना एकाएकी जोर आला आणि हिंदी महासागरात सज्ज असणारे ढग या वाऱ्यांबरोबर वेगाने उत्तरेकडे सरकले, आणि ज्या भागात ते पोचले तिथे जोरदार बरसलेही.” मॉन्सूनचं या वर्षीचं आगमन दमदार झालं.
आम्हाला कर्नाटकच्या त्या शेतकऱ्याची आठवण झालीच. तो म्हणाला होताच, “बघा, पाचेक दिवसांत पाऊस येईलच.” मॉन्सूनच्या आगमनाबाबत सरकारी नियमाप्रमाणे अंदाज वर्तवण्यात उशीर झाला असला तरी निसर्गाने आपला नियम पाळला होता.
अर्थात, मॉन्सूनने सर्वांचे अंदाज चुकवल्याने आमचा मात्र थोडा हिरमोड झाला. आम्हाला मॉन्सूनला त्याच्या दक्षिणेकडील प्रवेशद्वारावर, म्हणजेच कोवलम बीचवर गाठायचं होतं; पण आम्ही अजून मध्य केरळमध्येच असल्याने ते आता शक्य नव्हतं. गाडी तातडीने वाटेतच असणाऱ्या आलेप्पीच्या बीचवर घेतली. सूर्यास्त जवळ आला होता. पाऊस थांबलेला; मात्र आकाशात काळ्या ढगांची दाटी, समुद्र खवळलेला... समुद्रकिनाऱ्याच्या वाळूचा सोनेरी रंग बदलून काळा झालेला. मॉन्सूनच्या आगमनाचं हेही एक चिन्ह आहे, असं तिथल्या मच्छीमारांकडून समजलं. मॉन्सूनच्या आगमनाबरोबर समुद्राचं रूप बदलतं आणि तो रौद्र रूप धारण करतो. आता पुढचे दोन-अडीच महिने या मच्छीमारांसाठी समुद्रप्रवेश बंद.
दुपारी मॉन्सूनच्या आगमनाची घोषणा झाल्याचं लोकांनाही समजलं होतं, त्यामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचं स्वागत करायला आलेप्पीच्या बीचवर गर्दी झाली होती.
रात्री उशिरा आम्ही त्रिवेंद्रमला पोचलो. दुसऱ्या दिवशी म्हणजे ३० तारखेला सकाळीच त्रिवेंद्रमच्या वेधशाळेत हजर झालो. ही भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वांत जुनी वेधशाळा आहे. १८३६ मध्ये स्थापन झालेल्या या वेधशाळेतूनच मॉन्सूनच्या आगमनाची घोषणा केली जाते. वेधशाळेचे संचालक डॉ. के. संतोष यांनी मॉन्सूनचं आगमन कसं जाहीर केलं जातं हे आम्हाला समजावून सांगितलं. वाऱ्याचा वेग-दिशा, तसंच वातावरणाचा दाब लक्षात घेतला जातोच. पण, केरळमधील सुमारे साठ टक्के पर्जन्यमापन केंद्रांवर चोवीस तासांत अडीच मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला असेल तर दुसऱ्या दिवशी मॉन्सून दाखल झाल्याचं जाहीर केलं जातं. दक्षिण केरळमध्ये पश्चिम घाटाची उंची कमी असल्यामुळे उत्तर केरळपेक्षा तिथे कमी पाऊस पडतो, असं ते सांगत होते. केरळच्या जडणघडणीत मॉन्सूनचा सिंहाचा वाटा आहे. मॉन्सूनकाळात पडणाऱ्या प्रचंड पावसामुळेच राज्यातील घाट परिसरातील निसर्ग विकसित झाला आहे. याच काळात बॅकवॉटर्सला पाणी मिळत असल्यामुळे ‘गॉड्स ओन कंट्री' म्हटल्या जाणाऱ्या केरळला बारा महिन्यांचा ‘टूरिझम सीझन' मिळतो.
त्यांनी या वेळी सांगितलेली आणखी एक गोष्ट स्मरणात राहिली, ती म्हणजे प्रत्येक मॉन्सून हा ‘युनिक' असतो. ते म्हणाले, “गेली १५ वर्षं मी या वेधशाळेत आहे आणि या कालावधीत मी पूर्ण वेगवेगळे १५ मॉन्सून पाहिले. कोणताही मॉन्सून हा दुसऱ्या मॉन्सूनसारखा नव्हता. या वर्षीचाही नाही. बघा ना, अंदमान आणि केरळमध्ये एकाच वेळी आगमन करून त्याने या वर्षीही आपलं वेगळेपण जपलं.”
त्रिवेंद्रममधल्या कोवलम बीचबद्दल आम्हाला खूप उत्सुकता होती. फ्रेटर यांनी त्यांच्या पुस्तकात मॉन्सूनच्या स्वागतासाठी कोवलमवर मल्याळी लोक जमा होतात आणि पारंपरिक नृत्य करतात, असं लिहिलं होते. आम्हालाही असं काही पाहायला मिळेल या हेतूने संध्याकाळी त्रिवेंद्रमच्या दक्षिणेकडे असणाऱ्या या बीचवर पोचलो. बीचपासून दूरवरच समुद्राची गाज कानावर पडत होती. बीचवर फार गर्दी नव्हती. मात्र, या ठिकाणचे गार्ड समुद्राजवळ जाणाऱ्या प्रत्येकाला हटकत होते. फोटोग्राफी करत असताना एक वेगळीच गोष्ट नजरेस पडली. किनाऱ्यावर येणाऱ्या समुद्राच्या लाटांजवळ दोन तरुण काही तरी शोधत होते. मी गार्डला विचारलं, “ते काय करतायत?” तो म्हणाला, “ते मच्छीमार आहेत. त्या पाहा पालथ्या पडलेल्या त्यांच्या होड्या. मॉन्सूनच्या आगमनाबरोबर त्यांचं समुद्रात जाणं बंद झालं. हे गरीब मच्छीमार आहेत. मोटरबोट आणि महागडी सामग्री घेणं त्यांना शक्य नाही. मग दिवसभर इथे किनाऱ्यावर येऊन समुद्राकडे डोळे लावून बसतात. जो समुद्र त्यांना आत प्रवेश देत नाही, तोच समुद्र त्यांना काही शिंपले, मेलेले मासे किनाऱ्यावर आणून देतो. तेच गोळा करून हे आपलं घर चालवतात. ही स्थिती पुढील दोन-अडीच महिने तरी चालणार.”

उन्हाने लाही लाही झालेल्यांना, नांगरणी करून पेरणीसाठी वाट पाहणाऱ्यांना मॉन्सूनचं आगमन किती सुखावह असतं याचा अनुभव आम्ही घेत होतो. मात्र, तोच मॉन्सून एखाद्याच्या तोंडचा घासही काढून घेऊ शकतो, हे आम्ही पहिल्यांदाच बघत होतो. पण भला असो किंवा वाईट, मॉन्सूनचा सर्वसामान्यांच्या जीवनावर किती थेट परिणाम होतो हे प्रकर्षानं जाणवलं.
निसर्गात आणि त्याचबरोबर समाजातही मॉन्सूनचं प्रतिबिंब कसं उमटतं हे समजून घेण्यासाठीच आम्ही मॉन्सूनचा पाठलाग करत होतो. त्यामुळे प्रवास सुरू करण्याआधीच आम्ही आमच्या मार्गावरील काही ठिकाणं निश्चित केली होती. त्यानुसार ३१ मे रोजी त्रिवेंद्रमपासून पासष्ट किलोमीटरवर असणाऱ्या ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. घाटाच्या परिसरातच असणाऱ्या या बोटॅनिकल गार्डनमध्ये पश्चिम घाटातील सुमारे चार हजार दुर्मिळ वनस्पतींचं जतन करण्यात आलं आहे. मॉन्सूनच्या आगमनाबरोबर जमिनीखाली दडून बसलेल्या बीजांना अंकुर फुटू लागतो आणि सृष्टीच्या सृजनाचा काळ सुरू होतो. यात अनेक औषधी वनस्पतीही असतात. केरळमध्ये आयुर्वेदाचं महत्त्व आजही अबाधित आहे. अनेक वैद्य स्वत: पर्वतीय जंगलात जाऊन तेथील आदिवासींच्या मदतीने दुर्मिळ वनस्पतींचा शोध घेतात. मॉन्सूनच्या पहिल्या पावसाबरोबर उगवणाऱ्या अशाच काही प्रदेशनिष्ठ आणि हंगामी वनस्पतींची माहिती इथल्या शास्त्रज्ञांकडून घेतली आणि त्यानंतर आम्ही त्रिवेंद्रमच्या आयुर्वेद कॉलेजच्या माजी संचालकांकडे पोचलो. ते स्वत: एक नामवंत वैद्य आहेत.
मॉन्सूनच्या आगमनाबरोबर केरळमध्ये मॉन्सून मसाज थेरपीचाही सीझन सुरू होतो, असं फ्रेटरच्या पुस्तकात वाचलं होतं. त्या थेरपीविषयी त्यांना विचारलं असता ‘आता गोष्टी बऱ्याच बदलल्या आहेत', असं त्यांचं उत्तर होतं. ते म्हणाले, “मॉन्सूनपूर्वी उन्हामुळे शरीर अस्वस्थ झालेलं असतं. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते, उत्साह कमी होतो. पहिला पाऊस जसा सृष्टीमध्ये चैतन्य निर्माण करतो, तसे बदल शरीरातही सुरू होतात. या काळात विशिष्ट पद्धतीने आयुर्वेदिक मसाज घेतल्यास आणि वैद्यांनी ठरवून दिलेली पथ्यं पाळल्यास शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर पावसाळ्यातल्या संसर्गजन्य रोगांना तोंड देण्यासाठी सज्ज राहतं. ही थेरपी सुमारे पंधरा दिवस घ्यावी लागते. मात्र, पर्यटनासाठी आलेल्या ग्राहकांच्या सोईसाठी ही थेरपीही इन्स्टंट करण्याचा प्रयत्न काही वैद्यांनी केलाय. मॉन्सूनकाळात हा धंदा तेजीत असतो.” मॉन्सूनचा केरळवरील हा आणखी एक परिणाम.
त्यांचा निरोप घेऊन आम्ही निघालो. आता आमचा प्रवास उत्तरेच्या दिशेने मॉन्सूनसोबत होणार होता. आम्ही त्रिवेंद्रममध्ये पोहोचल्यापासून पावसाने विशेष हजेरी लावली नव्हती. ३१ मे च्या रात्री मात्र त्याने चांगलाच जोर धरला. आता हा पाऊस आम्ही पश्चिम घाट सोडेपर्यंत आमची साथ सोडणार नव्हता. ‘सकाळ'चे त्रिवेंद्रमचे प्रतिनिधी अजयकुमार यांनी आम्हाला आलापुडा म्हणजेच आलेप्पीचे काही पत्ते दिले आणि आमच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाची ठिकाणंही सांगितली. भर पावसात रात्री आमची गाडी आलेप्पीच्या दिशेने निघाली.
आलेप्पी हे ‘व्हेनिस ऑफ ईस्ट' म्हणून ओळखलं जातं. बॅकवॉटरचा हा परिसर नौकानयनाच्या स्पर्धांसाठी प्रसिद्ध आहे. एक स्वतंत्र बोट दिवसभरासाठी भाड्याने घेऊन आम्ही एक जूनला भारतातल्या एका अनोख्या प्रदेशाकडे निघालो. हाऊस बोटी आणि पाण्यामध्ये भराव टाकून बांधलेल्या घरांमधून रस्ता काढत सुमारे दीड तासात आम्ही कुट्टनाड या भागात पोचलो. हा भाग समुद्रसपाटीखालील शेतीसाठी प्रसिद्ध आहे. जगात हॉलंड आणि भारतातील कुट्टनाड इथेच समुद्रसपाटीच्या खाली शेती केली जाते. या भागालाच भारताचं ‘तांदळाचं कोठार' म्हणून ओळखलं जातं. काही शतकांपूर्वी या भागातील जलाशयांमध्ये लोकांनी भराव टाकून कृत्रिमरीत्या भातशेतीसाठी जागा तयार केल्या. शेताच्या भागात हवं तेव्हा जलाशयातून पाणी सोडून आणि नको तेव्हा शेतातून पुन्हा जलाशयात पाणी सोडून वर्षातून तीनदा इथे भातपीक घेतलं जातं.
या भागाला शेतीसाठी मॉन्सूनच्या पाण्याची थेट गरज भासत नाही. उलट, मॉन्सूनकाळात त्यांच्या भातपिकांमध्ये अतिरिक्त पाणी भरून शेतीचं नुकसानच होतं. मूळ जलाशयापासून इथली शेतं सुमारे पंधरा फूट खोल आहेत. आणि हीच उंची समुद्रसपाटीखाली जाते. बारा महिने पाण्यात राहणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांची घरंही पाण्यात भराव टाकून बांधण्यात आली आहेत. अनेकदा इथे पूर येतो आणि बहुतेक घरं पाण्याखाली जातात. मात्र, पाण्याशी एकरूप झालेले इथले अनेक शेतकरी पुराचं पाणी घरात शिरल्यावरही घर सोडत नाहीत, हे ऐकून आम्हाला आश्चर्य वाटलं. पुराचं पाणी ओसरेपर्यंत घरातच लाकडी फळ्यांवर स्वयंपाक, जेवण, झोप असं सगळंच पार पाडलं जातं. मॉन्सूनकाळात भाताच्या खाचरांमधून पावसाचं अतिरिक्त पाणी पुन्हा जलाशयांमध्ये सोडण्यासाठी ठिकठिकाणी डिझेलचे पंप लावण्यात आले आहेत. अगदी वीस-तीस वर्षांपूर्वीपर्यंत लाकडी चक्रं(ज्याला स्थानिक लोक ‘चक्रम' म्हणतात) पायाने फिरवून शेकडो माणसांमार्फत हे पाणी शेतातून बाहेर काढलं जात असे.
या भागातील काही शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन आम्ही पुन्हा बोटीत बसलो तोच एकाएकी अंधारून आलं. दूरदूरपर्यंत फक्त पाणीच होतं आणि आकाशात काळे, कापसासारखे ढग. दूर क्षितिजावर या ढगांचा आणि जलाशयाचा संगम स्पष्ट दिसत होता. हळूहळू तो अस्पष्ट होत दिसेनासा झाला आणि आम्ही सर्व बाजूंनी जलधारांनी घेरले गेलो. बाजूने जाणाऱ्या हाऊस बोटींच्या फक्त आकृत्याच दिसत होती. ‘मुसळधार' पाऊस काय असतो हे त्या वेळी आम्ही शब्दश: अनुभवलं. हे लोक संपूर्ण हंगाम पाण्यात राहून कसा काढत असतील याचा विचार करूनच अंगावर काटा आला. या मल्याळी शेतकऱ्यांची मॉन्सूनकाळातील पूररेषा त्यांच्या घरातून जातेच, पण ती त्यांच्या जीवनाचाही भाग बनल्याचं या वेळी जाणवलं.
केरळ म्हणजे भरपूर पाऊस आणि भरपूर पाऊस म्हटलं की छत्र्या आल्याच. आलेप्पीच्या छत्र्यांविषयी आम्ही बऱ्याचजणांकडून ऐकलं होतं. एक जूनच्या संध्याकाळी आम्ही ‘पॉपी' आणि ‘जॉन्स'च्या चार मजली छत्र्यांच्या शोरूम्सला भेट दिली. पावसापासून किंवा उन्हापासून रक्षण करणारी छत्री ही एक साधी वस्तू, पण तिचीही किती रूपं असू शकतात हे या दोन दालनांना भेट दिल्यावर समजतं. साठ वर्षांपूर्वी छत्र्या दुरुस्त करता करता सुरू झालेल्या व्यवसायाची उलाढाल आज अब्जावधीमध्ये असल्याचं ‘जॉन्स अम्ब्रेला'च्या मालकाने सांगितलं. या व्यवसायातील त्यांची ही तिसरी पिढी आहे, आणि आपण भारतातील सर्वांत मोठे छत्री उत्पादक असल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांचा सर्वाधिक व्यवसाय स्वाभाविकपणे मॉन्सूनकाळात होतो. या काळात ते सुमारे चोवीस लाख छत्र्यांची विक्री करतात. सुमारे एकशे पन्नास प्रकारच्या या छत्र्यांची किंमत शंभर रुपयांपासून चार हजार रुपयांपर्यंत आहे. छत्र्यांच्या बाजारपेठेतील अव्वल क्रमांक राखण्यासाठी त्यांनी स्वत:चा रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभाग सुरू केलाय आणि त्यामध्ये कार्बन नॅनो टेक्नॉलॉजीचाही वापर केला जातो, हे ऐकून तर आम्ही चाटच पडलो. दोन वर्षांच्या मुलापासून ऐंशी वर्षांच्या वयोवृद्धापर्यंत सर्वांच्या वेगवेगळ्या गरजांसाठी जॉन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या छत्र्या तयार केल्या जातात. अर्थात त्यांची सर्वांत मोठी बाजारपेठ प्रचंड पावसाचं केरळच आहे. केवळ चार महिन्यांच्या काळात मॉन्सून या छत्री मालकावर कोट्यवधींचा वर्षाव करतो. दुकानातून बाहेर पडताना नकळतच कोवलम बीचवर उपाशीपोटी समुद्राकडे डोळे लावून बसलेले मच्छीमार डोळ्यांपुढे उभे राहिले.

मॉन्सूनची उत्तर सीमा आता पुढे सरकत होती. कर्नाटकच्या उत्तर भागापर्यंत मॉन्सूनने मजल मारलेली, आणि मॉन्सूनच्या आगमनानंतर पश्चिम किनारपट्टीवर ऑफशोअर ट्रफही निर्माण झाला होता. समुद्रकिनाऱ्याला समांतर असणाऱ्या या कमी दाबाच्या पट्ट्यामुळेच कोकणापासून केरळपर्यंतच्या भागाला हंगामात मोठा पाऊस मिळतो. मॉन्सूनच्या उत्तर सीमेचा पाठलाग करीत ‘प्रोजेक्ट मेघदूत'ची टीम केरळची सांस्कृतिक राजधानी असणाऱ्या त्रिशूरला पोचली. त्रिशूरपासून जवळच चेरुथुरुथी या गावी नीला नदीच्या काठावर केरळ कलामंडलम वसलेलं आहे. १९३० मध्ये शांतिनिकेतनपासून प्रेरणा घेऊन प्रसिद्ध कवी वाल्लथोळ नारायण मेनन यांनी या कलाकेंद्राची स्थापना केली होती. कथकली, कुडियाट्टम, मोहिनीयाट्टम आदी पारंपरिक कलांचं जतन व्हावं यासाठी गुरुकुल पद्धतीने हे केंद्र चालवलं जातं. मॉन्सूनचा केरळमधील कलांवर काय प्रभाव आहे आणि या केंद्राच्या दृष्टीने मॉन्सूनचं महत्त्व काय हे आम्हाला जाणून घ्यायचं होतं.
पावसाने ओल्या झालेल्या कलामंडलमच्या भिंतींनी आधी आम्हाला पारंपरिक दक्षिण भारतीय कलांची सफर घडवून आणली. या केंद्राच्या दृष्टीने मॉन्सूनचं महत्त्व सांगताना इथले वरिष्ठ प्राध्यापक कलाधरन म्हणाले, “पावसाच्या आगमनाबरोबरच जूनमध्ये आमचं गुरुकुल पद्धतीचं शिक्षण सुरू होतं. नवनिर्मितीच्या या ऋतूत आपल्या अपेक्षेप्रमाणे शिष्याला घडविण्यासाठी गुरू स्वत: कष्ट घेतात. शिक्षण ललितकलांचं असल्यामुळे शरीराच्या हालचाली आणि लवचिकतेला खूप महत्त्व असतं. कलेसाठी शरीर घडवण्याच्या दृष्टीने मॉन्सून हा उत्तम कालावधी असतो. या काळात गुरू स्वत: दररोज विद्यार्थ्यांच्या शरीरावर पायाने आणि चेहऱ्यावर हाताने मसाज करतात. यासाठी आयुर्वेदिक तेल आणि वनस्पतींचा वापर होतो. याशिवाय डोळ्यांच्या हालचाली आणि चेहऱ्यावरील हावभाव यांचंही प्रशिक्षण या काळात दिलं जातं. मॉन्सून हा स्वत:ला घडवण्याचा काळ मानला जातो.”
ऑफशोअर ट्रफच्या तीव्रतेबरोबर पावसाचाही जोर वाढला. तीन जूनला आम्ही कालिकतच्या दिशेने निघालो, तोपर्यंत मॉन्सूनने संपूर्ण गोवा व्यापला होता. मॉन्सून ट्रफ सक्रिय असताना समुद्र असतो कसा हे पाहण्यासाठी कालिकतच्या बीचवर पोचलो. दुपारची वेळ होती. बीचवर आमच्याशिवाय कोणीही नव्हतं. गंभीर आणि भारदस्त आवाजात उंच उसळणाऱ्या लाटा आणि करड्या-अंधाऱ्या रंगाचा प्रकाश यामुळे वातावरण धीरगंभीर बनलं होतं. क्षितिजावरचे ढग कोणते आणि लाटा कोणत्या, असा प्रश्न पडावा! काळ्या पडलेल्या वाळूत खेकड्यांची लगबग सुरू होती. समुद्राकडून येणारा वारा कानांत इतर कोणतेही आवाज जाणार नाहीत याची काळजी घेणारा. दमट-अस्वस्थ वातावरणात समुद्राशी स्पर्धा करायला मग ढगही सरसावले आणि काही क्षणांत मुसळधार पाऊस आणि फेसाळत किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या लाटांची जुगलबंदी सुरू झाली. ओल्या चिंब शरीरानिशी आणि उघड्या डोळ्यांनी वाळूत घट्ट पाय रोवून मी स्थिर राहण्याचा प्रयत्न करत होतो. समुद्र-ढग-वारा आणि पाऊस यांचं निसर्गचक्र आपल्यातील प्रचंड ऊर्जेची एक झलक दाखवतं आणि आपण आपल्या नगण्यतेची जाणीव होऊन आपोआप मागे सरकतो.
केरळचा निरोप घेऊन कर्नाटकात प्रवेश करत असतानाच आमच्या गाडीत बिघाड झाला आणि तोही मोठा. चोवीस तास कोसळणाऱ्या पावसात गाडी दुरुस्त करणं हेही एक आव्हान होतं. त्यात आमचे दोन दिवस गेले. तोपर्यंत चार जूनला मॉन्सूनने महाराष्ट्रात प्रवेश केला. मुंबई-पुण्याला मॉन्सून पोचण्याची सर्वसाधारण तारीख सात जून मानली जाते. मंगळूरला गाडी दुरुस्त झाल्यावर सहा तारखेला आम्ही प्रवासाच्या शेवटच्या टप्प्याकडे निघालो.
उडुपीमधून उजवीकडे वळून आम्ही रात्री घाट चढायला सुरुवात केली. हा भाग वर्षावनांसाठी म्हणजेच रेन फॉरेस्टसाठी ओळखला जातो. आगुम्बे हे देशभरातीलच नाही, तर जगभरातील निसर्गवेड्यांचं आवडतं ठिकाण. रोम्युलस व्हिटेकर यांनी २००५ मध्ये आगुम्बेच्या जंगलात ‘रेन फॉरेस्ट रिसर्च स्टेशन'ची स्थापना केली. त्यानंतर या दाट जंगलाचा अभ्यास करण्यासाठी निसर्ग अभ्यासकांची गर्दीही वाढू लागली. आगुम्बेची दुसरी ओळख म्हणजे मालगुडी. नव्वदच्या दशकात भारतातील घराघरांत पोचलेल्या ‘मालगुडी डेज'चं शूटिंग आगुम्बेतच झालं होतं. घाट चढत असताना तापमान कमी होत असल्याचं जाणवत होतं. पावसाची रिपरिप सुरू होती. गाडीच्या दिव्यामध्ये रस्त्यातून मधूनच काही तरी वळवळत रस्ता ओलांडताना दिसे. एके ठिकाणी रस्त्याच्या मधोमध काही तरी वळवळताना दिसलं म्हणून आम्ही जवळ जाऊन पाहिलं. तो साप नक्कीच नव्हता. सिसिलियन प्रजातीतील तो सरपटणारा प्राणी असल्याचं आम्हाला नंतर समजलं. प्रचंड पावसाच्या जंगलांमध्येच त्यांचं अस्तित्त्व असतं.
पहाटे पहाटे आम्ही आगुम्बेमध्ये पोचलो त्या वेळी पावसाचा जोर ओसरला होता. मात्र, डोंगरमाथ्यावर असल्यामुळे वाऱ्याबरोबर वाहणारं धुकं आणि त्यातून कौलारू व शांत गावाचं आणि जंगलाचं होणारं दर्शन सुखावत होतं. गावातून फेरफटका मारताना आपल्यातच मग्न असणाऱ्या घरांमधील हालचाली, नुकत्याच सुरू झालेल्या शाळेकडे उत्साहाने निघालेल्या विद्यार्थ्यांची लगबग मालगुडीतच आल्याचं भासवत होती.
आगुम्बे गाव चारही बाजूंनी जंगलाने वेढलेलं असल्यामुळे गावातून बाहेर पडणारे सर्वच रस्ते जंगलात जातात. जंगलातून वाट चुकत चुकत आम्ही दुपारी ‘रेन फॉरेस्ट रिसर्च स्टेशन'मध्ये पोचलो. हा भाग किंग कोब्रा या विषारी सापासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, मॉन्सूनकाळात कोब्राचं विशेष दर्शन घडत नसल्याचं स्टेशन इनचार्ज सिद्धार्थ रावने सांगितलं. जंगलात मॉन्सूनकाळातील बदल टिपण्यासाठी काही परदेशी विद्यार्थी आले होते. या काळात अनेक सीझनल वनस्पती आणि त्यांना धरून सीझनल जैव साखळ्याही पाहायला मिळतात, त्यांवर त्यांचा अभ्यास सुरू होता. या भागात वार्षिक ७५०० मिलिमीटरपेक्षाही जास्त पाऊस पडतो, जो चेरापुंजीच्या खालोखाल मानला जातो. घाटातील उंची आणि अरबी समुद्र, तसेच बंगालच्या उपसागराकडून एकत्रित मिळणाऱ्या पावसामुळे येथील पर्जन्यमान दक्षिण भारतात सर्वाधिक आहे. “पावसाळ्यातील जंगलाचा खरा अनुभव घ्यायचा असेल तर जवळच एक धबधबा आहे तिथे जा,” असं सिद्धार्थ म्हणाला.
त्याने सांगितल्याप्रमाणे आम्ही डांबरी रस्ता सोडून पायवाटेने गाडी घेतली. थोडं पुढे गेलो, तर वाटेत एक मोठं झाड पडल्यामुळे रस्ता बंद होता. अभिषेक आणि ऋषिकेश पुढे चालत जाण्यासाठी तरी रस्ता आहे का ते पाहायला गेले. उरलेले आम्ही खाली उतरून आजूबाजूचे फोटो घेऊ लागलो. आकाशाचं दर्शन घडणार नाही इतकी उंच वाढलेली आणि दाट झाडं. चारही बाजूंनी पशू-पक्षी आणि कीटकांचे असंख्य आवाज. इतक्यात त्या आवाजात एक वेगळाच आवाज वाढू लागला आणि काही क्षणात त्याने पूर्ण वातावरण व्यापलं. पावसाचे टपोरे थेंब झाडांच्या हिरव्या पानांवर घसरून जमिनीवरील करड्या पानांच्या थरांवर कोसळू लागले. पाहता पाहता आमच्या पायांखालून पाण्याचे लोट वाहू लागले. मुसळधार पावसाशी एकरूप झालेलं जंगल आम्ही ऐकत होतो, अनुभवत होतो. पावसाने पूर्ण भिजलेले अभिषेक आणि ऋषिकेश गाडीकडे परतले. जंगलाचा एकूण रागरंग पाहून आम्ही पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. गाडीत बसल्यावर लक्षात आलं, आमच्या प्रत्येकाचं अंग जळवांनी भरलं आहे. पुढचा अर्धा-एक तास त्या जळवा काढण्यातच गेला.
जंगलात निघायच्या आधी आम्ही गावात पर्जन्यमापक ठेवलं होतं. दीड तासाने आम्ही नोंद घेतली... १२० मिलिमीटर. असा पाऊस इथे सतत चार महिने कोसळतो. इथल्या जंगलाच्या आणि लोकांच्या प्रतिकारशक्तीची कल्पनाच केलेली बरी. पण काही गावकऱ्यांशी चर्चा केल्यावर लक्षात आलं की लोकांची प्रतिकारक्षमता आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. प्रचंड पावसामुळे या भागात चार महिने अभ्यासक सोडून कोणी फिरकत नाही. पर्यटनाच्या दृष्टीनेही फार विकास झाला नसल्यामुळे उत्पन्नाचं साधन नाही. त्यामुळे नवी पिढी बेंगळुरू आणि मंगळूरकडे निघून गेली. गावाचं सरासरी वय सध्या पन्नासच्या वर आहे. ‘मालगुडी डेज'च्या काळात गावात नव्वद कुटुंबं राहत होती, त्यांपैकी आता चाळीसच राहिली आहेत. त्यातलेही अनेकजण गाव सोडण्याच्या तयारीत आहेत. मालगुडी आता रिकामं होतं आहे. मॉन्सूनचा पाऊस न पडल्यामुळे मराठवाड्यातून होणारं स्थलांतर माहिती होतं, पण अतिपावसामुळे होणाऱ्या स्थलांतराचं हे पहिलंच उदाहरण मला समजत होतं.
सात तारखेच्या संध्याकाळी आम्ही पश्चिम घाटाचा निरोप घेऊन पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू केला. २७ मे ते आठ जून या दहा दिवसांत पावसाचा पाठलाग करताना प्रत्येक टप्प्यावर आम्हाला मॉन्सूनने आपली असंख्य रूपं दाखवली, विविधरंगी परिणाम दाखवले. वेळेची आणि प्रवासाची मर्यादा असूनही पावसाचा आणि लोकांचा जवळचा संबंध अनुभवता आला. टप्प्याटप्प्यांवर भारतीयांचं आणि मॉन्सूनचं नातं उलगडत गेलं. हा तर एकाच मार्गावरील आणि एकाच प्रदेशातील प्रवास होता. ज्या वेळी संपूर्ण भारताचं पावसाबरोबर दर्शन घेऊ त्या वेळी हातात केवढा खजिना जमा झाला असेल, या कल्पनेनेच आम्ही भारावलो होतो.

काय आहे ‘प्रोजेक्ट मेघदूत'?
पाच वर्षांत भारताच्या पाच विविध प्रदेशांमध्ये जाऊन मॉन्सूनच्या आगमनाबरोबर निसर्गात आणि समाजात होणारा बदल अभ्यासणं, विविध समाजघटकांसाठी मॉन्सूनचं असणारं महत्त्व तपासणं, शेतकरी-मच्छीमार तसेच विविध जाती-जमातींकडे मॉन्सूनबाबत असणारं पारंपरिक ज्ञान एकत्रित करणं आणि अंतिमत: भारतीय मॉन्सूनचं एक व्यापक स्वरूप मॉन्सून कोशाद्वारे (मॉन्सून एन्सायक्लोपीडिया) समोर आणणं हा ‘प्रोजेक्ट मेघदूत'मागचा व्यापक उद्देश आहे. आयएमडी, आयआयटीएम, आयआयएससी, आयआयटी आदी संस्थांद्वारे, तसंच काही विदेशी संस्थांमधूनही मॉन्सूनवर संशोधन सुरू असतं. मात्र, ते संशोधन प्रामुख्याने हवामानशास्त्रीय दृष्टीनेच केलं जातं. मॉन्सूनची हंगामाची आकडेवारी आणि नंतरच्या काळात आलेलं कृषी उत्पादन असाही अभ्यास अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून केला जातो. मात्र, मॉन्सूनचा नैसर्गिक, सामाजिक आणि अगदी विविध प्रदेशांमधील जाती-जमातींमध्ये अगदी व्यक्तिगत पातळीवर होणारा परिणाम पुरेसा अभ्यासण्यात न आल्यामुळे या प्रकल्पाला संशोधनाच्या दृष्टीनेही महत्त्व आहे.
‘प्रोजेक्ट मेघदूत'चे पुढचे टप्पे
प्रोजेक्ट मेघदूत'च्या पहिल्या वर्षीच्या पहिल्या टप्प्यात, म्हणजे गेल्या वर्षी केरळ ते महाराष्ट्र व्हाया पश्चिम घाट असा प्रवास झाला. मागच्या वर्षी दुसऱ्या टप्प्यात मेघदूतच्या टीमने कोकण, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात फिरून शेतकरी, मच्छीमार, आदिवासी, भटक्या जमातींशी संवाद साधला. पावसाच्या बदलत्या परिणामांचे तेथील निसर्गावर, समाजजीवनावर, अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतात याची माहिती जमा केली. शेतकरी-मच्छीमारांकडे पावसाच्या अंदाजासाठी काही पारंपरिक पद्धती असतात, त्यांची त्यांच्या जागेवरून घ्यायची काही निरीक्षणं असतात, त्याविषयी जाणून घेतलं.
या वर्षी मॉन्सूनच्या आगमनासोबत ‘प्रोजेक्ट मेघदूत'चा दुसरा टप्पा सुरू होईल. या वर्षी साधारणपणे १५ जूनपासून मध्य भारतातून मॉन्सूनचा पाठलाग करण्यात येणार आहे. महाकवी कालिदासाने ‘मेघदूत'मधून रेखाटलेला मार्ग तपासण्याचा प्रयत्नही यंदा मेघदूतची टीम करणार आहे. नागपूरपासून सातपुडा पर्वतरांगा ओलांडून चंबळच्या खोऱ्यातून, उज्जैन, भीमबेटका, खजुराहो या मार्गाने उत्तर प्रदेश, बिहारमधील सुपीक मैदानी भागातून हा प्रवास होणार आहे. मॉन्सूनची बंगालच्या उपसागरातून येणारी शाखा हिमालयाच्या पायथ्याशी ज्या ठिकाणी थडकते त्या ठिकाणी या दौऱ्याचा समारोप होईल. इंटरनेटवरून ‘प्रोजेक्ट मेघदूत'विषयी वाचून ऑस्कर नॉमिनेशन झालेले स्टुर्ला गुनार्सन हे कॅनडियन डॉक्युमेंटरी फिल्ममेकरही त्यांच्या मॉन्सूनवरील डॉक्युमेंटरीसाठी या वर्षीच्या प्रवासात सहभागी होत आहेत. मॉन्सून, भारत आणि प्रवास या तिन्हींविषयी आपुलकी असणारं कोणीही या प्रवासात सहभागी होऊ शकतं. अट मात्र एकच आहे- प्रवास पूर्णपणे अनिश्चित आहे, त्यामुळे वाटेत येऊ शकणाऱ्या अडीअडचणींना सामोरं जाण्याची तयारी हवी.
(अनुभव, जून २०१२च्या अंकातून साभार)