आम्ही कोण?
ले 

हायवे सेक्स ट्रेंडमागे बंचरा समाजातली अमानुष प्रथा?

  • समीर गायकवाड
  • 02.06.25
  • वाचनवेळ 7 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
banchara community sex worker

बंचरा जमातीतील वेश्याव्यवसायाची प्रथा

वायव्य मध्य प्रदेशातील राज्य महामार्ग एकतीसच्या बाजूने मंदसौर ते नीमच हा प्रवास भारतीय ग्रामीण भागातील नेहमीच्या देखण्या पार्श्वभूमीवर होतो. नीमच, मंदसौर आणि रतलाम जिल्ह्यांतील सत्तरेक 'डेरा' - वस्त्यांमध्ये - समुदायाचे हजारो लोक विखुरले आहेत. मंदसौरमध्ये त्यांची वस्ती इंदूरपासून सुमारे दोनशे किमी अंतरावर आहे. ही बंचरांची भूमी आहे. इथल्या शिवपुरी गावात बंचरा या भटक्या जातीत एक प्रथा पाळली जाते. एकेकाळी या जमातीमधील कर्त्या पुरुषांनी गरीब समाजबांधवांवर त्यांनी त्यांच्या मुली स्थानिक सरदारांना द्याव्यात म्हणून दडपण आणलं. पुढे जाऊन त्याच्यातूनच ही परंपरा तयार झाली. आपल्या मुलींची बिनपैशाची सोय लागते या नीच स्वार्थी हेतूने हा रिवाज कधीच बंद झाला नाही!

मंदसौर, नीमचला जवळून ओळखणारे लोक सांगतात की ब्रिटिश काळात बंचरा आदिवासींना राजस्थानमधून नीमचमध्ये आणलं गेलं. त्या काळात जे इंग्रज आपल्या बायकांसह भारतात आले नाहीत ते भारतीय महिलांचं शारीरिक शोषण करायचे. ही परिस्थिती पाहून स्थानिक राजा दुखावला गेला. त्यानंतरच बंचरा कुटुंबियांना राज्यात आणण्याचा निर्णय घेण्यात आला. बंचरांच्या आगमनानंतर स्थानिक महिलांशी इंग्रजांची जबरदस्ती थांबली. ब्रिटिशांनी १९४७ मध्ये देश सोडला आणि २० वर्षांनंतर १९६७ मध्ये सीआरपीएफ नीमचमध्ये आले. हा सीआरपीएफचे पहिला कॅम्प असल्याचं सांगितलं जातं. त्यानंतर बंचरा इथेच राहिले. जेव्हा-जेव्हा बंचरांबद्दल माध्यमांमध्ये मोठी बातमी आली, तेव्हा लगेचच त्यांच्या पुनर्वसनाची चर्चा झाली. त्यांना हमरस्त्याच्या एका कडेला दूरवर लोटण्यात आलं. नंतर ही बातमी जुनी झाल्यावर सर्वजण त्यांना विसरले आणि ते पुन्हा रस्त्याच्या कडेला राहायला आले.

प्रथा कशी पाळली जाते

या प्रथेनुसार, घरातील थोरल्या स्त्रीने घर नीट चालावं म्हणून बाहेरख्याली व्हायचं. त्यासाठी या बायकांचा रीतसर बाजार भरवला जातो. परंपरेच्या नावाखाली आपल्या मुलींना वेश्याव्यवसाय करायला लावण्यात आजही अनेक पुरुषांना काही चूकीचं वाटत नाही. कुटुंबातील मोठी मुलगी वेश्या बनते आणि ती वृद्ध होईपर्यंत कुटुंबासाठी कमावते. तिची पाळी गेल्यावर म्हणजेच ती भाकड(!) झाल्यावर दुसरी तरुण मुलगी तिची जागा घेते. कुटुंबातील पुरुष सदस्य पिंपाचे (दलालाचे) काम करतात.

यामुळेच या हायवेवर संपूर्ण भागात रस्त्याच्या कडेला मुली दिसतात! त्यांचे चेहरे रंगवलेले असतात आणि त्यांच्या कमाईच्या दिवशी म्हणजे रविवारी त्या सर्वोत्तम पद्धतीने सजलेल्या असतात. रस्त्याच्या कडेने बाज टाकून त्यावर या मुलींना बसवलेलं असतं. ग्राहकांना आकर्षित करण्याच्या आशेने या स्त्रिया कधी ट्रक ड्रायव्हर्सना तर कधी आलिशान कारमधील पुरुषांना खाणाखुणा करत असतात. यातल्या बहुतेक मुली अल्पवयीन असतात!

या मुलींचा बाजार अगदी रीतसर भरतो!

या लिलाववजा बाजारात, वयात आलेल्या मुलींची, तरुण स्त्रियांची आणि पोक्त महिलांची बोली लावली जाते. अगदी थेट स्टॅम्पपेपरवर करारपत्र करून त्यांची विक्री केली जाते. दहा रुपयापासून ते दहा हजार रुपयांपर्यंतची बोली लागते आणि एका वर्षासाठी त्या बाईचा पाट लावून दिला जातो. थोडक्यात त्या अभागी मुलीला एका वर्षाचा नवरा करून घ्यावा लागतो. करारानुसार वर्ष पूर्ण होताच तो पुरुष तिला सोडून देतो मग ती पुन्हा बाजारात उभी राहते, पुन्हा तिची बोली लागते. चुकून एखाद्या वर्षी तिची बोली लागलीच नाही तर तिचा सख्खा भाऊ किंवा तिचा जन्मदाता बाप तिचा दलाल बनतो. ती याला नकार देऊ शकत नाही. ती भाकड होऊन बिनकामाची झाल्यावर तिची जागा दुसऱ्या ज्येष्ठ स्त्रीला / मुलीला घ्यावी लागते. मग ती तिची मुलगी असू शकते, सून असू शकते वा रक्ताच्या नात्यातली आणखी कुणीही असू शकते.

हायवे सेक्स ट्रेंड आणि हायवे ह्युमन ट्रॅफिकिंगला खतपाणी घालणारी प्रथा

आपल्या देशातील हायवे सेक्सचा ट्रेंड आणि हायवे ह्युमन ट्रॅफिकिंगचे जनकत्व रतलाम नीमच हायवेवर चालणाऱ्या सेक्सवर्किंगला द्यावं लागतं.

काही मुलींना हा धंदा त्यांच्याच गावात करावा लागतो. त्यांच्या बरोबरीच्या मुली शिक्षण घेत असतात, स्वच्छंदपणे बागडत असतात आणि यांना मात्र रोज नित्य नेमाने कुस्करलं जातं! त्यांच्याच कुटुंबातले काही लोक त्यांची दलाली करतात याचा त्यांना धक्का बसत असेल! अवघ्या १२ ते १४ वर्षे वयाच्या मुलींना त्यांच्याच पालकांकडून या नीच व्यवसायात ढकललं जातं. अपवाद वगळता सर्वच मुली स्वतःच्या गावाच्या हद्दीत राहतात, जिथे त्यांच्या पोटी अनैतिक, लावारिस म्हणून लेबल असलेली अपत्यं जन्माला येतात. काही काळ विरोध केल्यानंतर त्यांना कळून चुकतं की वेश्याव्यवसाय हीच त्यांची जीवनशैली बनली आहे आणि ही परंपरा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे, सबब आपण काहीच करू शकत नाही.

कुठल्या मुलाला बंचरा मुलीशी लग्न करायचं असेल तर वधूपिता त्याच्याकडे हुंडा मागतो. गरीब बंचरा पोरांना वधू शोधणं कठीण जातं. त्यामुळे मुलींची लग्नं होण्याचं प्रमाण कमी आहे. पर्यायाने त्यांना बाजारात उभं करणं सोपं जातं.

या मुलींना कोणतंही ठोस भवितव्य नाही की कोणत्या सरकारी योजनाही त्यांच्यासाठी राबवल्या जात नाहीत.

प्रथा बंद पाडण्याचे प्रयत्न

ही प्रथा बंद व्हावी म्हणून आजवर अनेकांनी व्यक्तिगत पातळीवर तर काही एनजीओंनी संस्था स्वरूपात तक्रारी करून पाहिल्या. प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेण्यात आलं, पण एकही पीडित स्त्री आजवर तक्रार देण्यासाठी पुढे आलेली नाही हे वास्तव आहे.

खाकरीया खेरी गावात पन्नास वर्षीय निर्मला यांनी आपल्या आयुष्यातला बहुतांश काळ वेश्या म्हणून व्यतित केलाय. त्यांची पंचवीस वर्षांची तरुण मुलगी रोमा हिला देखील हाच व्यवसाय स्वीकारणं भाग पाडलं गेलं. रोमाने रोजंदारीवर काम करणाऱ्या मुकेशशी लग्न केलं. त्याच्यापासून तिला दोन मुलं झालीत. ती शाळेत जात आहेत. रोमाची इच्छा आहे की तिच्या मुलाबाळांनी वेगळा मार्ग धुंडाळला पाहिजे, या दलदलीत त्यांनी येऊ नये.

१९९८ मध्ये 'निर्मल अभियान' या मोहिमेअंतर्गत बंचरांच्या वसाहतींना वेढा घालून काही अल्पवयीन मुली ताब्यात घेण्यात आल्या होत्या. त्यांनी आपल्याला जबरदस्तीने डांबून ठेवल्याची तक्रार देण्यास संमतीही दर्शवली होती. या मुलींना पुढे इंदूर इथं वसतीगृहात ठेवलं गेलं, पण नंतर व्हायचं तेच झालं.

२०१४ मध्ये या समाजावर आजवरची सर्वात मोठी पोलीस कारवाई झाली. पोलिसांनी छापे टाकले. बंचरा समाजात घबराट पसरली. अनेकांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर मानवी तस्करीचा आरोप ठेवण्यात आला. पण ते सहा महिने चाललं. पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या' सुरु झालं. मुळात ही प्रथा बंद व्हावी अशी कोणत्याही राजकीय पक्षाची तीव्र इच्छा नाही असं दिसंतय. राजकीय पक्षांचे पाठबळ असलेले दलाल आणि या मुलींचे आप्तेष्ट यांचं नेक्सस इथे दिसून येतं.

कालांतराने बंचरांना आणखी एक गोष्ट कळून चुकलीय की मीडिया हा त्यांचा हितचिंतक नाही! त्यामुळे मध्यंतरी बंचरांच्या जातपंचायतीमध्ये असे ठरलं की कोणताही बंचरा मीडियाच्या कॅमेऱ्यासमोर येणार नाही.

आतूनच विरोध व्हायला पाहीजे

पप्पू दायमा नावाच्या तरुणाने 'बंचरा समाज सुधार समिती'ची स्थापना करून काही महिलांचं मतपरिवर्तन केलंय. दायमा यांना वाटतं की, 'समाजातील वयस्क धुरिणांना परंपरेच्या नावाखाली निष्क्रिय बसायचं आहे आणि आपल्या मुलींना वेश्या बनवायचं आहे. मुलींना कर्मठ अनैतिक व्यवहाराच्या या वातावरणातून बाहेर काढलं पाहिजे आणि योग्य शिक्षण दिलं पाहिजे. त्यांना पर्यायी जीवनाचा मार्ग दाखवला पाहिजे. वास्तवात ही एक दीर्घकालीन प्रक्रिया आहे आणि ज्येष्ठ प्रभावी लोकांनी या कामात उतरलं पाहीजे'.

आपल्या मुलींना वेश्या म्हणून काम करायला लावणाऱ्या बंचरा पालकांविरुद्ध कठोर पोलिस कारवाई केली गेली आणि त्याला सरकारी पाठिंबा मिळाला तर ही प्रथा संपुष्टात येऊ शकते, असं इथे काम करणाऱ्या लोकांना वाटतं.

आशेचा किरण आहे

कंवरबाई ही पहिली स्त्री ठरलीय जिने पहिलं लग्न केल्यानंतर बाजारात उभं राहण्यास नकार दिलाय. मुकेश दायमा आणि दिव्या या जोडप्याने पहिल्यांदा विद्रोह केला आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतरही दांपत्य म्हणून राहण्याचा निर्धार केला. या युगुलाला संपवून टाकण्यासाठी समाजाने जंग जंग पछाडलं पण पप्पू दायमांनी त्यांना आश्रय दिला. ही क्रूर प्रथा संपवण्याच्या तरुण पिढीच्या प्रयत्नांमुळे अनेक तरुणांचं समाजातील वडिलधाऱ्यांशी भांडण झालं आहे पण अनेकजण या जोखडातून सुटण्यात यशस्वीही झाले आहेत. अनेकांनी व्यवसाय सोडला, शिक्षण घेतलं आणि काहींना सरकारी नोकऱ्याही आहेत. त्यापैकी एक ‘पटवारी’ बनला आहे तर इतर अनेक परिचारिका, शिक्षक आणि वन विभागाचे कर्मचारी आहेत.

सुस्थितीत असलेले अनेक बंचरा ‘डेरा’ मधून जवळच्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये स्थलांतरित झाले आहेत आणि त्यांनी स्वतःला ‘सोंढिया राजपूत’ म्हणवून त्यांचं आडनावही बदललं आहे.

पण बदलासाठी मोजावी लागणारी किंमत प्रचंड आहे आणि बदलाचा वेग अतिशय मंद आहे

वासनांना परंपरेच्या वस्त्राआड लपेटले की त्या बाजाराचं आपल्याला फारसं शल्य नसतं. कारण आपण आपल्या परंपरांचे गळू मोठ्या आनंदाने जोपासत असतो.

एकीकडे आपण आपल्याच कोशात जगत असतो नि दुसरीकडे आपल्या पांढरपेशी विश्वास समांतर परिघात एक अशी दुनिया नांदत असते जी आपल्या खिजगणतीतही नसते! या दुनियेत वासनांचा बाजार भरतो आणि या बाजारात विकल्या गेलेल्या मुलींच्या आयुष्याचे कायम धिंडवडे निघतात! सरकार, प्रशासन आणि समाज इथे नाकर्त्याच्या भूमिकेत असतो!

"यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः" हे आपले दाखवायचे दात आहेत, खायचे दात काही और आहेत ज्या बद्दल बोलण्यास सक्त मनाई आहे!

समीर गायकवाड







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

सुहास पाटील 02.06.25
अभ्यासपूर्ण लेख खिजगणतीतही असा शब्द हवा. चुकून खिजगणतीतही असं लिहिलं गेलं आहे.
See More

Select search criteria first for better results