एकदा मुल्ला नसरुद्दिनच्या गावातले सगळे लोक धार्मिक यात्रेसाठी निघाले. सगळ्यांनी जंगी तयारी केली होती. यात्राच मोठी अन् पवित्र होती. फक्त नसरुद्दिन घरी निवांत होता. कोण लागणार त्याच्या नादी? भल्या पहाटे सारे गावकरी आपलं सामानसुमान गाड्यांवर, उंटांवर अन् गाढवांवर लादून अल्लाचं नाव घेत निघाले. त्याच दिवशी सूर्य मावळतीला कलला असता नसरुद्दिन आपल्या गाढववर बसून त्याला जोरजोरात दौडवत त्यांच्याकडे येताना दिसला. सारे चक्रावले. मुल्ला जवळ आला. तो घामाघूम होऊन धापा टाकत होता. त्याचं गाढव तोंडातून फेस गाळत होतं. लोकांनी विचारलं, “मुल्ला, अरे काय झालं?” मुल्ला म्हणाला, “माझं गाढव कुठे आहे? मी त्याला शोधत पळतोय.” लोकांनी त्याला वेड्यात काढलं. म्हणाले, “अरे मुल्ला, वेडा की खुळा? तू तुझ्या गाढवावरच सवार आहेस. गाढव तुझ्या जवळ आहे अन् तू मूर्खासारखा त्याला शोधत भटकतो आहेस!”
मुल्ला लगेच म्हणाला, “तुम्हाला जर एवढं कळतं, तर तुम्ही तुमच्या जवळ, तुमच्या मनात असणाऱ्या अल्ल्लाला भेटण्यासाठी भलत्या गावी कशाला चालला आहात!”
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.
