
सध्या शिवसेना आणि मनसे यांच्या मनोमीलनाची चर्चा झडतेय. हे दोन पक्ष जवळ यावेत असं वाटणाऱ्यांची संख्या मुंबईत बरीच आहे. विशेषत: या दोन्ही पक्षांच्या मतदारांमध्ये ही इच्छा तीव्र आहे. हे दोन पक्ष एकत्र आले तर मराठी मतांची फूट टळेल आणि मुंबईतून मराठी माणूस राजकारणातून हद्दपार होण्याची भीती कमी होईल, असं त्यामागचं गृहीतक असतं. कोणतीही निवडणूक आली की ही भूमिका मांडणारे जागे होतात; हे दोन्ही पक्ष टाळी देण्याचं बोलतात पण पुढे काही घडत नाही.
येत्या महापालिका निवडणुकीवेळची परिस्थिती मात्र जरा वेगळी आहे. भाजपचा मुंबईत आणि एकूणच शहरांमध्ये जोरदार विस्तार झालेला आहे. केंद्रात आणि राज्यात भक्कम सत्ता असल्याने भिंतीवर बसणारेही त्यांच्या कुंपणात उड्या मारत आहेत. त्यामुळे भाजपसोबत सामना करणं शिवसेना किंवा मनसे यांना सोपं नाही.
दुसरी गोष्ट, शिवसेनेमध्ये उभी-आडवी-तिरकी फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे पायच कापून टाकले आहेत. मुंबई, ठाणे आणि परिसरातील महानगर पालिकांमधील शिवसेनेचं अस्तित्वच त्यामुळे धोक्यात आलं आहे. इथे शिंदे आणि भाजप यांना टक्कर दिली नाही, तर दीर्घकाळ या भागात उभं राहता येणार नाही, याची जाणीव शिवसेनेला असणार.
त्यामुळे शिवसेनेचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा खरा राजकीय वारस कोण याचा वाद तूर्त बाजूला ठेवता येईल. महापालिका निवडणूक शक्य तिथे एकत्र लढवावी, असा विचार दोन्ही ठाकरे बंधू आणि ठाकरे पुतणे यांचा असू शकतो. तशी सूचक विधानं त्यांच्याकडून होतही आहेत. पण तरीही एकूणात एकमेकांचा अदमास घेण्याचाच टप्पा अजून चालू आहे. दोन पक्षाध्यक्षांनी एकमेकांना थेट भेटून काय तो विषय संपवण्याचा टप्पा अजून गाठला जात नाहीये. असं घडतंय त्याला कारणं आहेत.
एकतर, कुणी कुणाला ऑफर द्यायची हा नेहमीचा इगोचा प्रश्न असणार. कारण यापूर्वी राज ठाकरे यांनी दोस्तीचा हात पुढे केला होता, पण त्यांची फसवणूक केली गेली, असं आजवर सांगितलं गेलं आहे. दुसरी गोष्ट, मनसेसोबत युती केली तर आजवर मतं मिळवू न शकलेल्या प्रतिस्पर्धी पक्षाला जीवनदान मिळण्याचा धोका उत्पन्न होऊ शकतो, असं शिवसेनेला आजवर वाटत आलेलं आहे. मुलुखमैदानी भाषणांसाठी आणि दोन-पाच टक्के मतांच्या वाढीसाठी एवढी मोठी जोखीम का पत्करावी, असं शिवसेनेला वाटत असणार. शिवाय, दोन्ही पक्षांचा मतदार वर्ग आणि प्रभावक्षेत्र एकच असल्याने तिकीट वाटपातही टोकाची स्पर्धा निर्माण होऊन घोळ होण्याची शक्यताही आहेच. दोन्ही पक्षांचा स्वभाव आक्रमक असल्याने ऐन निवडणुकीत इच्छुक कार्यकर्ते एकमेकांच्या उरावर बसण्याची भीतीही नेत्यांना वाटत असणार. त्यामुळे राजकीय अपरिहार्यता असूनही किंवा अस्तित्वाची लढाई लढली जात असूनही हे दोन पक्ष एकत्र येतील किंवा येऊनही फारसा फायदा होईल, असं नाही.
येत्या चार-सहा महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक महापालिका आणि नगरपालिकांसाठी निवडणुका होणार असल्या तरी या दोन पक्षांचा जीव प्रामुख्याने मुंबई अणि परिसरातील निवडणुकांमध्ये अडकलेला आहे. मात्र ज्या परिसरात बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व गाजवलं तिकडेच आज मोठं खिंडार पडलं आहे. शिवाय मुंबईत शिवसेनेला जेमतेम १० टक्के मतं मिळाली आहेत, तर मनसेला जेमतेम दीड टक्का. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र येऊन फारसं काही घडणार नाही, असं आकडे सांगतात. ही गोची समजून घेतल्याशिवाय या पक्षांना आजच्या गर्तेतून बाहेर पडणं शक्य नाही. ती समजून घेतली आणि महाराष्ट्राच्या राजकारणात असलेली पोकळी भरून काढण्याची भूमिका घेतली, तरच बाळासाहेब ठाकरेंच्या या दोन पक्षांना काही भवितव्य असणार आहे.
या दोन पक्षांची खरी गोची भाजपने केलेली आहे. गेली काही वर्षं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने भाजपशी पंगा घेतला आहे खरा, पण त्यामुळे त्यांची गोचीतून सुटका झालेली नाही. दुसरीकडे, राज ठाकरे यांनी एकच एक भूमिका न घेता कधी भाजपच्या बाजूने तर कधी त्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे त्यांचं राजकारण खरोखरच भाजपच्या विरोधात आहे का, हे पुरेसं स्पष्ट झालेलं नाही. शिवाय संधी मिळताच हे दोन्ही पक्ष हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपशी जुळवून घेऊ शकतात, असं म्हणणारे लोक आहेतच. (देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या नुकत्याच झालेल्या भेटीची चर्चाही सध्या जोरात आहे!)
पण या दोन पक्षांनी एकत्र येऊन मराठी माणसाच्या अस्तित्वाच्या मुद्द्यावर भाजपशी मुंबईत सामना करायचा ठरवला तरी तो अपुराच ठरणार आहे. याचं साधं गणिती कारण मुंबईत मराठी टक्का ३०-३५च्या वर नाही आणि अमराठी, विशेषत: गुजराथी आणि उत्तर भारतीय लोक भाजपच्या सोबत आहेत. त्यामुळे या दोघांमधील लढाई असमान असणार आहे, हे उघड आहे. शिवाय मराठी माणसं हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसोबत जाणार आहे, हेही आहेच.
इथेच खरी गोची आहे. गेली काही वर्षं शिवसेना आणि मनसे हे पक्ष हिंदुत्व आणि मराठीचा मुद्दा असे दोन्ही मुद्दे घेऊन पुढे जाऊ पाहत आहेत. पण गेल्या तीस-पस्तीस वर्षांचा इतिहास पाहिला तर हिंदुत्ववादी मतदारांची पहिली पसंती भाजप हीच राहिलेली आहे. या मुद्द्याचा होलसेलर शेजारी असताना वाट वाकडी करून किरकोळ दुकानदारांकडे का जावं, असा प्रश्न लोकांना पडणं स्वाभाविक आहे. पण बाळासाहेब ठाकरेंनी १९९०नंतर हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतल्यामुळे या पक्षाचा त्यानंतर जोडला गेलेला मतदार हिंदुत्वाचाच आग्रह करणारा आहे. तो मतदार गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून भाजपकडे वळला आहे. शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत केलेल्या युतीमुळे हे घडलं असं मानलं जातं. पण तशी युती न होती तरी ती मतं शिवसेनेकडे राहिली असती असं नव्हे.
याचा अर्थ आमचंच हिंदुत्व शिवरायांचं आहे असं म्हणून निवडणुका जिंकता येतील, असं महाराष्ट्राचं राजकारण राहिलेलं नाही. मराठीपणाचा मुद्दाही केवळ मराठी पाट्यांसारख्या भावनिक मुद्द्यावर लढवून अपेक्षित पाठिंबा मिळेल असंही राहिलेलं नाही. त्यामुळे हिंदुत्व आणि मराठीपणाच्या मुद्द्यापलीकडे जाऊन लोकांच्या खऱ्या प्रश्नांवर राजकारण होत नाही, तोवर या पक्षांचा मतांचा टक्का वाढण्याची शक्यता नाही. आज महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे, ग्रामीण अर्थव्यवस्थेचे, बेरोजगारीचे, शहरांच्या व्यवस्थापनाचे, झोपडवस्त्यांचे वगैरे प्रश्न एवढे गंभीर बनले आहेत की त्यांना गंभीरपणे हात घातला, तरच मतदार या पक्षांकडे ओढले आणार आहेत. उद्धव ठाकरे तसा प्रयत्नही करत आले आहेत. पण त्यांचा दौरा आटोपला की राजकारणही आटोपतं. त्यांनी हात घातलेल्या प्रश्नांवर नंतर फॉलोअप देण्याची यंत्रणा विकसितच झालेली नाही. कारण तसं प्रशिक्षण, संस्कार झालेले नाहीत. नेत्यांनी हिंदुत्वाबद्दल आग्रही व्हावं आणि आक्रमक भाषणं करावीत, अशीच त्यांच्या कार्यकर्त्यांची अपेक्षा असते. मात्र तसं करून मतं मिळत नाहीत हे त्यांच्या अजून लक्षात येत नाहीये.
खरं पाहता, महाराष्ट्राचा खरा प्रादेशिक पक्ष बनण्याची शक्यता शिवसेनेमध्ये भरपूर आहे. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळात तसा प्रयत्नही केला आहे. पण केवळ नेत्याने भाषणं करून काही घडत नाही. कारण जोरदार भाषणं करून पाठिंबा मिळवण्याची फौज भाजपकडे गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र आहे. त्यांच्यासमोर कुणाचा निभाव कसा लागणार? राज ठाकरेंची भाषणं आणि त्यांच्या कोणत्या विधानांना चित्कारी प्रतिसाद मिळतो हे पाहिलं तर मनसैनिक याबाबतीत खूपच मागे आहेत, हे कुणालाही कळावं.
थोडक्यात, स्वत:चं अस्तित्व टिकवायचं आणि वाढवायचं तर या पक्षांना भाजपने ताब्यात घेतलेला हिंदुत्वाचा मुद्दा धरून ठेवण्याचा आग्रह सोडायला हवा. लोकांचे प्रश्न तडीला लावणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करायला हवी. मराठी माणसांचे, भाषेच्या पलीकडचे मुद्दे लढवणारा आणि सोडवणारा पक्ष अशी पुनर्रचना केली गेली, तरच ते भाजपसमोर टिकू शकणार आहेत. अन्यथा संधी पाहून भाजपच्या तंबूत शिरून शरणागती पत्करावी लागणं एवढंच त्यांच्या नशिबी असेल.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.