
तुम्हाला कॅडबरी माहिती आहे? अर्थातच माहिती असणार. बरं, तुम्हाला मोरडे माहिती आहेत? कॅडबरी आणि मोरडे ही नावं एकत्र घेण्याचा संदर्भ विचाराल, तर ही दोन्ही नावं चॉकलेटशी घट्ट जोडलेली आहेत. जॉन कॅडबरी नावाच्या माणसाने 1824 साली इंग्लंडमध्ये चॉकलेटचा कारखाना सुरू केला. त्या कारखान्यात तयार होणारी कॅडबरी चॉकलेट्स आज जगभर प्रसिद्ध आहेत, तर चंद्रकांत मोरडे हे आजघडीला देशातले सर्वांत मोठे चॉकलेट उत्पादक आहेत. त्यांच्या ‘मोरडे फुड्स' कंपनीचं चॉकलेटचं उत्पादन वर्षाला पंचावन्न हजार टन (पाचशे पन्नास लाख किलो) इतकं आहे. चंद्रकांत मोरडे आणि त्यांच्या चॉकलेट उद्योगाची कहाणी ऐकण्यासारखी आहे.
चंद्रकांत मोरडे यांचे वडील एकनाथ मोरडे मूळचे पुणे जिल्ह्यातल्या मंचरचे. 1952 पासून ते मुंबईतल्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये फळांचा व्यवसाय करत होते. पुढे त्यांनी भायखळा मार्केटमध्ये भाजीपाल्याचा व्यवसायही सुरू केला. हे सांगायचं कारण म्हणजे मोरडे कुटुंबात व्यवसायाचा वारसा होता. एकनाथ मोरडे आपल्या सात मुलांसह मुंबईतल्या काळबादेवी परिसरात राहत होते. त्यामुळे मुलांचं शिक्षण मुंबईतच झालं. भावंडांमध्ये चंद्रकांत सगळ्यात थोरले. त्यांनी बी.एस्सी. पूर्ण केल्यानंतर मुंबईतल्या प्रसिद्ध यू.डी.सी.टी.मध्ये (युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, म्हणजेच आताचं आय.सी.टी.- इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी) ‘फुड टेक्नॉलॉजी' या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली. त्याच दरम्यान व्यवस्थापनाची पदविकाही त्यांनी प्राप्त केली. या शिक्षणाच्या बळावर त्यांना 1972 साली ‘कॅडबरी'मध्ये नोकरी मिळाली. तिथे संशोधन विभागात काम करताना त्यांना कंपनीच्या नामांकित उत्पादनांसाठी काम करण्याची संधी मिळाली. तिथे त्यांनी 10 वर्षं मन लावून काम केलं; पण त्यांना आणखी मोठं आकाश खुणावत होतं.
नोकरी चालू असतानाच स्वत:चा व्यवसाय करण्याच्या हालचाली चंद्रकांत यांनी सुरू केल्या. ‘कॅडबरी'सारख्या प्रतिष्ठित कंपनीतली मानाची नोकरी आणि उत्तम पगार सोडून स्वतंत्र व्यवसायाचा विचार करणं हे तर्काला धरून नव्हतं. पण कर्तबगार माणसं रूढ चौकटी स्वेच्छेने मोडतात. चंद्रकांत यांनी नेमकं हेच केलं. व्यवसायासाठीच्या हालचालींची त्यांची सुरुवात मात्र मोठी गमतीशीर होती. ‘कॅडबरी'मध्ये चॉकलेट बनवण्याचं पूर्ण ज्ञान त्यांना अवगत झालेलं होतं. त्यामुळे चॉकलेटचाच व्यवसाय करायचा विचार मनात पक्का होता. पण ‘कॅडबरी'सारखी उपकरणं विकत घेण्याची त्यांची आर्थिक क्षमता नव्हती. शिवाय त्या काळात ती उपकरणं सहजी उपलब्धही नव्हती. त्यामुळे चंद्रकांत यांनी काय केलं, तर इडलीचं पीठ वाटण्याचं एक दगडी यंत्र मिळवलं. त्यामध्ये चॉकलेट बनवण्याचे प्रयोग केले. ते प्रयोग यशस्वी झाल्यावर चॉकलेटचं उत्पादन सुरू केलं. रोज रात्री 9-10 वाजता ते नोकरीवरून परत येत आणि पुढचे चार-पाच तास हे काम करत. या कामात त्यांच्या पत्नी आणि घरातली इतर मंडळीही हातभार लावत. पुढे देशातला मोठा उद्योग बनलेल्या ‘मोरडे फुड्स'चं पहिलं पाऊल हे असं पडलं.
1980च्या दशकातल्या मुंबईचा विचार केला तर आजच्या तुलनेत चॉकलेटचा ग्राहक मर्यादित होता. कनिष्ठ मध्यमवर्गीयांची संख्या मोठी होती, अशा घरांमध्ये चॉकलेट विकत घेऊन खाण्याची फारशी पद्धत नव्हती. ‘कॅडबरी'सारख्या नामवंत कंपन्यांच्या उत्पादनांची विक्रीही तशी कमीच होती. त्यामुळे बाजारपेठ मिळवणं हे चंद्रकांत यांच्यापुढे आव्हान होतं. त्या बाबतीत विचार करून त्यांनी बेकऱ्यांपासून मार्केटिंगला सुरुवात केली. भायखळा, फोर्ट आणि बांद्रा हे तीन विभाग सोडले तर मुंबईत फार कमी बेकऱ्या होत्या. सुरुवातीला त्यांनी अमेरिकन एक्सप्रेस, कँडीज, माँजिनीज किंवा सिल्वानियासारख्या बेकऱ्यांमध्ये माल दाखवला. सुखद बाब म्हणजे मालाची गुणवत्ता उत्तम असल्यामुळे त्यांच्या मालाला पसंती मिळू लागली. त्या काळात बेकऱ्यांमध्ये ब्रेडच्या सोबत मावा केक किंवा फ्रुट केक ठेवले जायचे. ‘मोरडे' यांच्यामुळे चॉकलेट केक बनू लागले आणि इतर केकवरही चॉकलेटचा थर चढू लागला. अशा रीतीने व्यवसायाची सुरुवात कुटुंबाचा उत्साह वाढवणारी ठरली.
1982च्या सुमाराला चंद्रकांत यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू करण्याचा विचार वडिलांकडे बोलून दाखवला. वडील स्वत: व्यवसायात असल्यामुळे म्हणा किंवा ते सर्वसामान्य मध्यमवर्गीय मराठी वडिलांसारखे नसल्यामुळे म्हणा, त्यांनी चंद्रकांत यांना प्रोत्साहन दिलं. चंद्रकांत यांनी लगेचच नोकरीचा राजीनामा दिला. मग वडील आणि मुलांनी मिळूनच जागेचा शोध सुरू केला. मनासारखी जागा शोधत ते थेट लोणावळ्यापर्यंत पोचले. मग मात्र वडिलांना थेट मंचर खुणावू लागलं. मंचरमध्ये त्यांची स्वतःची जमीनही होती. मात्र, मंचरला चॉकलेटसारखा व्यवसाय सुरू करणं सोपं नव्हतं. पण वडील आणि मुलाचं एकमत झालं. त्यांनी मंचरमध्येच व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. मात्र, तिथे पहिल्याच दिवसापासून अडथळ्यांची शर्यत सुरू झाली.
डिसेंबर 1983 मध्ये चंद्रकांत मोरडे यांनी कुटुंबाच्या मदतीने ‘मोरडे फुड्स' या व्यवसायाची स्थापना केली. सगळं उत्पादन मंचरमध्ये आणि विक्री मुंबईत, असं धोरण निश्चित झालं. त्या काळी मंचरच काय, संपूर्ण आंबेगाव तालुक्यातही उद्योगधंद्यांना पूरक वातावरण नव्हतं. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न पाण्याचा होता. दूरवरून टँकरने पाणी आणावं लागत होतं. तालुक्यातले आणि पुणे-मुंबईकडे जाणारे रस्ते खराब होते. खासगी वाहनं नव्हतीच, पण एस.टी.च्या सुविधाही पुरेशा नव्हत्या. टेलिफोन सेवा नव्हती. फोन करण्यासाठी दुचाकी काढून मंचर गावात जावं लागे. कूलिंगची सोय नसल्याने थंडीमध्ये तर हवेतल्या गारव्यातच चॉकलेट थंड करावं लागे. एक मिक्सर आणि एक रिफायनरवर काम चालू होतं; पण पूर्ण वेळ वीज नसल्याने कामात अडथळे येत होते. या सगळ्यातून तयार झालेलं चॉकलेट बैलगाडीने एस.टी. स्टँडपर्यंत आणि पुढे एस.टी.बसने मुंबईपर्यंत न्यावं लागत होतं. ग्रामीण भागात स्वत:चा उद्योग उभारणं किती कटकटीचं ठरू शकतं याचा यावरून अंदाज यावा. या कटकटीपेक्षा मुंबईतली सुखाची नोकरी बरी, असा विचार कुणी केला असता तरी ते चूक म्हणता आलं नसतं. पण चंद्रकांत यांची जिगर माघार घेणारी नव्हती.
मंचर ते मुंबई हा प्रवास चंद्रकांत यांनी किती वेळा केला असेल याची गणती करणं कठीण आहे. त्यांना दोन्ही ठिकाणी पाय रोवून उभं राहणं गरजेचं होतं. मुंबईत प्रत्यक्ष बेकऱ्यांमध्ये जायचं, तिथे चॉकलेटचे नमुने दाखवायचे, त्यापासून कोणकोणते पदार्थ बनू शकतील हे सांगायचं, किमतीची चर्चा करायची आणि होकार मिळवायचा, असं करत करत त्यांनी जास्तीत जास्त बेकऱ्यांशी जोडून घेण्याचा सपाटा लावला. बेकऱ्यांमधली मागणी वाढत असतानाच त्यांनी ‘ताज' आणि ‘ओबेरॉय' या पंचतारांकित हॉटेल्सशी संपर्क केला. त्यांच्याकडे टेबल डेकोरेशन, जेवणानंतरचे गोड पदार्थ आणि इतर बाबींसाठी चॉकलेट कसं उपयोगी पडेल हे उदाहरणांसह सादर केलं. गुणवत्ता आणि सादरीकरण या बळावर दोन्ही हॉटेल्सनी त्यांचा माल घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे नंतर मुंबईतली अनेक हॉटेल्स त्यांच्याकडून चॉकलेट घेऊ लागली. याच काळात दक्षिण मुंबईच्या काही भागातल्या भेटवस्तूंच्या दुकानांमध्ये चॉकलेटचे बॉक्सेस ठेवले जाऊ लागले. वाढदिवस, दिवाळी किंवा नववर्ष भेट म्हणून चॉकलेट्स दिली जाऊ लागली. तिथेही मागणी निर्माण झाली. बाजारपेठ विस्तारू लागली. पण ‘मोरडे फुड्स'ला खरा ब्रेक मिळाला तो 2000 सालानंतर.
1991च्या जागतिकीकरणाचे दृश्य परिणाम 2000 सालानंतर दिसू लागले. देशातल्या अनेक उद्योगांप्रमाणे ‘मोरडे फुड्स' हा महत्त्वाचा लाभार्थी ठरला. सुरुवातीला आयटीची मोठी लाट भारतात आली. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लाखो रुपयांची पॅकेजेस मिळू लागली. त्यातून चॉकलेटसाठी पैसा मोजणारा एक वर्ग तयार झाला. त्याचसोबत पारले, ब्रिटानिया आणि आय.टी.सी.सारख्या बिस्कीट कंपन्या तुफान वेगाने वाढू लागल्या. एकीकडे बिस्किटांची मागणी वाढत होती, तर दुसरीकडे स्पर्धाही तीव्र होत होती. त्यामुळे वर्षानुवर्षं एकाच प्रकारची बिस्किटं विकून चालणार नव्हतं. वैविध्य आणणं भाग होतं. त्यातून बिस्किटांमध्ये चॉकलेट मिसळण्याच्या कल्पना पुढे आल्या. आणि त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मोठमोठ्या कंपन्या मंचरच्या मोरड्यांची आठवण काढू लागल्या.
एक क्लासिक उदाहरण ‘पारले हाइड अँड सीक' बिस्किटांचं. या बिस्किटाचं नाव घेतलं की सोनेरी आणि जांभळ्या रंगातलं वेष्टन डोळ्यांसमोर तरळतं. परदेशातल्या कुकीज बघून ‘पारले'चे मालक विजय चौहान यांना ‘हाइड अँड सीक'ची कल्पना सुचली होती. पंचाहत्तर टक्के बिस्कीट आणि पंचवीस टक्के चॉकलेट असं ते मिश्रण करायचं होतं. खाणाऱ्याच्या जिभेवर बिस्कीट आणि चॉकलेटच्या चवीचा लपंडाव सुरू झाला पाहिजे, म्हणून त्याचं नाव ‘हाइड अँड सीक'. पण बिस्कीटामध्ये कोणत्या स्वरूपात चॉकलेट मिसळायचं हे कळत नव्हतं. मग विजय चौहान यांनी मंचरला फोन केला. “चंद्रकातभाई, कुछ तो तरकीब लडाओ लेकिन ये बिस्कीट बनना चाहिए।” अशी त्यांनी चंद्रकांत मोरडे यांना गळच घातली.
दरम्यानच्या काळात चंद्रकांत यांचे धाकटे बंधू सुधीर हेही ‘मोरडे फुड्स'मध्ये दाखल झाले होते. ते इंजिनियर होते. त्यांनाही तांत्रिक बाबीत गती होती. तर चंद्रकांत, सुधीर आणि काही कर्मचाऱ्यांनी ‘पारले'साठी डोकं लढवायला सुरुवात केली. बऱ्याच चर्चा केल्या, काही प्रयोग केले; पण यश येत नव्हतं. अचानक चंद्रकांत यांना कल्पना सुचली. उन्हाळ्यामध्ये सांडगे करण्यासाठी जो साचा वापरतात तसा साचा त्यांनी बनवून घेतला. खाली मेणकापड घातलं, वर तो साचा धरला. त्यामध्ये पातळ चॉकलेट ओतलं. दोन्ही बाजूंनी एकाच वेळेला त्या साच्याला झटका दिला. त्यातून जे चॉकलेटचे थेंब खाली पडले ते गार करून त्यांनी फ्रिजमध्ये ठेवले. चॉकलेटचे असे गोठवलेले 10 किलो दाणे त्यांनी मुंबईला ‘पारले'मध्ये पाठवले. ते दाणे वापरून विजय चौहानांच्या टीमने ‘हाइड अँड सीक'चा पहिला लॉट तयार केला. पुढे त्या बिस्किटाने बाजारपेठेमध्ये विक्रीचे अनेक उच्चांक केले. पुढे मागणीप्रमाणे चॉकलेटचा पुरवठा वाढतच राहिला. एक वेळ तर अशी आली, की ‘मोरडे फुड्स'कडून दर महिना एक हजार टन चॉकलेटचा पुरवठा फक्त ‘हाइड अँड सीक' या एकाच बिस्किटासाठी चालू होता.
आयटीसी या नामवंत कंपनीबाबतीतही असंच घडलं. त्या कंपनीला ‘डार्क फॅन्टसी' नावाचं चॉकलेट बनवायचं होतं. त्यासाठी कंपनीच्या मनू मुखर्जी यांना अर्थातच मंचरच्या मोरडे यांचीच आठवण आली. आयटीसीला बाहेरून पूर्ण बिस्कीट आणि आत चॉकलेट क्रीम असं उत्पादन करायचं होतं. अशा स्वरूपाचं बिस्कीट बाजारात आलं तर प्रीमियम ब्रँड होईल असा आयटीसीच्या व्यवस्थापनाला विश्वास होता. चंद्रकांत आणि सुधीर यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने बिस्किटात सामावेल असं उत्तम चॉकलेट बनवलं. कंपनीच्या पसंतीला ते उतरलंच, पण देशभरच्या ग्राहकांनीही उचलून धरलं. सध्या आयटीसी कंपनीचं फ्लॅगशिप प्रॉडक्ट म्हणून ‘डार्क फॅन्टसी'कडे पाहिलं जातं. ‘मोरडे फुड्स'ची ही वाटचाल
पाहताना लक्षात येतं, की देशातल्या मोठ्या बिस्कीट कंपन्या आणि ‘मोरडे फुडस्' हे एकमेकांना पूरक ठरले आहेत. संशोधन, नावीन्य आणि उत्पादन या बळावर मोरडे यांनी कंपन्यांना मदत केली, तर या कंपन्यांच्या मोठ्या ऑर्डर्स मिळत गेल्याने मोरडे यांचा व्यवसायविस्तार झाला. समृद्धीचा आणि चॉकलेट सेवनाचा परस्परसंबंध असला पाहिजे. जागतिकीकरणानंतर मध्यमवर्गाच्या हातात पैसा खुळखुळू लागला. या वर्गाच्या भरवशावरच मॅकडोनाल्ड, स्टारबक्स, बर्गर किंग किंवा डॉमिनोजसारखी क्यू एस आर (क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स) देशभर सुरू झाली. या रेस्टॉरंट्सनी चॉकलेटचा उपयोग होऊ शकेल असे अनेक पदार्थ तयार केले. ग्राहकांमध्ये त्याचा प्रसार केला. परिणामी, चॉकलेटची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत राहिली. ‘मोरडे फुड्स'साठी बाजारविस्ताराची ही आणखी एक संधी होती. ती अर्थातच पूर्ण केली गेली आणि त्यासाठी उत्पादनक्षमताही वाढवली गेली.
जागतिकीकरणाप्रमाणेच जागतिक साथीमुळेसुद्धा व्यवसाय वाढू शकतो, याचा अनुभव मोरडे कुटुंबीयांनी नुकताच घेतला. कोरोना साथीमुळे सुरू असलेल्या टाळेबंदीचं निमित्त झालं. या काळात लोक घरात बसून होते. अनेकांना वेगवेगळे पदार्थ करून बघण्याची संधी मिळाली. त्यातच घरच्या घरी चॉकलेट किंवा चॉकलेटचे केक बनवण्यासारख्या रेसिपीज यू-ट्युबवरून दाखवल्या जाऊ लागल्या. त्यामुळे अचानक घराघरांतून चॉकलेटची मागणी सुरू झाली. परिणामी, किराणा मालाच्या दुकानांमधून चॉकलेटविक्री सुरू झाली. तोवर फक्त मोठ्या मॉल्समध्येच असलेले ‘मोरडे चॉकलेट बार' किराणा मालाच्या दुकानांमध्येही सहज दिसू लागले.
पूर्वी घरोघरी क्वचितप्रसंगी चॉकलेट खाल्लं जात होतं, पण नंतर ते वारंवार खाल्लं जाऊ लागलं. शिवाय त्याचा वापर बिस्किटं, आइस्क्रीम, केक आणि मिल्कशेकपासून ते औषधांपर्यंत अनेक बाबतींत होऊ लागला. मोरड्यांच्या व्यावसायिक प्रवासात मागणीच्या लाटा येत राहिल्या. वास्तविक हे उद्योजकाच्या भाग्याचं लक्षण असतं. पण अशा लाटा झेलण्यासाठी अंगात हिंमत लागते, स्वत:ची क्षमता वाढवावी लागते. कच्चा माल मिळवणं, उत्पादन व गुणवत्ता टिकवणं, वेळेत पुरवठा करणं किंवा वसुली करणं हे चक्र एका गतीने फिरवावं लागतं.
गेली चाळीस वर्षं चंद्रकांत मोरडे हे चक्र अव्याहत फिरवू शकले ते केवळ त्यांच्या कुटुंबाच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्यामुळेच. त्यांचे बंधू किशोर, सुधीर आणि संजय हे अगदी सुरुवातीच्या काळातच चंद्रकांत यांना जॉइन झाले. शिवाय या सर्व बंधूंची पुढची पिढीही काही काळाने व्यवसायात सक्रिय झाली. त्यात हर्षल मोरडे हे संपूर्ण कंपनीची सेल्स आणि मार्केटिंगची बाजू सांभाळतात. भारतीय बाजारपेठ सतत वाढती असल्यामुळे अनेक देशी-विदेशी कंपन्या चॉकलेट उत्पादनात उतरत असतात. त्या स्पर्धेला तोंड देत कंपनीचा विस्तार करण्याचं काम हर्षल यांच्या नेतृत्वाखाली चालू असतं. यासोबतच ते मनुष्यबळ विकास आणि धोरणात्मक बाबींमध्येही लक्ष घालतात. त्यांना संजय मोरडे आणि महेश मोरडे यांची तोलामोलाची साथ आहे. यातल्या प्रत्येकाच्या कर्तबगारीवर एक-एक स्वतंत्र लेख होऊ शकतो. एकाच कुटुंबातल्या एवढ्या सदस्यांनी दीर्घकाळ असं एकत्र काम करणं हे मराठी उद्योगविश्वातलं दुर्मिळ उदाहरण आहे.
‘मोरडे' हे एवढे मोठे चॉकलेट उत्पादक आहेत, तर मग ‘कॅडबरी' किंवा ‘नेस्ले'प्रमाणे त्यांची स्वत:ची चॉकलेट्स का मिळत नाहीत, असा प्रश्न आपल्याला पडतो. याची दोन उत्तरं आहेत. पहिलं म्हणजे सुरुवातीपासूनच या कंपनीची घडण ‘मागणी तसा पुरवठा' या सूत्रावर आधारित आहे. मोठमोठ्या ऑर्डर्स मिळतात किंवा मिळवल्या जातात आणि त्याप्रमाणे उत्पादन केलं जातं. व्यवसायात याला ‘बी टु बी' (बिझनेस टु बिझनेस) असं म्हणतात. मोरडे यांचा पिंड हा या कुळातला आहे. गेल्या काही वर्षांत अगदी कमी प्रमाणात ते ‘बी टु सी' क्षेत्रात (बिझनेस टु कंज्युमर) आलेले आहेत. त्यामुळेच किराणा मालाच्या दुकानांत ‘मोरडे बार' दिसतात. पण त्यांच्या एकूण व्यवसायात ‘बी टु सी'चं प्रमाण अत्यल्प आहे. शिवाय, रिटेलमध्ये उत्पादन नेताना त्याचं पॅकेजिंग, ब्रँडिंग किंवा जाहिराती वगैरे गोष्टींमध्ये लक्ष घालावं लागतं. माल विक्रीसाठी उपलब्ध करून देऊन ग्राहकाची प्रतीक्षा करावी लागते. मोरडे यांच्या गणितात ते बसत नसावं. त्यामुळे मोठ्या कंपन्यांबरोबरचा व्यवहार वाढवत नेण्यालाच ते प्राधान्य देतात.
आतापर्यंतच्या प्रवासात मोरडे यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं आहे. मंचरमध्ये सात एकरांवर पसरलेल्या या कंपनीत सुमारे एक हजार लोक काम करतात. पूर्वी सगळेच्या सगळे लोक आंबेगाव तालुक्यातलेच असायचे. त्यातून स्थानिक रोजगार वाढवण्याचाही विचार होता. तरीही कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात काही ना काही कुरबुरी झाल्याच. काही वेळा अस्वस्थ करून जाणारे प्रसंग घडले. असहकार आणि संपापर्यंत घडामोडी घडल्या, मनस्ताप झाला. मात्र, कंपनीच्या व्यवस्थापनाने त्या समस्या कुशलतेने हाताळल्या. त्यामुळे कटुता उरली नाही हे महत्त्वाचं. सध्या कंपनीत काम करणारे सर्व कर्मचारी मराठी आहेत. त्यामागे मराठी लोकांना प्राधान्य देण्याचा कंपनीचा विचार आहे. कोणत्याही कंपनीने शाश्वत रोजगार निर्माण केला पाहिजे, अशी चर्चा अलीकडे देशभर होताना दिसते; पण ‘मोरडे फुड्स'ने मात्र पूर्वीपासून हे सूत्र अंगीकारलेलं आहे. त्यामुळे कंपनीसोबत दीर्घकाळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे.
मराठमोळं कॉर्पोरेट असं सध्याच्या ‘मोरडे फुड्स'चं स्वरूप आहे. एका बाजूला ही देशातली ‘बी टु बी'मधली सर्वांत मोठी चॉकलेट उत्पादक कंपनी आहे. पण उत्पादनक्षमतेसोबतच संशोधनक्षमता वाढवणं हे कंपनीचं विशेष वैशिष्ट्य आहे. चॉकलेटशी निगडित अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांची अशी उत्पादनं आहेत की ज्यांच्या डिझाइनमध्ये मोरडे कंपनीचा महत्त्वाचा वाटा आहे. या क्षेत्रातल्या शंभर सर्वोत्तम भारतीय ब्रँड्स्ची यादी केली तर त्यातल्या किती तरी ब्रँड्स्च्या समोर कंसामध्ये ‘टीम मोरडे'चं नाव लिहावंच लागेल. मोरडे यांच्या मोठेपणाच्या गाभ्यामध्ये हे मखमली अस्तर आहे.
आनंद अवधानी
आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.