
सुमेधाताई यांचे पती योगेश चिथडे हे भारतीय सैन्यात होते. सैनिकी जीवनाविषयी साहजिकच दोघांनाही आस्था होती. पण त्यापुढे जाऊन सैनिकांसाठी काही काम करावं असं त्यांना वाटत होतं.
सुरुवातीला या दोघांनी वीरमरण पत्करलेल्या दोन सैनिकांच्या पत्नींना दत्तक घेतलं. त्यांचा खर्च उचलला. एवढंच नव्हे तर त्यांना पोटच्या मुलींप्रमाणे प्रेम दिलं. याच दरम्यान सियाचेन प्रांताविषयी काही माहिती सुमेधाताईंच्या वाचनात आली. ही जगातील सर्वोच्च उंचीवरची रणभूमी. समुद्रसपाटीपासून साडेअठरा हजार फुटांवर असलेल्या या प्रांतातल्या प्रतिकूल हवामानाची वर्णनं अंगावर काटा आणणारी होती. ऑक्सिजन विरळ होत जाणं, श्वासोच्छवासाला त्रास होणं. अशा परिस्थितीत आपले सैनिक कसे काम करत असतील या विचाराने सुमेधाताई बेचैन झाल्या. तिथे काम करणाऱ्या कोणाशी बोलता येईल का, असं त्यांच्या मनात यायला लागलं. सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी यांना सैन्यातल्या लोकांशी भेटायची, बोलायची संधी सहसा मिळतच नाही. आपणच ती निर्माण केली तर, या विचाराने त्यांनी प्रयत्न सुरू केले.
ही गोष्ट प्रत्यक्षात आणणं सोपं नव्हतं, पण प्रचंड पाठपुरावा करून त्यांनी सैन्यातील परमवीरचक्र हे सर्वोच्च पदक प्राप्त करणाऱ्या तीन सैनिकांना पुण्यात आमंत्रित केलं. अडीच-तीन हजार लोकांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. त्यानिमित्ताने या तिघांपैकी सियाचेन इथे काम करणारे ऑनररी कॅप्टन बानासिंग (परमवीरचक्र) यांच्याशी सुमेधाताईंचं बोलणं झालं. 'मी त्यांच्यासाठी काय करू शकते', या त्यांच्या प्रश्नावर, 'सियाचेन में सब से बडी समस्या ऑक्सिजन की है, उसके लिए आप कुछ कर सकती हैं?’, असं ते म्हणाले.
त्यांचं उत्तर ऐकून चिथडे पतीपत्नींनी सियाचेनमध्ये ऑक्सिजन प्लांट बसवून देण्याचं मनावर घेतलं. त्यासाठी काय करायला हवं, पैसे किती लागतील, किती वेळ लागेल याचा त्यांनी अभ्यास सुरू केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित ऑक्सिजन प्लांट द्यायचा तर मोठी किंमत मोजावी लागणार होती. थोडीथोडकी नाही तर अडीच कोटी रुपये!!
एवढा मोठा निधी उभा करायचा तर लोकसहभाग आवश्यक होता. पण लोकांकडे जाण्याआधी सुमेधाताईंनी स्वतःकडे असलेले सगळे दागिने विकले. पण त्यातून आलेली रक्कम अडीच कोटींच्या तुलनेत अगदीच कमी होती. मग सुमेधाताईंनी चक्क झोळी घेतली, त्यात पावतीपुस्तक घातलं आणि त्या घराबाहेर पडल्या. त्यांनी त्याला पावनभिक्षा असं नाव दिलं.
दरम्यानच्या काळात या कामासाठी त्यांनी SIRF (Soldiers Independent Rehabilatation Foundation) ही संस्था स्थापन केली. या कामाची माहिती देणारं एक ऑडिओ व्हिज्युअल प्रेझेंटेशनही तयार केलं. अनेक ठिकाणी त्याचं सादरीकरण केलं. त्यातून माणसं जोडली जात होती. चिथडे पतीपत्नी चार वर्षं अव्याहत काम करत राहिले. शेवटी आवश्यक तितका निधी जमा झाला आणि ४ ऑक्टोबर २०१९ ला सियाचेनमध्ये ऑक्सिजन प्लांट उभा राहिला. सव्वा लाख सैनिक, रोज येणारे कित्येक पर्यटक आणि स्थानिक नागरिक यांच्यासाठी एक मोठं काम उभं राहिलं. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधानांनी देखील चिथडे पतीपत्नींना भेटीसाठी बोलवून त्यांच्या कामाचं कौतुक केलं.

त्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये असाच ऑक्सिजन प्लांट उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला. त्यासाठीही साडेतीन कोटी रुपयांचा निधी जमवावा लागणार होता. पण आता प्रयत्न केला तर लोकसहभागातून निधी उभा राहू शकतो, हे त्यांना कळलं होतं. त्या विश्वासावर चिथडे पती-पत्नींनी पुन्हा एकदा कंबर कसली.
दरम्यान, सियाचेनमध्ये प्लांट उभा करण्याच्या निमित्ताने योगेश चिथडे यांचा पाच-सहावेळा सियाचेन दौरा झाला. अखेरच्या टप्प्यात सलग काही दिवस तिथेच राहावं लागलं. तिथल्या प्रतिकूल वातावरणाचा त्यांच्या प्रकृतीवर बराच परिणाम झाला. पण तरीही या दोघांनी काम थांबवलं नाही. १५ एप्रिल २०२२ या दिवशी जम्मूला दुसरा ऑक्सिजन प्लांट सुरू झाला. तिथून आल्यावर मात्र योगेश चिथडे त्यांची तब्येत खालावत गेली आणि २०२२ च्या जुलै महिन्यात त्यांचा मृत्यू झाला.
त्यानंतर दोघांनी एकत्र बघितलेली स्वप्नं पूर्ण करणं हेच सुमेधाताईंच्या उर्वरित आयुष्याचं ध्येय बनलं. मिलिटरी हॉस्पिटलमध्ये योगेश चिथडे उपचार घेत असताना त्या हॉस्पिटलला सोलर वॉटर हिटिंग सिस्टीमची गरज असल्याचं त्यांच्या लक्षात आलं होतं. योगेश यांच्या मृत्यूनंतर काही दिवसांतच सुमेधाताईनी ती गरज पूर्ण केली. एका सैनिकाच्या अपंग मुलीसाठी त्यांनी एक व्हीलचेअर घेऊन दिली. सैनिकांच्या विशेष मुलांच्या पुण्यातील शाळेसाठी स्कूल बस घ्यायची होती. तेही काम झालं. सैनिक बांधवांना राख्या पाठवणं, दिवाळीचा फराळ पाठवणं, कोविडकाळात मास्क पुरवणं वगैरे गोष्टी नियमितपणे सुरूच असतात. आतापर्यंत कोट्यवधींची कामं पूर्ण झालेली आहेत आणि पुढच्या काही मोठ्या कामांची तयारी सुरूच आहे.
*****
संस्थेविषयी अधिक माहिती
sirf.org.in
या संदर्भात काही शंका असल्यास सेक्रेटरी, अनुराधा कोटिभास्कर यांच्याशी पुढील नंबरवर संपर्क साधावा.
9225821850
वृषाली जोगळेकर | joglekarvrushali.unique@gmail.com
वृषाली जोगळेकर युनिक फीचर्समध्ये कार्यरत असून समाजाच्या विविध क्षेत्रांतील कर्तुत्ववान आणि धडपड्या व्यक्तींबद्दल लिहिण्यात त्यांना विशेष रस आहे.