आम्ही कोण?
अनुभव 

'मी' ते 'आपण' : एक एव्हरेस्ट चढताना...

  • उमेश झिरपे
  • 29.05.25
  • वाचनवेळ 14 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
everest zirpe

ते १९९१ साल होतं. गिर्यारोहणाची चटक लागून मला दहा वर्षं होऊन गेली होती. गिर्यारोहणातले बेसिक आणि अँडव्हान्स कोर्स करून झाले होते. सह्याद्री पालथा घालून झाल्यावर आता हिमालयातल्या शिखरांची ओढ लागली होती. आणि त्याच ओढीने गंगोत्रीमधल्या एका अतिशय कठीण शिखराच्या अपयशी मोहिमेहून मी परतत होतो. या शिखराने आम्हाला एकदा नव्हे, दोनदा पराभूत केलं होतं. त्या शिखराच्या भव्यतेकडे पाहत मी परतलो तो दिवस मला अजूनही आठवतो...

गंगोत्रीमधलं सहा हजार मीटर उंचीवरचं हे मंदा शिखर आमच्या कल्पनेपेक्षा खूपच भव्य आणि अवघड निघालं होतं. मी, अविनाश फौजदार, जगदीश चाफेकर, संजय डोईफोडे, जितेंद्र हंडे देशमुख आणि प्रदीप केळकर असे आम्ही सहाजण मंदा शिखर सर करायला निघालो तेव्हा आमच्या दृष्टीने पुरेपूर तयारी झालेली होती. कारण मंदाने यापूर्वीही एकदा आम्हाला आपल्या भव्यतेचा जोरदार झटका दिला होता. वर्षभरापूर्वीच संजय डोईफोडे, अजय देवधर, सुरेंद्र चव्हाण आणि मी याच मंदा शिखरावर आलो होतो. तेव्हा मंदा हे अतिशय टफ पीक मानलं जायचं. एव्हरेस्टला जाण्यापूर्वीची तयारी म्हणून जी शिखरं चढली जातात तशा शिखरांपैकी मंदा एक होतं. त्यामुळे आम्हालाही या शिखराचं आकर्षण होतं, पण त्याबद्दल फारशी माहिती मात्र नव्हती. मराठी माणसांनी या शिखरावर फारशा मोहिमा केल्या नव्हत्या. अपवाद फक्त बापूकाका पटवर्धन या जुन्या काळातील दिग्गज गिर्यारोहकाचा. त्यांच्या ‘गिरिभ्रमण' या संस्थेने पूर्वी या शिखरावर मोहीम आखली होती. त्यांच्याकडून माहिती घेऊन आम्ही चौघं या शिखरावर गेलो होतो; पण काही दिवसांतच आम्हाला लक्षात आलं, की या शिखराच्या भव्यतेच्या आणि कठीणतेच्या मानाने आपली तयारी काहीच नाहीये. इथे या वेळी तरी आपला टिकाव लागणं शक्य नाही, हे मान्य करत आम्ही अक्षरशः वीस दिवसांत या शिखरावरून खाली परतलो, पण अर्थातच पुन्हा त्या शिखराला भिडण्याचा निश्चय करतच.

या पहिल्या अपयशाने मला खूप काही शिकवलं. मुख्य म्हणजे एकट्याचं गिर्यारोहण आणि एकत्र मोहीम यातला फरक मला चांगलाच कळला. या अपयशावरून धडा शिकल्यानंतर मी पुन्हा मंदाच्याच मागे लागलो. खूप चांगली तयारी करून, आणखी काही चांगले गिर्यारोहक एकत्र करून १९९१मध्ये मी ही मोहीम आखली. विशेषतः साधनसामग्री आणि उपकरणांची तयारी जय्यत होती. या वेळीही आम्ही २५ दिवस मंदा शिखराच्या अंगाखांद्यावर होतो. पण अगदी ऐन वेळी म्हणजे शिखर अवघं एक हजार फुटांवर असताना आम्हाला साधनसामग्री कमी पडली. अगदी जिवाची बाजी लावून आम्ही खालचे दोर वर खेचून शिखर सर करण्याच्या प्रयत्नात होतो; पण तेवढं करूनही उपयोग झाला नाही. आम्ही सर्व गिर्यारोहक फिट होतो, हवामान चांगलं होतं आणि रूट ओपन करू शकत होतो, पण दोर कमी पडल्याने आम्हाला निराश होऊन परतावं लागले.

गिर्यारोहणात हे असं होतच असतं. पुन्हा नव्याने तयारी करून नवी स्वप्नं बघायची असतात. पण तरीही मंदावरून परतताना माझ्या मनात विचारांचं वादळ सुरू होतं. तो दिवस माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता, असं आज मागे वळून बघताना तर मला वाटतंच, पण ते तेव्हाही तितकंच जाणवंत होतं.

असं काय घडलं त्या वेळी? नेमकं शब्दांत मांडणं अवघड आहे, पण बहुतेक त्या मोहिमेच्या काळातच माझा गिर्यारोहक म्हणून ‘मी' पासून ‘आपण' पर्यंतचा प्रवास सुरू झाला असावा असं मला वाटतं. या मोहिमेहून परत येईपर्यंत मी गिर्यारोहणातली सगळी तंत्रं शिकलो होतो. सह्याद्रीच्या रांगा आडव्यातिडव्या पालथ्या घालून झाल्या होत्या. हिमालयाच्या अथांग उंचीचं दर्शन होऊनही बराच काळ लोटलेला होता. गिर्यारोहण माझ्या अंगात पुरतं भिनलेलं होतं. गिर्यारोहण म्हणजे शारीरिक क्षमतांची कसोटी ते मानसिक कणखरतेचा कस इथपर्यंतचा प्रवासही करून झाला होता. पण तरीही गिर्यारोहणात मला स्वतःला येणारी मजा, माझा कस लागणं, त्या भव्य शिखरांमध्ये स्वतःला विसरून जाण्याचा अनुभव मी माझ्या आनंदाचा भाग म्हणून घेत होतो. मंदावरून परतताना जाणवलेली सर्वांत महत्त्वाची गोष्ट कोणती होती? तर गिर्यारोहणाची मोहीम यशस्वी करायची तर केवळ मी फिट असून, कणखर असून उपयोग नाही. किंवा खरं तर आम्ही सारेच वैयक्तिकरित्या फिट आणि कणखर असूनही उपयोग नाही. आम्ही सारे ‘एकत्र' असणंही तितकंच महत्त्वाचं आहे आणि शारीरिक-मानसिक क्षमतांबरोबरच मोहिमेचं नियोजन-समन्वय-तयारी-एकमेकांमधलं अबोल सामंजस्यही गरजेचं आहे, हे मला जाणवलं. मंदाच्या मोहिमेत आम्ही एकत्र नव्हतो असं नव्हे, पण या सगळ्या अत्यावश्यक मुद्द्यांपैकी कोणत्या तरी एका घटकाकडे आमचं दुर्लक्ष झालं होतं हे नक्की. असं दुर्लक्ष होऊ देणं मोहिमेच्या लीडरच्या दृष्टीने योग्य नव्हतं. त्या मोहिमेचा लीडर मी होतो. आजवरच्या गिर्यारोहणाच्या वैयक्तिक चस्क्याचं मोहीम यशस्वी करण्याच्या नशेत रूपांतर करून मी मंदाहून परतलो.

पुढे मी गिर्यारोहणात जे काही केलं त्याचं श्रेय मंदाच्या त्या अपयशाला आहे आणि मोहिमेचा नेता असूनही एव्हरेस्ट न चढण्याचं कारणही मंदाने शिकवलेल्या धड्यातच आहे.

गिर्यारोहणाच्या अँडव्हान्स कोर्समध्ये खरं तर मला लीडर म्हणून रेकमेंड करण्यात आलं होतं. या कोर्समध्ये तुम्हाला अगदी उत्तम गुण मिळाले तरी तुम्हाला लीडर म्हणून रेकमेंड करतातच असं नाही. कारण वैयक्तिक क्षमता-कामगिरी आणि मोहिमेचा लीडर म्हणून आवश्यक असणारी क्षमता यात खूप फरक असतो. लीडर म्हटलं की त्याला मोहिमेचं काटेकोर नियोजन, बजेटचा अंदाज, साधनसामग्रीची तयारी, चढाईचं वेळापत्रक आणि कामांची विभागणी, आपल्या टीममेंबर्सचे स्वभाव, त्यांचे गुणदोष यानुसार त्यांच्यावर जबाबदाऱ्या टाकणे, अचानक उद्भवणाऱ्या समस्या, अशा अनेक घटकांकडे काटेकोर लक्ष द्यावं लागतं. माझ्यात ती क्षमता असल्याचं सर्टिफिकेट मला मिळालं होतं खरं, पण जेव्हा मी एखाद्या मोहिमेचा लीडर म्हणून शिखर सर करायला जायचो तेव्हाच मी त्या भूमिकेत असायचो. मंदाच्या अपयशानंतर मात्र मी कायमस्वरूपी लीडरच्या भूमिकेत गेलो असणार, असं आता वाटतं. गिर्यारोहणाकडे मी वेगळ्याच नजरेने बघू लागलो, अभ्यास करू लागलो. मंदाच्या दोन अपयशांचा धडा तर समोर होताच, त्यातून खूप काही शिकण्यासारखं होतं. पण आता देशी-परदेशी मोहिमांच्या जाणीवपूर्वक अभ्यासालाही सुरुवात झाली.

तसा अभ्यास जवळून करण्याची संधी लवकरच मला मिळाली. त्यानंतर काही दिवसांमध्येच पुण्यातून एव्हरेस्टसाठी पहिली नागरी मोहीम आखण्यात आली. डी. टी. कुलकर्णी यांनी त्या मोहिमेचं नेतृत्व केलं होतं. त्या मोहिमेची तयारी मी जवळून पाहिली. या मोहिमेच्या तयारीत माझा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी गिर्यारोहक निवडण्यापासून ते पैसे गोळा करण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मी साक्षीदार होतो. एव्हरेस्टला सामोरं जाण्यासाठी एक टीम बांधणं म्हणजे प्रत्यक्ष एव्हरेस्ट चढण्याइतकंच अवघड काम आहे, हे मी बघत होतो. दुर्दैवाने ती मोहीम अपयशी ठरली. डी. टी. कुलकर्णीचा एव्हरेस्टच्या वाटेवर अपघाती मृत्यू झाला. मोहिमेत थेट सहभागी नसलेल्या आमच्यासारख्या अनेक गिर्यारोहकांसाठीही तो मोठा आघात होता. हा आघात भावनिक तर होताच, पण ‘ही मोहीम अपयशी का झाली' या प्रश्नानेही माझा कायमचा ताबा घेतला. त्यानंतर १९९८ची एव्हरेस्ट मोहीम आली. त्या मोहिमेचं नेतृत्व होतं हृषीकेश यादवकडे, सुरेंद्र चव्हाण या मोहिमेत क्लायंबिंग टीमचा सदस्य होता. मलाही त्या वेळी मोहिमेत भाग घेण्याची जबरदस्त इच्छा होती, पण घरगुती अडचणींमुळे मला जाता येणं शक्य नव्हतं. पण त्या वेळी मोहिमेच्या तयारीमध्ये माझा पुरेपूर सहभाग होता. निधी गोळा करण्यापासून ते मोहीम एव्हरेस्टकडे रवाना झाल्यावर इथे पुण्यात बँकऑफिस सांभाळण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मी स्वतः काम करत होतो. डी. टी. कुलकर्णींच्या मोहिमेवेळी माझी भूमिका फक्त साक्षीदाराची होती. या वेळी मात्र मी मोहिमेच्या तयारीमध्ये पुरता घुसळून निघालो. आता वाटतं, त्या वेळी मी एव्हरेस्टवर जाऊ शकलो नाही ते एका अर्थाने बरंच झालं. त्यामुळे माझं सारं लक्ष मी तयारीवर केंद्रित करू शकलो. ती मोहीम यशस्वी झाली. सुरेंद्र चव्हाण एव्हरेस्टवर चढलेला पहिला मराठी माणूस ठरला, हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहेच. या सगळ्या काळात सह्याद्रीतली आणि हिमालयातलीही नवी नवी अवघड शिखरं सर करण्याचा सपाटा सुरू होताच.

गिर्यारोहक म्हणून त्यातून मला कमालीचा आनंद मिळत होता. पण वैयक्तिक गिर्यारोहणाबरोबरच तरुण गिर्यारोहणप्रेमींना या साहसी खेळाकडे वळवण्याचं, त्यांना त्यात तयार करण्याचं वेड मला या काळात लागलं. आपल्यासोबत इतरांनीही या खेळाची मजा घेतली पाहिजे, हिमालयातल्या भव्य शिखरांवर स्वतःला झोकून देण्याचा अनुभव माझ्याप्रमाणे इतरांनाही मिळायला हवा, या भावनेने मी पछाडलो. मुख्य म्हणजे एखादं शिखर चढण्यात जी झिंग असते तशीच झिंग एक टीम बांधण्यात, एक मोहीम आखण्यात, ती तडीस नेण्यात असते हे माझ्या हळूहळू लक्षात येऊ लागलं. हे शब्द आजचे आहेत, आज मागे वळून बघताना सुचले आहेत हे खरंच. पण तेव्हा मी वागत होतो ते मोहिमांची झिंग चढल्यासारखाच. आपण शिकवलेल्या मुलांनी एखादं शिखर सर करताना पाहणं, त्यांच्या चेहऱ्यावर निथळणारा आनंद अनुभवणं, गिर्यारोहणामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेला बदल पाहणं स्वतः शिखर चढण्याइतकंच आनंद देणारं होतं. आणि आणखीही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात येत होती. स्वतःच्या यशापयाशापेक्षा टीम बांधण्यावर जास्त लक्ष पुरवलं तर मोहिमेच्या यशाचा दरही उंचावतो. याचा प्रत्यय मला त्या काळातल्या मोहिमांमध्ये येत होता, पण त्यावर शिक्कामोर्तब झालं ते २००७ साली- शिवलिंग मोहिमेमध्ये.

२००७ साली आमच्या ‘गिरिप्रेमी संस्थे'ला २५ वर्षं पूर्ण होत होती. हे वर्ष जेवढ्या शक्य तेवढ्या मोहिमा आखून साजरं करायचं असं आम्ही ठरवलं. महाराष्ट्रात तर अनेक मोहिमा आखल्या. पण त्यापलीकडे सर्वांत आव्हानात्मक मोहीम होती ती शिवलिंग शिखराची. शिवलिंग हे गंगोत्रीमधलं एक अतिशय अवघड शिखर. जगातल्या भल्या भल्या गिर्यारोहकांना या शिखराने पाणी पाजलं आहे. या शिखराचा डेथ रेट आहे तब्बल पन्नास टक्के. पण आमच्या गिरिप्रेमीचे सदस्य हे आव्हान स्वीकारू शकतील, अशी खात्री मला होती. त्यामुळे रौप्यमहोत्सवी वर्षात हे शिखर आपण करायचंच, असं माझ्या मनाने घेतलं. आम्ही कसून तयारी केली. शिवलिंगची मोहीम हा एका वेगळ्या लेखाचाच विषय होईल, पण मुद्दा असा, की ही मोहीम आम्ही यशस्वीरीत्या पूर्ण केली. तेही आमच्या आठजणांच्या क्लायंबिंग टीमपैकी सातजणांनी शिखर सर केलं. एका सदस्याचं इक्विपमेंट लॉक झाल्याने त्याला चढता आलं नाही. पण आम्ही सर्वजण सुखरूप खाली आलो. या बातमीची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. पन्नास टक्के डेथ रेट असणाऱ्या शिखरावर आठपैकी सातजण शिखर सर करतात आणि सारेच्या सारे सुखरूप परततात, ही दखल घेण्याजोगीच बातमी होती. गिरिप्रेमींच्या आणि माझ्या दृष्टीने तर हा टर्निंग पॉइंट ठरला. या मोहिमेवरून मी परत आलो ते आता आपण एव्हरेस्ट करू शकतो या विश्वासानेच.

एव्हरेस्ट चढणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं. खरं तर शिवलिंग किंवा हिमालयातली अनेक शिखरं प्रत्यक्षात एव्हरेस्टपेक्षा किती तरी जास्त अवघड आहेत. तिथे तुमच्या निर्णयशक्तीचा, मानसिक कणखरतेचा जास्त कस लागतो. पण एव्हरेस्टचं आकर्षणही जबरदस्त आहे, हे मान्य करायलाच हवं. मलाही ते होतंच. अर्थात एव्हरेस्टचं स्वप्न पूर्ण करण्यामधलं सर्वांत मोठं आव्हान असतं ते पैसे गोळा करण्याचं. एव्हरेस्ट चढण्यासाठी नेपाळ सरकारकडे रॉयल्टी भरावी लागते. शिवाय शेर्पांचा खर्च, अत्याधुनिक उपकरणांचा खर्च, असा सगळा मिळून आकडा इतका मोठा होतो की तो ऐकूनच आपल्याला धाप लागते. त्यामुळे आपण एव्हरेस्ट मोहीम काढू, असं म्हणणं याचा अर्थ आपली टीम ती मोहीम यशस्वी करून दाखवेल याची जबाबदारी उचलणं असा तर असतोच. पण त्याबरोबरच मोहिमेसाठी निधी जमा होऊ शकतो याचीही जबाबदारी उचलावी लागते. एव्हरेस्ट मोहीम काढू असा विचार पहिल्यांदा माझ्या मनात आला तेव्हा स्वतः शिखर सर करण्याचं स्वप्न तर मनात होतंच, पण त्याच वेळी आपल्याला मोहीम काढण्याचं आव्हान स्वीकारायचं आहे हेही तितकंच स्पष्ट होतं.

आणि खरोखरच एव्हरेस्टची मोहीम आखणं हे सोपं आव्हान नव्हतंच. ते एवढं मोठं होतं की ते साधता साधता एव्हरेस्ट चढण्याचं माझं स्वप्न त्यातला फक्त एक भाग बनून राहिलं. त्यापेक्षा मोठं झालं मोहीम यशस्वी करण्याचं आव्हान. मला वाटतं, हे फक्त माझंच नव्हे तर आम्हा सगळ्यांचंच झालं. एव्हरेस्ट मोहीम पक्की झाली. नंतर क्लायंबिंग मेंबर्स पक्के झाले. त्यांची तयारी सुरू झाली. पैसा उभा करण्याची धडपड सुरू झाली. त्यात आम्ही सारेच इतके घुसळून निघालो की कुणा एकाच्या एव्हरेस्ट चढण्या- न चढण्यापेक्षा मोहीम यशस्वी होणं ही प्रत्येकाची जबाबदारी झाली. मी हा स्वतःमध्ये घडत असलेला प्रवास अनुभवत होतो आणि माझ्या टीम मेंबर्समध्येही ते घडताना बघत होतो. आमची मोहीम यशस्वी होणार याची ती नांदीच होती, असं मला वाटायचं. फक्त मोहीम म्हणून नव्हे, तर सर्वांनाच ‘मी ते आपण' असा प्रवास करताना बघणं फार सुंदर होतं. अर्थात याचा अर्थ आम्ही सारे स्वार्थाच्या पलीकडे गेलो वगैरे दावे मला करायचे नाहीत, किंवा हा त्याग होता वगैरे शब्दही त्याला डकवायचे नाहीत.

स्वत: एव्हरेस्ट चढण्याचं स्वप्नही प्रत्येकाच्या मनात आत खोलवर कुठे तरी असणारच. होतंच ते. इतर सगळ्यांप्रमाणे माझ्यासाठीही नेपाळ सरकारकडे एव्हरेस्ट चढण्यासाठी रॉयल्टी भरलेली होती. उपकरणांची खरेदी झोली होती. सगळी तयारी होती. एव्हरेस्ट तर मलाही चढायचं होतंच. खरं तर आम्हाला सर्वांनाच शंभर टक्के क्लायंबिंग साध्य करायचं होतं. त्यामुळे सर्वांचंच शिखर सर झालं पाहिजे, असाही प्रयत्न होताच... आणि याच काळात ‘आपण' या शब्दाची मजा घ्यायलाही आम्ही शिकू लागलो होतो. या मोहिमेत आम्ही एक टीम म्हणून इतके बांधले गेलो की कोणी आजारी पडला की सर्वांना स्वत: आजारी पडल्याप्रमाणेच वाईट वाटायचं आणि कोणी चांगली कामगिरी केली की त्याचा आनंदही सर्वांना सारखा व्हायचा. मोहिमेआधी जवळपास तीन महिने एका घरात एकत्र राहण्याचा हा परिणाम होताच. शिवाय एव्हरेस्टच्या भव्यतेचाही माणसावर परिणाम होत असणारच. आपण, आपल्या वैयक्तिक इच्छा-आकांक्षा किती क्षुद्र आहेत, असं कुठे तरी वाटायला लागतंच.

या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात केली. यंदा एव्हरेस्टवर हवामान खूपच खराब होतं. बेस कँप ते कँप वन, पुन्हा कँप वन ते बेस कँप, पुन्हा बेस कँप ते कँप टू असा सराव करत करत आम्ही जेव्हा शेवटच्या चढाईची तयारी करत होतो तेव्हा वेदर विंडो मिळतच नव्हती. हवामानखात्याशी थेट संपर्क साधत आम्ही वेदर विंडोची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो. आम्हाला त्याआधारे शेवटच्या चढाईची तारीख ठरवायची होती. मी टीमचा नेता तर होतोच, पण टीममधल्या इतर सर्व बारा क्लायंबिंग मेंबर्सपेक्षा अनुभवाने आणि वयानेही मोठा होतो. त्यामुळे हे निर्णय घेण्यासाठी मला बेसकँपवर थांबणं भाग होतं. शिवाय बेस कँपवरच्या सहकाऱ्यांपैकी काहींच्या तब्येती बिघडू लागल्या होत्या. ते क्लायंबिंग मेंबर्स नसले तरी माझ्यासाठी त्यांच्याइतकेच महत्त्वाचे होते. त्यांच्या तब्येतीची काळजी घेणं, वेळीच निर्णय घेऊन त्यांना खाली सुरक्षित काठमंडूला पाठवणं ही माझी जबाबदारी होती. वर चढाईसाठी गेलेल्या आमच्या बिनीच्या गिर्यारोहकांसमोर अचानक काही समस्या उभ्या ठाकल्या होत्या. भूषण हर्षे, आनंद माळी, सचिन डेंग आणि गणेश मोरे यांना कोणत्या ना कोणत्या कारणाने शिखर चढाई शक्य झाली नव्हती. नेमका त्याच वेळी मला ‘मी एव्हरेस्टवर चढाई करायला निघायचं की नाही' याचा निर्णय घ्यायचा होता. मी क्लायंबिंगला निघालो असतो तर खाली बेसकँपवर निर्णय घेणारं कुणीच नव्हतं. शिवाय एकदा मी शिखराच्या दिशेने चालू लागलो की मला फक्त माझ्या चढाईवर लक्ष केंद्रित करणं भाग झालं असतं. शिखर चढताना त्याशिवाय पर्यायच नसतो. मग इतर टीम मेंबर्सशी काळजी करणं न करणं माझ्या हातात राहिलं नसतं, मग निर्णय घेणं तर वेगळीच गोष्ट. इथे तर मी टीमचा नेता म्हणून एव्हरेस्टवर आलो होतो. संपूर्ण टीम सुखरूप पुण्यात परतेपर्यंत तिची जबाबदारी माझ्यावर होती. त्या एका दिवसात जावं की न जावं या प्रश्नाने माझा ताबा घेतला. बेस कँपवर येऊनही शिखर न चढण्याचा निर्णय घेणं सोपं नव्हतं. ही मोहीम उभी राहावी यासाठी घेतलेले कष्ट डोळ्यांसमोर येत होते. पुन्हा तेवढेच कष्ट घेऊन मी परत येऊ शकेन का, या प्रश्नाचं उत्तर मिळत नव्हतं. या द्विधा मनःस्थितीत कुणाशी बोलणंही योग्य नव्हतं. मी फोनवरून माझ्या बायकोशी बोललो. ती मला म्हणाली, “तुझा आतला आवाज ऐक.” मलाही तेच वाटत होतं. खरं तर हा निर्णय घेण्याच्या काळात मला जी अस्वस्थता आली होती तीही त्रासदायक होती. जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत माझं लक्ष कुठेच केंद्रित होणार नव्हतं. आणि आपले टीम मेंबर्स आपल्या भरवशावर एव्हरेस्टच्या दिशेने चालू पडलेले असताना अशा दोलायमान स्थितीत जास्त काळ राहणं योग्य नव्हतं. अशा वेळी कोणताही चांगला नेता स्वतः चढाईला जाणार नाही, असं मला माझा आतला आवाज सांगत होता, आणि मी त्याचं ऐकायचं ठरवलं. एकदा निर्णय झाल्यावर सगळं शांत झालं. माझं लक्ष मोहिमेवर केंद्रित झालं. आमच्या शेर्पांच्या कंपनी मालकालाही मी बेसकँपवर बोलवून घेतलं. आमच्या टीम मेंबर्सशी फोनवरून सतत संपर्कात होतोच, घडामोडी घडत होत्या. काहीजण पुढे जात होते. काहींना मागे थांबावं लागत होतं. अतिशय ताणाचा काळ होता तो. पण मनात समाधान होतं, की आपण आपल्या इच्छेवर मात करून आपल्या टीमसाठी मागे थांबलो आहोत.

अखेरीस बातमी कळली, की आमच्या टीमने एव्हरेस्ट सर केलं. तो आनंद कसा होता? स्वतः एव्हरेस्ट सर करण्यापेक्षा तो वेगळा असेल, पण दुय्यम नक्कीच नव्हता. मी स्वतः तिथे गेलो नसलो तरी ‘आम्ही' ते करून दाखवलं होतं. या ‘आम्ही'च्या आनंदाची ताकद ‘मी'पेक्षा जास्त होती. आणि हे फक्त माझ्याच बाबतीत घडलं असं नव्हे, तर क्लायंबिंग टीमपैकी जे एव्हरेस्ट चढू शकले नाहीत त्यांचीही भावना वेगळी नव्हती. आपण एव्हरेस्ट चढलो नाही, असं आम्हाला वाटलंच नाही. कारण आम्ही ते चढलोच होतो.

(अनुभव जानेवारी २०१३च्या अंकातून साभार )

उमेश झिरपे | umzirpe@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results